ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समीक्षक चंद्रशेखर संत यांचे गुरुवारी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
मुंबई– महाराष्ट्रातील क्रीडा पत्रकारितेत वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक चंद्रशेखर संत यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मुलुंड येथील त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी दुपारी निधन झाले. ते ६१ वर्षाचे होते.
गुरुवारी छातीत दुखू लागल्यानंतर संत यांना डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र घरी आल्यानंतर थोडय़ा वेळाने हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. संत यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे आहेत. संत हे सुरुवातीला अभ्युदय बँकेत नोकरीला होते. मात्र त्या नोकरीत फार काळ त्यांचे मन रमले नाही. १९७८च्या सुमारास ते महाराष्ट्र टाइम्समध्ये रूजू झाले. तब्बल २५ वर्षे क्रीडा पत्रकार आणि क्रीडा संपादक म्हणून कार्यरत होते. ‘स्पोर्ट्स वीक’मध्येही संत यांनी काम केले होते.
महाराष्ट्र टाइम्समधून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर आकाशवाणी, दूरदर्शन तसेच अनेक खासगी टीव्ही वाहिन्यांमध्ये सर्व प्रकारच्या खेळांचे समालोचन त्यांनी केले. समीक्षक म्हणून अनेक चर्चातही त्यांचा सहभाग असायचा. १९८३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपचे वार्ताकनही त्यांनी केले होते. क्रिकेट हा त्यांच्या जिव्हाळय़ाचा विषय असला तरी देशी खेळांकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. कबड्डीच्या प्रचार आणि प्रसारासाठी कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांनी काढलेल्या जपान दौ-यातही चंद्रशेखर संत सहभागी झाले होते. स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईचे (एसजेएएम) अध्यक्ष असलेल्या संत यांनी स्पोर्ट्स जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसजेएफआय) खजिनदार म्हणून अनेक वर्षे काम पाहिले होते. संत यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली निधनाबद्दल क्रीडा क्षेत्रातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
अभ्यासू सहकारी, पत्रकार हरपला
>संतांचा आणि माझा सुमारे ४० वर्षाचा परिचय आहे. १९८०च्या दशकात महाराष्ट्र टाइम्सच्या ‘स्पोर्ट्स वीक’मध्ये सुरुवातीला ते ‘पार्टटाइम’ म्हणून काम पाहत होते. त्याच वेळा त्यांना एका बँकेतून नोकरीची ऑफर आली होती. मात्र क्रिकेटशी त्यांची नाळ इतकी जुळली होती की, पूर्ण वेळ क्रीडा पत्रकारितेस त्यांनी सुरुवात केली. त्यांचे वागणे इतके सौजन्याचे होते की, त्यांना कुणी शत्रू नाही.
आम्ही दोघांनी १९८२ दिल्ली आशियाई स्पर्धा, १९८५ दिल्ली राष्ट्रीय स्पर्धा, १९८७ केरळ राष्ट्रीय स्पर्धाचे वार्ताकन केले. संतांची आणखी एक आठवण म्हणजे सकाळी लवकर उठण्यासह टापटीपपणा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याबद्दल आणखी एक आठवण म्हणजे आम्हाला अनेक वेळा रात्री ११ किंवा ११.३० वाजेपर्यंत काम करावे लागायचे. त्यावेळी ऑफिसखालील ढाब्यावर जाऊन पराठा खाणे, हा आमचा नित्यक्रम असायचा. क्रिकेट आणि क्रीडा विषयातील त्यांचे ज्ञान अफलातून होते. – वि. वि. करमरकर (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समीक्षक).
स्पोर्ट्स असोसिएशन वाढवण्यात मोठे योगदान
>आकाशवाणीवर मी संतांसोबत अनेक वेळा कॉमेंट्री केली आहे. स्पोर्ट्स जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया (एसजेएफआय) आणि स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ मुंबई (एसजेएएम) वाढवण्यात संतांचे मोठे योगदान आहे. त्यांनी अनेक चांगले उपक्रमही सुरू केले. – एस. एस. रामास्वामी (पीटीआय)
१९८३ वर्ल्डकपमधील सुखद आठवणी
>१९८३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या वार्ताकनासाठी मी संत, द्वारकानाथ संझगिरी आणि अयाझ मेमन स्वखर्चाने इंग्लंडला गेलो होतो. तो दौरा आखण्यात संतांनी पुढाकार घेतला. वर्ल्डकपमधील प्रत्येक क्षण आम्ही ‘एन्जॉय’ केला. त्यावेळच्या आठवणी सुखद आहेत. त्यावेळी मुंबई विमानतळावर कस्टम्स अधिका-यांनी संतांचा पासपोर्ट पाहून त्यांचे कौतुक केले. कारण टाइम्समधून संत वर्ल्डकपची बित्तंबातमी देत होते. – जी. विश्वनाथ (द हिंदू)
सर सर्वाना सांभाळून घ्यायचे
>दूरदर्शनवरील मुलाखतीसाठी मी कालच सरांना भेटलो होतो. २००८ बीजिंग ऑलिंपिक ते २०११ वर्ल्डकप अशा अनेक मोठया क्रीडा स्पर्धातील आठवणी संत सरांनी आमच्यासोबत ‘शेयर’ केल्यात. तसेच ते सर्वाना सांभाळूनही घ्यायचे. स्टुडियोमध्ये कितीही वेळ रेकॉर्डिग चालले तरी त्यांची तक्रार नसायची. – स्वप्नील जाधव, दूरदर्शन (सरांचा विद्यार्थी)