गंगा नदी प्रदूषित करण्यात कोलकाता, हावडा, कानपूर, अलाहाबाद शहरे सर्वात आघाडीवर असल्याची माहिती केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती यांनी राज्यसभेत दिली.
नवी दिल्ली- गंगा नदी प्रदूषित करण्यात कोलकाता, हावडा, कानपूर, अलाहाबाद शहरे सर्वात आघाडीवर असल्याची माहिती केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती यांनी राज्यसभेत दिली.
गंगा नदीत ११८ शहरांमधून सांडपाणी सोडले जाते. २०११ मध्ये कोलकाता शहरातून ५३४.२१ एमएलडी सांडपाणी, कानपूरमधून ४२६ एमएलडी सांडपाणी सोडले गेले. तसेच वाराणसीतून २९५ एमएलडी, अलाहाबादमधून २३२ एमएलडी, मोरादाबादमधून ११७.२० एमएलडी, पाटण्यातून २५२ एमएलडी, हावडयातून ११६.३२ एमएलडी सांडपाणी गंगेत सोडले गेले, अशी माहितीही भारती यांनी दिली.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंगा नदीची ५६ ठिकाणी पाहणी केली असून स्वच्छ गंगा राष्ट्रीय मंडळानेही पाण्याचा दर्जा तपासला आहे. यासाठी देशातील उच्च शिक्षण देणा-या संस्थांची मदत घेण्यात आली.
दरम्यान, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, नेदरलँडसह अनेक देशांनी गंगा नदी स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा दर्शवली असून यासाठी ते ज्ञान व तंत्रज्ञान, आर्थिक व तांत्रिक सहभाग देण्यास तयार आहेत, असेही भारती म्हणाल्या.