भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) क्रिकेटपटूंच्या निवडीतही ‘गोलमाल’ केली जाते, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेट बोर्डाला फटकारले आहे.
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) क्रिकेटपटूंच्या निवडीतही ‘गोलमाल’ केली जाते, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेट बोर्डाला फटकारले आहे.
‘‘भारतातील अनेक युवा क्रिकेटपटूंना महेंद्रसिंग धोनी किंवा विराट कोहलीसारखे क्रिकेटपटू बनावेसे वाटते. मात्र गुणवत्ता असून त्यांना संधी मिळत नाही. एखादी राज्य असोसिएशन बोर्डाशी संलग्न नसेल तर तेथील क्रिकेटपटूंना संधी दिली जात नाही. बोर्डातील पदाधिका-यांकडून संघनिवडीत हस्तक्षेप केला जातो,’’ असे मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी सोमवारी एका म्हटले.
बीसीसीआयचा अनागोंदी कारभार आणि एकाधिकारशाहीबद्दल ठाकूर आणि कलिफतुल्ला यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संमतीविना कुठलही क्रीडा संस्था चालू शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
‘‘बीसीसीआयचा कारभार आकसाने आणि चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. त्याची प्रतिक्रिया सर्वत्र देशभर उमटत आहे. एखाद्या क्रिकेटपटूला संधी मिळण्यासाठी बोर्डाने मदतीचा आणि सहकार्याचा हात पुढे केला पाहिजे. मात्र संघनिवडीत बीसीसीआयची मक्तेदारी दिसून येत नाही.
प्रत्येक राज्य क्रिकेट असोसिएशनमधील क्रिकेटपटूंना समान संधी मिळत नाही. एखादी क्रिकेट असोसिएशन बोर्डाशी संलग्न नसेल तर त्या असोसिएशनच्या क्रिकेटपटूंना संघ निवडीतून डावलले जाते,’’ असे न्यायाधीश ठाकूर यांनी सांगितले.
आर. एम. लोढा समितीच्या शिफारसी बीसीसीआयतर्फे कशा लागू केल्या जातात, हे पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने न्यायमित्र म्हणून सीनियर वकील गोपाल सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली आहे. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यावरून बीसीसीआयची टंगळमंगळ सुरू आहे.