महाराष्ट्रात गडकोट किल्ल्यांचे वैभव विपुल आहे. सातवाहनांपासून मराठय़ापर्यंत अनेक राजघराण्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दुर्ग बांधून त्यांची श्रृंखला उभारली. आपला इतिहास, भूगोल, संस्कृती, परंपरा इ. सर्वाचे वैशिष्टय़ आपणाला या गडांमधून पडताळता येते. नाशिक जिल्ह्यातला ब्रह्मगिरी पर्वत हाही सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाचा डोंगर.
मराठी मन, हृदय आणि महाराष्ट्रात स्वराज्य आणणा-या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं नातं काही औरच. आज एकविसाव्या शतकात शिवरायांच्या किल्ल्यांचे महत्त्व शून्य असले तरी या महाराष्ट्र भूमीचा, मराठी माणसांचा आणि मनाचा मानबिंदू व आपल्या मराठी पुरुषाचा कणा म्हणजे हे किल्ले आहेत. याच मानापैकी एक नाशिकचा आणि गोदावरी नदीचा उगमस्थान असलेला ब्रह्मगिरी पर्वत. याच ब्रह्मगिरीच्या आणि दुर्गभांडार यात्रेची भ्रमंती व आरोहण करण्याचे सर्वानुमते ठरल्यावर मी, जगदीश, सचिन प्रभू, समीर भडसावळे, गणेश बर्वे, सुनील काथेपुरी, राहुल व रोशन रांजणे आणि आठ जणांची टीम या ब्रह्मगिरी-दुर्गभांडाराच्या आरोहणास सज्ज झाली.
पहाटे नाशिक मार्गे त्र्यंबकेश्वरला जाणारी बस पकडून त्र्यंबक गाठले तेव्हा ब-यापैकी थंडी होती. या थंडीतच वाफाळता गरमागरम चहा पिऊन तरतरी आली. चहा पिऊन आणि काथेपुरीने आणलेल्या चपात्यांवर हात मारून आम्ही सर्वानी दुर्गभांडारकडे कूच केली. सकाळची वेळ आणि गारवा असल्यामुळे चढाई करताना अजिबात त्रास जाणवत नव्हता. ब्रह्मगिरी हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे तसेच भाविकांची ये-जा असल्यामुळे मंदिर प्रशासनाने आणि वन विभागाने पाय-यांचे बांधकाम उत्तमरीत्या केलेले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे या परिसराची साफसफाई, सोयी-सुविधा अतिसुंदर स्वरूपात केलेल्या आहेत.
प्रवेशद्वारानंतर आम्ही सर्व जण निमुळत्या खिंडीत पोहोचलो आणि तेथील बांधलेल्या पाय-या, खिंडीची रचना पाहून सर्व जण हरवून गेलो. या खिंडीतून आरोहण करताना खूप धम्माल करत चाललो होतो. पण थोडय़ाच अंतरावर ही धम्माल स्तब्ध झाली. त्या खिंडीत १५-२० जणांच्या माकडांनी आमची वाट अडवली. जणू काही ब्रह्मगिरी/ दुर्गभांडारवर जाण्यासाठी प्रवेश फी आकारण्यासाठी की आमच्या स्वागतासाठी ती उभी आहेत, हेच कळत नव्हते, पण तसे नव्हते. त्यांची नजर आमच्या पाठीवरच्या सॅककडे होती. आम्हाला कळून चुकले की त्यांना खाण्यास हवे होते. आम्ही त्यांच्यासाठी खायला काढणार तोपर्यंत त्यातील दोन माकडांनी माझा सहकारी जगदीश याच्या पाठीवर चढून आणि त्याची सॅक उघडून पाण्याची बॉटल काढली. मी आणि सचिनने जगदीशला तसेच पुढे चालत राहण्यास सांगितले.
जगदीशच्या पाठीवर बसलेले माकड जराही उतरण्याचे नाव घेत नव्हते. तर दुसरे माकड त्याच्यासोबत संपूर्ण सॅकची झडती घेण्यासाठी सॅकच्या सर्व चैन ओपन करत होते. एका कप्प्यात बिस्किटाचा पुडा मिळाल्यानंतर पाठीवर चढलेले माकड खाली उतरले, तर दुस-याने पाण्याची बॉटल काढल्यामुळे सॅकची चैन फाटली आणि दोन्ही माकडं बिस्कीट व पाण्याची बॉटल घेऊन न्याहरीला बसली. हा प्रकार मी माझ्या कॅमेरात कैद केला व माकडांशी झालेल्या या सामन्यानंतर पुन्हा आमचे आरोहण सुरू झाले.
खिंड पार केल्यानंतर पठारावर आलो. पठारावर एक छोटे सुंदर तलाव आहे. त्या ठिकाणाहून अंजनेरी किल्ल्याचे व बाजूच्या नवरा-नवरी सुळक्याचे दर्शन घडले. थोडी भटकंती झाल्यावर पठारावरच्या एका टपरीवर सर्वानी पुन्हा एकदा चहा घेतला. पुढे पठारावरील टेकडी चढून दुर्गभांडार असलेल्या ब्रह्मगिरीच्या मागील बाजूस कडय़ावर उतरलो. हा कडय़ावरचा परिसर संपूर्ण मोकळा आहे. याच कडय़ाच्या एका टोकाला गोदावरी मातेचे पुरातन मंदिर आहे. याच ठिकाणी गोदामाईची मूर्ती व गौमुखातून गोदावरी नदीचं उगम स्थान आहे. पुढे कडय़ाच्या किनारीवरूनच पुढे शंकराच्या मंदिरात आलो, या ठिकाणी शंकराने जटा आपटलेल्या खुणा येथील पुजा-यांनी दाखवल्या.
या ठिकाणी सर्वानी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. दर्शन झाल्यावर तेथील पुजा-यांनी मंदिराबाबत, गोदावरी माता व शंकराच्या आपटलेल्या जटांबाबत आख्यायिका सांगितली, ब्रह्मगिरीचा इतिहास सांगितला. या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर व विलोभनीय आहे. येथून समोरचा हरिहरगड, फणीचा डोंगर व भास्कर ऊर्फ बसगडांचे दर्शन झाले. थोडय़ा विश्रांतीनंतर व आणलेल्या सुक्या मेव्यावर हात मारत ब्रह्मगिरीच्या व दुर्गभांडाराच्या मधोमध असलेल्या सुळक्यावर आरोहणास सुरुवात केली. शेवटची वाट जरा स्क्रीपॅचची होती, त्यातच एका बाजूला खोल दरी. या सर्वावर मात करत अखेर शेवटचा टप्पा पूर्ण करत माथा गाठला आणि जयघोष करत तिरंगा फडकवला.
भक्ती, दुर्गभ्रमंती आणि प्रस्तररोहण याचा मिलाप या आरोहणात झाला. पुन्हा खाली येताना त्याच माकडांच्या गोतावळ्यातून खाली जायचे होते. त्यामुळे आम्ही खाली येताना पिशवीतूनच त्या मुक्यांसाठी खाद्य आणि पिण्याचे पाणी आणले. प्रत्येक टप्प्यात आमचा भंडारा त्यांच्यासाठी होता. मी, गणेश, सचिन व इतर सहकारी त्यांना खायला देत आमचा रस्ता मोकळा करत होतो व तेही आम्हा सर्वाचे आभार मानत वाट मोकळी करत होते.
सर्वाना भूक लागली होती. खाली आल्यानंतर कुशावर्तला आंघोळ केली. त्र्यंबकेश्वराचे आणि परिसरात असलेल्या मंदिरातून दर्शन घेतले व जेवणासाठी बल्लाळेश्वर भोजनालयात घोटकर सर (रत्नाकर गणेश जोशी) यांच्याकडे येऊन उत्तम आणि स्वादिष्ट असलेल्या अमर्यादित गरमागरम जेवणावर हात मारत सर्व जण मनसोक्त जेवलो व परिसरात खरेदी, भटकंती करत मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू केली.