कोकण प्रांत हा निसर्गसंपन्न, वैविध्यपूर्ण आहे, या भागात वावरणा-या पूर्वजांनी आपले निसर्गासोबतच ऋणानुबंध कधीही तुटू नये यासाठी कोणत्या ना कोणत्या युक्त्या योजून आपल्या भागाला सोयीच्या पडतील अशा परंपरा सुरू केल्या. लोकांचा विश्वास बसावा, जनतेचे धारिष्टय़ वाढावे यासाठी या परंपरांना देवत्वाची झालर दिली. असे न केल्यास गावावर संकट येईल, अशी भीतीही घातली आणि निसर्गासोबत वावरण्यासाठी त्याची कृतज्ञता जपण्यासाठी थेट त्याच्या कुशीत जाण्याची सवयही लावली. वैभववाडी तालुक्यातले शिराळे हे गाव याच वैशिष्टय़ाने भारलेले! सह्याद्रीच्या कु शीत विसावलेले.. या गावात जाताना पावलापावलावर आजही प्रत्येकाला विचार करावा लागतो, आपली वाट चुकली तर नाही ना. एवढय़ा घनघर्द जंगलात गाव वसले आहे. या गावातील ग्रामस्थांना निसर्गउपचाराचे जेवढे ज्ञान आहे. ते पाहता आश्चर्यचकित व्हायला होते. गावातील माणसांना हे जंगल म्हणजे काहीच वाटत नाही. पक्ष्यांचा किलबिलाट, जंगली श्वापदांचा वावर येथे नित्याचाच. तरीही या सह्याद्रीचे ऋण मानावे. वर्षातील एक आठवडा निसर्गासोबत राहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर शिराळेच्या गावपळणीत सहभागी व्हायला हवे. वर्षातील सात दिवस समस्त गाव वेशीबाहेर जाते. आईच्या पदराखाली गेल्यानंतर जशी ऊर्जा मिळते तशीच ऊर्जा निसर्गाच्या कुशीत शिरल्यावर अनुभवता येते. साडेतीनशे ते चारशे वर्षापासून शिराळे ता. वैभववाडी येथे गावपळण ही प्रथा साजरी केली जाते. वेशीबाहेर अख्खा गाव निघून जातो. ही परंपरा केव्हापासून सुरू झाली. याबाबत ग्रामस्थांमध्ये मतभेद आहेत. एकमात्र खरे की गावपळण असली म्हणजे. गावाचे एक संमेलन भरते. एरव्ही ग्रामीण भागातील मंडळी रहाडगाडय़ातून मजेसाठी वेळ देऊ शकत नाही. मग त्यांचे गावपळणीत सुरू असलेले संमेलन महत्त्वपूर्ण ठरते. परंपरा जशी आहे तशीच श्रद्धाही मोठी आहे. घोरपी जोडप्याने दिलेल्या शापापासून आपले संरक्षण तसेच कोणत्याही प्रकारचे संकट आपल्यावर येऊ नये यासाठी ही गावपळण प्रथा शिराळे गावात रूढ झाली आहे. या दरम्यान शिराळे गावातील सर्व ग्रामस्थ सहा ते सात दिवस गाव सोडून वेशीबाहेर सडूरे गावच्या हद्दीत वास्तव्य करतात. या गावपळणीबाबत असेही म्हटले जाते की, ३३ कोटी देवांची येथे सभा भरते त्यासाठी शांतता हवी म्हणूनही गावपळण केली जाते. शिराळेची वार्षिक गावपळण ही महाराष्ट्रातील एकमेव आगळी-वेगळी परंपरा आहे.
शिराळे गावच पळाले आहे. वास्तू सुनसान आहे. गावात कुणी-कुणीच नाही.. एका रात्रीत अख्ख गाव गायब झाल्याचे कुणी सांगितले तर.. आश्चर्यचकित होऊ नका. सुमारे ३५० लोकांचे गाव पाच दिवसांसाठी वेशीबाहेर जाते. अगदी दरवर्षी पौष महिन्यात हा नित्य क्रम चालू आहे. सध्या हे गाव वेशीबाहेरच आहे. आज गाव पुन्हा गजबजणार आहे.
गावपळणसाठी शिराळेवासीयांनी आपली घरे, दारे, गुरू, ढोरे घेऊन सडुरे गावच्या हद्दीत संसार उपयोगी वस्तूंसह वास्तव्य केले आहे. सात दिवस वास्तव करताना शिराळेवासीय आपले व्यवहार गावाप्रमाणेच सुरू ठेवतात. सकाळी उठल्यानंतर गुरा-ढोरांची जागा स्वच्छ करणे, नंतर घरातील सर्व मंडळी जंगलात गवत, जळण यासाठी जाते. दुपारी जेवण, त्याचप्रमाणे रात्रीचे जेवण आपल्या झोपडय़ांमध्ये करतात. सकाळी नेहमीसारखी मुलांची शाळा देखील झाडाखाली भरते.
या गावातील लोक या मागची प्रथा सांगताना एक कथा सांगतात. भोरपी नाडे करून लोकांचे मनोरंजन करून अपला उदरनिर्वाह करायचे याच कार्यक्रमाच्या वेळी त्या भोरप्याने सांगितले, तुमच्या शेताची राखण मी करतो, तुम्ही आमचा कार्यक्रम पाहा तुमच्या शेताचे नुकसान होणार नाही, अशी जबाबदारी त्या भोरपी जोडप्याने घेतल्यानंतर त्या भोरप्याने दिशा बांधल्या, त्यानंतर शेतात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. आपल्या शेताचे कायम रक्षण होईल या हेतून त्या कलावंतांच्या कुटुंबातील जोडप्याचा वध करण्यात आला. हे जोडपे गावातील लोकांचे मनोरंजन करीत होते. मात्र त्यांचे आत्मे येथेच भटकत राहिले. गावाचे सुख संपुष्टात आले. मग गाववाल्यांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले पण गावाची शांती कायम राहिना. मग गाववाल्यांनी या प्रेतात्मांसाठी सात दिवसांची मुभा दिली, त्या बदल्यात वर्षभर गावात शांती राहावी, असे वचन घेतले. त्या दिवसापासून गावाची सात दिवस वेशीबाहेर जाण्याची परंपरा सुरू झाली आहे. असेही म्हटले जाते की या जोडप्याने दिलेल्या शापामुळे ही गावपळण केली जाते. आपल्यावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून शिराळेवासीय गावाबाहेर राहू लागले.
या गावपळणचे खास वैशिष्टय़ म्हणजे ज्या दिवशी ही गावपळण सुरू होते त्या दिवशी शिराळेवासीय आपली पाळीव प्राण्यासह या गावपळणीत मांजर, कुत्री, यांच्यासह गुरू ग्रामस्थांनी गाव सोडल्यानंतर गुरे स्वत:हून सडुरे हद्दीतील वास्तव्याच्या ठिकाणी आपल्या घरधन्याने बांधलेल्या झोपडय़ांच्या जागेवरच जागा धरून उभी राहतात. यादरम्यान प्रत्येक ग्रामस्थांच्या झोपडय़ांची जागा पूर्वीच निश्चित केलेली असते. शिराळेवासीयांचे वास्तव्य शिराळे गावाच्या वेशीपासून काही अंतरावरच असते. परंतु गुरे, ढोरे, कोंबडय़ा, कुत्री गावपळण दरम्यान शिराळे हद्दीच्या आत पाऊल टाकत नाहीत. कडाक्याच्या थंडीत झाडपाल्यापासून बनविलेल्या झोपडीत हे ग्रामस्थ वास्तव्य करतात. परंतु या थंडीतही ग्रामस्थांना दैवी शक्तीच्या कृपेची ऊब मिळते. जंगलभाग असूनही या ग्रामस्थांना सरपटणा-या प्राण्यांपासून किंवा जंगली श्वापदापासून कोणताही धोका नसतो.
एव्हाना सुमारे साडेतीनशेपेक्षा अधिक वर्षाच्या इतिहासात अशी एकही अनुचित घटना घडलेली नाही. गावात पूर्वी प्रत्येक ग्रामस्थांने केवळ तुपाचा दिवा लावावा, अशी पद्धत होती. मात्र झगमगत्या विजेच्या जमान्यात ही प्रथा लोप पावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे.
जिल्ह्यात विविध धार्मिक, पारंपरिक उत्सव साजरे केले जातात. त्यातीलच शिराळेचा गावपळण ही परंपरा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. शिराळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले चारशे लोकवस्तीचे गाव आहे. निसर्गरम्य अशा परिसरात वसलेले हे गाव तालुक्याच्या एका टोकाला असले तरी या गावची गावपळण ही प्रथा तालुक्याच्या अभिमानाची गोष्ट आहे. जुन्या-जाणत्या लोकांना जुन्या गोष्टींचा विसर पडत चालला असला तरी शिराळेची गावपळण आली की, शेकडो वर्षापूर्वीच्या या परंपरेची आठवण होते. ही प्रथा जतन करण्याचे काम शिराळेवासीय निष्ठेने करताना दिसतात.
शिराळे गाव हे सहय़ाद्रीच्या डोंगरपायथ्याशी असलेले गाव आहे. गावापासून सुमारे पाच कि. मी. अंतरावर सुकमुनीचा प्राचिन काळातील मठ आहे. याच मठापासून काही अंतरावरून सुख नदीचा उगम होतो. या गावच्या हद्दीतच सुकमुनीचे वास्तव्य पूर्वी होते असे आजही जुनी जाणकार मंडळी सांगतात. याच सुकमुनीच्या नावावरून शिराळेपासून उगमपावलेल्या वैभववाडी तालुक्याकडे वाहणा-या नदीचे सुख नदी असे नाव पडले.
ही गावपळण पूर्वी एक महिना चालत होती. आता कालांतराने ही प्रथा सात दिवसावर आली. शिराळे वासीयांनी सोमवारीच आपली जनावरे, कोंबडय़ा, कुत्री, संसाराला सात दिवस पुरेल एवढे धान्य, घेऊन सडुरे गावच्या हद्दीत रस्त्यालगत आपल्या झोपडय़ा बांधून त्यात राहावयास सुरुवात केली. या दरम्याने शिराळे गाव पूर्णपणे खाली होते. मात्र गावातील ग्रामस्थांची घरे या कालावधीत उघडीच असतात. परंतु या दरम्यान कोणत्याही प्रकारची चोरी म्हणा की, गावातील लोकांवर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही.
गावात गांगोदेवच आपले रक्षण करीत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. शिराळेवासीयांची गावातील गांगोदेवावर अफाट श्रद्धा आहे. शिराळे गावातील सर्व अबाल वृद्ध, लहान, मोठे सर्व गृहस्थ असोत की, प्रसूती झालेली स्त्री असो. ती आपल्या एक दिवसाच्या तान्हुल्याला घेऊन या गावपळणमध्ये सामील होऊन सडुरे गावात आपल्या झोपडीमध्ये राहतात. या सात दिवस चालणा-या गावपळणमध्ये गावातील लोकांचे जसे पूर्वीचे दिनक्रम चालतात त्याच पद्धतीने म्हणजेच गावरहाटीप्रमाणे या झोपडय़ांमध्ये चालतात. सर्व ग्रामस्थ आपले व्यवहार, आपला कामधंदा गावातील पद्धतीनेच करताना दिसतात. या गावपळणमध्ये सामील झालेले सर्व ग्रामस्थ एकोप्याने राहून सात दिवस वास्तव्य संपल्यानंतर पुन्हा आपल्या शिराळे गावात पोहोचतात.
या सात दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. सात दिवसांनंतर गावात गेल्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे असे कार्यक्रम केले जातात. आणि पुन्हा आपल्या नियमित पद्धतीने गावातील वर्दळ नेहमीसारखी सुरू राहते.