लक्ष्मीकांत देशमुख कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना भ्रूणहत्येविरोधात ठोस भूमिका घेत त्यांनी सायलेंट ऑब्झव्र्हर ही यंत्रणा विकसित केली व गर्भिलग चिकित्सेवर प्रभावी मर्यादा आणल्या. याच विषयावरील आठ कथांचा संग्रह त्यांनी लिहिलेल्या ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’ या पुस्तकात आहे.
आई, बहीण, पत्नी अशा अनेक नात्यांतील संदर्भानी स्वीकारल्या जाणा-या स्त्रीला मात्र मुलगी म्हणून स्वीकारले जात नाही. गर्भात वाढणारे बाळ स्त्रीचे आहे की पुरुषाचे हे समजण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आणि स्त्रीभ्रूणहत्येला जणू मोकळीक मिळाली. सोनोग्राफी तंत्राचा सर्वात मोठा गौरवापर झाला आणि स्त्रीभ्रूणहत्यांचे प्रमाण वाढत गेले. विशेष म्हणजे, समाजातील उच्चशिक्षित आणि सधन वर्गातच मुलीला नाकारले जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील लिंगदर म्हणजेच सेक्स रेशो दर एक हजार पुरुषांमागे ९३३ मुली असा होता, तर हेच प्रमाण राज्यात ९२२ इतके खाली होते. पुरोगामी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र या सधन भागात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण अधिक असल्याचे अनेक अहवालांतून अनेक वेळा समोर आले आहे. भारतीय समाजातील मुलीला नाकारण्याच्या या कुप्रथेला रोखण्यासाठी केवळ राज्यात नव्हे, तर संपूर्ण देशात कौतुकाचा विषय ठरलेला ‘सेव्ह द बेबी गर्ल’ हा उपक्रम राबवणारे कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. त्या वेळी त्यांना आलेले अनुभव कथा स्वरूपात ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’ या पुस्तकातून मांडले आहेत.
राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनातील अधिका-यांनी प्रयत्न केला तर समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते, हेच ‘सेव्ह द बेबी गर्ल’ या उपक्रमातून दिसून येते. देशमुख यांनी लिहिलेल्या सर्व कथा या सधन आणि सुशिक्षित समाजात घडलेल्या असल्यामुळे स्त्रीभ्रूणहत्येमागे लोकांच्या मनातील पूर्वग्रह किती घट्ट आहेत, याची जाणीव होते. लग्न झाल्यानंतर केवळ मुलगा हवा या हट्टापायी सासरच्या लोकांकडून त्यातही पतीकडून विविध मार्गाने होणारा छळ, मानसिक त्रास स्त्रीला सहन करावा लागतो. अनेक वेळा तर पैशाच्या जोरावर स्त्रीची फसवणूक करून मुलीला गर्भातच मारले जाते. देशमुख यांनी माधुरी आणि मधुबाला, इमोशनल अत्याचार, धोकादायक आशावादी, पॉलिटिकल हेअर, लंगडा बाळकृष्ण आणि ऑपरेशन जिनोसाईड या कथांतून स्त्रीभ्रूणहत्यांचा प्रश्न घरातील चार भिंतीपर्यंत कसा पोहोचला आहे, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
उच्च शिक्षण घेतलेल्या आणि सामाजिक भान असलेल्याचा टेंभा मिरवणा-या पुरुषांकडूनच जेव्हा वंशाचा दिवा हवा, यासाठी पत्नीची अडवणूक करणे, कोणत्याही थराला जाऊन तिच्यावर दबाव आणणे अशा प्रवृत्तीचे वर्णन ‘इमोशनल अत्याचार’ या कथेमधून येते. केवळ मुलगा हवा म्हणून स्त्रीच्या मनाचे आणि शरीराचे होणारे हाल किती भयानक असू शकतात, हे देशमुख यांनी या कथेमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
स्त्रीभ्रूणहत्या हा विषय आजवर वृत्तपत्रीय लेख, आकडेवारी आणि अन्य स्वरूपात वाचकांपुढे आला आहे. मात्र कथा स्वरूपात हा ज्वलंत विषय अधिक जिवंत खोलात जाण्याचा प्रयत्न देशमुख यांनी केला आहे. कथांसोबतच परिशिष्टमध्ये समाविष्ट केलेल्या ‘सेव्ह द बेबी गर्ल! सेव्ह द नेशन!!’ आणि अन्य लेख या विषयासंदर्भातील जागरूकता वाढवण्यास उपयुक्त ठरतात.