उसनवारीने घेतलेले पैसे परत मागण्यावरून झालेल्या वादातून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी तीन तरुणींना कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप या तरुणींनी केला होता.
कल्याण – उसनवारीने घेतलेले पैसे परत मागण्यावरून झालेल्या वादातून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी तीन तरुणींना कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप या तरुणींनी केला होता.
याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर पोलिसांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ‘त्या’ तरुणींनी उलट पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे. त्या तरुणींसह नऊ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे खरे कोण, खोटे कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘त्या’ तरुणी व महिलांत वाद झाला त्यावेळी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. रात्री पुन्हा वाद झाल्याने दोघेही पोलीस ठाण्यात आले होते. त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी सरिता कसाणे मधे पडल्या त्यावेळी त्या तरुणींनी कसाणे यांच्यावर दगडफेक केली.
तसेच शिवीगाळ केली. स्वत:च्या अंगावरील कपडे तरुणींनी फाडून घेत ते पोलिसांनी फाडल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्याची धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन तरुणींसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
तरुणींनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कालच गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल पीडित तरुणींकडून उपस्थित होत आहे. पोलिसांच्या हे प्रकरण अंगलट आल्याने दोषी पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्या तरुणींचे म्हणणे आहे.
पोलीस आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
पोलिसांच्या मारहाणप्रकरणाची सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत थोरात चौकशी करत आहेत. तीनही तरुणींचा जबाब त्यांनी नोंदवून घेतला आहे. तरुणी त्यांच्या आरोपावर ठाम असून त्यांनी तसाच जबाब त्यांना लिहून दिला आहे. हा प्रकार झाला त्यावेळी पोलीस ठाण्यात इतर जणही उपस्थित होते, त्यांच्याकडूनही माहिती घेतली जाणार आहे. या प्रकरणाचा अहवाल पोलीस उपायुक्त संजय जाधव यांना सादर करण्यात येणार असून उपायुक्त जाधव हे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांना सादर करणार आहेत. आयुक्त काय निर्णय देतात? याकडे लक्ष लागले आहे.