पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शासकीय इमारतीपासून ८९ व्या साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने सुरुवात झाली.
ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी, पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या शासकीय इमारतीपासून ८९ व्या साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीस दुपारी अडीच वाजता सुरुवात झाली. या दिंडीचे पूजन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले.
ग्रंथदिंडीत ‘न भूतो न भविष्यती’ गर्दी
फेटे बांधलेले तरुण, नववारीतील तरुणी, टाळ-मृदंगाच्या साथीत अवघा आसमंत दुमदुमून टाकणारा मोरया मोरयाचा नाम, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष अशा भावपूर्ण वातावरणात निघालेल्या ग्रंथदिंडीने ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्योगनगरीत सुरुवात झाली.
दुपारी अडीचच्या सुमारास पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन होऊन संमेलनाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, खासदार अमर साबळे, सासवड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन, प्रकाश पायगुडे आदींसह औद्योगिक नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे-मुंबई महामार्गावरून निघालेल्या या ग्रंथदिंडीत पिंपरी-चिंचवड परिसरातील शाळेतील विद्यार्थी विविध वेषभूषेत सहभागी झाले होते. ‘पर्यावरण वाचवा’चा संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांनी हाती धरले होते. ‘मोरया मोरया’चा नामघोष आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषामुळे वातावरण प्रसन्न झाले होते. सर्व विद्यार्थ्यांनी भगवे फेटे बांधले होते. शहरातील तरुण-तरुणीही फेटय़ांसह दिंडीत सहभागी झाले होते. औद्योगिक नगरीतील महिलांनी जागोजाग रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या.
संत कवी, तंत कवी आणि पंत कवी यावर आधारित तीन स्वतंत्र चित्ररथांचा ग्रंथदिंडीत समावेश केला होता. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, गोराकुंभार, मुक्ताबाई, बहिणाबाई आणि शाहीर यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी या चित्ररथांचे सारथ्य केले. अभंग, पोवाडा आणि श्लोकांच्या सुरावटीत हे चित्ररथ मार्गस्थ झाले. झाशीची राणी लक्ष्मीबाई, संत तुकाराम-ज्ञानेश्वर महाराज, क्रांतिवीर चाफेकर बंधूंची वेषभूषा केलेले शालेय विद्यार्थी विशेष लक्ष आकर्षून घेत होते.
‘पर्यावरण वाचवा’चा संदेश देणारे फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृतीचा नारा दिला. यात महाविद्यालयीन विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले होते. महिला संतांची दिंडी, माहिती-तंत्रज्ञान दिंडी, कामगार दिंडी, पर्यावरण दिंडी, विविध देशांतील पारंपरिक वेशभूषेतील परदेशी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि झिम्मा, फुगडी आणि मंगळागौरीचे विविध खेळ खेळणा-या महिलांचे स्वतंत्र पथक वैशिष्टय़पूर्ण ठरले.
ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, राज्यघटना, सकल संत गाथा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ, शिवाजी सावंत यांची कादंबरी, मंगेश पाडगावकर यांचे कविता संग्रह, महानुभाव साहित्यातले लीळाचरित्र, भगवतगीता, चिंचवडच्या मोरया गोसावी यांचे चरित्र आदी ग्रंथ पालखीत ठेवले होते. आळंदी, देहू आणि मोरया गोसावी देवस्थानातील वारक-यांनी या ग्रंथदिंडीत सहभागी होत ग्रंथदिंडीची शोभा वाढवली. पखवाज वादक, टाळकरी व विणेक-यांचा सहभागही लक्षवेधक होता. त्यांनी अवघा आसमंत दुमदुमून टाकला होता. निगडीतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांचे ढोल, ताशा, लेझीम व झांज पथक, पुण्याच्या पाचंगे बंधूंचे सनई, चौघडा व तुतारी, साता-याच्या कुलकर्णी यांची अब्दागिरी व वारकरी झेंडय़ांनी ग्रंथदिंडीची शोभा वाढवली.
दिंडीतही तिळगूळ!
संमेलनपूर्व वादाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथदिंडीत ‘तिळगूळ घ्या अन् गोड गोड बोला’ असे म्हणत संवादी वातावरण निर्माण झाले होते. तिळगूळ सर्वांपर्यंत पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. खासदार अमर साबळे यांची ग्रंथदिंडीतील उपस्थिती लक्ष वेधून घेण्यासारखी होती. वाद बाजूला सारून खासदार साबळे व संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते; मात्र तिळगुळाच्या गोडव्याने जणू काही घडलेच नव्हते, असे वातावरण ग्रंथदिंडीत होते.
देश- विदेशातील शेकडो साहित्यिक सहभागी
या संमेलनासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे; तर देश- विदेशातून शेकडो साहित्यिक, ग्रंथ प्रकाशक, मुद्रक आणि साहित्य रसिक सहभागी झाले आहेत.
हिंदुस्थान अॅण्टिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या ४० एकराच्या मैदानाचा कायापालट करत येथील पावणेचार एकराच्या मैदानावर मुख्य सभामंडप उभारला गेला आहे. त्यालाच साजेसे असे ७ हजार २०० चौरस फुटांचे भव्य व्यासपीठ आणि तीन उपव्यासपीठेही तयार करण्यात आली आहेत.
याबरोबरच या ठिकाणी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मो-या गोसावी, ज्येष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, संमेलनाचे आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे बोधचिन्ह, समाजातील विविध वर्गाचे प्रतिनिधी असणारे कामगार, शेतकरी, पुजारी, महिला यांचे प्रत्येकी १२ फूट उंचीचे पुतळे उभारण्यात आले आहेत. संमेलनस्थळाची सुरक्षा ठेवण्यासाठी पोलिसांकडूनही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
निमंत्रितांना संमेलनस्थळापर्यंत मोफत बससेवा
साहित्यविषयक कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा, यासाठी ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास जाणा-या निमंत्रितांना संमेलनस्थळापर्यंत नेऊन सोडण्यासाठी मोफत बससेवेची व्यवस्था डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने करण्यात आली आहे.
संमेलनासाठी साहित्य, समाजकारण आणि राजकारणातील अनेक दिग्गज तसेच देशाच्या आणि राज्याच्या कानाकोप-यातून अनेक साहित्यिक व रसिक उपस्थित राहाणार आहेत. संमेलनातील १६ ते १८ जानेवारीदरम्यान ही बससेवा सकाळी ८ वाजता ठेवण्यात आली असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले.
पिंपरीतील हिंदुस्थान अॅण्टिबायोटिक कंपनीच्या मैदानवरील मैदानावर भरवण्यात आलेल्या संमेलनस्थळी जाण्यासाठी पुण्यातील काँग्रेस भवन येथून सहा बसेस सुटतील.
तर तळेगाव (जुना मुंबई-पुणे महामार्ग येथून देहू रोड व निगडी मार्गे), देहूगाव (तळवडे व निगडी मार्गे), आळंदी (भोसरीमार्गे), मोशी (इंद्रायणीमार्गे), रावेत (डांगे चौक, काळेवाडी चौक, औंध, सांगवी, नाशिकफाटा मार्गे) आणि येरवडा (विश्रांतवाडी, दिघी,भोसरीमार्गे) या ठिकाणांहून प्रत्येकी एक बस निघेल. या बसमध्ये स्वयंसेवक व बसची ओळख पटण्यासाठी प्रत्येक बसवर संमेलनाचा फलक बसवण्यात येणार आहे, असेही डॉ. पाटील म्हणाले.