यंदा वातावरणामध्ये भयंकर तापमान वाढलं होतं. उष्णतेने अक्षरश: कहर केला होता. अंगाची लाही-लाही होत होती. अशातच शिवा गिरकराच्या घरी मुंबईचे पाहुणे उतरले.
यंदा वातावरणामध्ये भयंकर तापमान वाढलं होतं. उष्णतेने अक्षरश: कहर केला होता. अंगाची लाही-लाही होत होती. अशातच शिवा गिरकराच्या घरी मुंबईचे पाहुणे उतरले. यामध्ये शिवाचा मोठा भाऊ, त्याची बायको आणि दोन छोटी मुलं होती. गावात पाण्याची टंचाई आणि त्यात शिवाचं दोन रूम असलेलं छोटंसं घर! त्या घरात शिवाची बायको आणि दोन मुलं अगोदरच होती. त्यात मुंबईची चार माणसं वाढली.
अर्थातच या दिवसात पाहुणे नको असं म्हणण्याची वेळ त्याच्यावर आली होती. पण भावाला येऊ नको असं सांगणार तरी कसं? ते तर अजिबात शक्य नव्हतं. कारण त्याचा भाऊ दर महिन्याला त्याला दीड हजार रुपये पाठवत असे. अर्थात देवाची तेलवात आणि सणासुदीसाठी ते पैसे असले तरी प्रत्येक महिन्याला एवढा खर्च करण्यासारखा कुठलाच मोठा सण नव्हता.
गणपतीला तो स्वत:च गावी येत असल्याने सगळा खर्च तोच करायचा. त्यामुळे भावाच्या दीड हजार रुपयातील शे-दोनशे देवासाठी आणि सणासाठी सोडले तर बाकी पैशांमध्ये त्याचा अर्धा घरखर्च चालत होता. शिवाय आता तो गावी आला असला तरी घरातला खर्चही तोच करत होता. त्यामुळे जेव्हा त्याने फोन केला, ‘तेव्हा इलंस तर लयच बरा होय्त. पोरांका आंबे पन खाव्क मिळतले’ असं शिवाने त्याला सांगून टाकलं.
पण एकदम चार माणसं वाढल्यामुळे झोपण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एका खोलीत एकच पंखा असल्याने त्या खोलीत शिवाने मुंबईकरांची सोय केली. दुस-या खोलीत पंखा नव्हता. शिवाय ती खोली आत असल्याने रात्री भयंकर गरम व्हायचं. त्यामुळे बायकोला आणि मुलांना त्या खोलीत झोपायला सांगून भाऊ आल्यापासून शिवा खळयातच झोपू लागला. भावाला गावात येऊन पंधरा दिवस झाले होते.
अजून नाही म्हटलं तरी ते दहा-पंधरा दिवस थांबणार असं त्यांच्या बोलण्यातून त्याला कळलं. कारण मुलं शाळेत जात नसल्याने त्यांच्या शाळेच्या सुट्टीचा प्रश्न नव्हता. रात्री मुलं आणि मुंबईकर मंडळी झोपल्यावर शिवाची बायको मागच्या दाराने कधीतरी खळयात यायची. खूप उखडत असल्याने बाहेर तिला जरा बरंही वाटायचं आणि नव-याचा सहवासही मिळायचा. गेल्या पंधरा दिवसात तिने पंधरा मिनिटांसाठी का होईना, पण दोन-तीन वेळा खळयाचा आसरा घेतला होता.
अमावस्येच्या दुस-या दिवशी भयंकर गरम होत असल्याने रात्री साडेअकराच्या नंतर ती मागच्या दाराने खळयात आली. शिवा तेव्हा मच्छर त्रास देत असल्याने अगदी डोक्यावरून पांघरून घेऊन झोपला होता. आतल्या खडखडणा-या पंख्याच्या आवाजातही मुंबईकर जोडप्यांचा हळूहळू बोलण्याचा आवाज बाहेर पुसटसा ऐकू येत होता. त्यामुळे शिवाची बायको थोडा वेळ वारा घेत थांबून राहिली.
आतला आवाज बंद झाल्यावर तिने नव-याच्या अंगावरील पांघरूण ओढलं. अमावस्या कालच होऊन गेल्यामुळे काळोखही तेवढाच होता. अर्थात काळोख हीच तिची जमेची बाजू होती. काळोखाचा फायदा घेत आतल्या खोलीचा कानोसा घेऊन ती दहा मिनिटं नव-याच्या सहवासात राहिली आणि साडेबाराच्या दरम्यान आपल्या खोलीत झोपायला गेली.
दुस-या दिवशी सकाळी उठल्यावर चहा पिताना शिवा आपल्या भावाला म्हणाला,
‘परशा, रातरी मी एका चोराक पकडलंय.’
‘चोर? कुठला चोर? आणि कसली चोरी करायला आला होता?’
‘अरे, रातरी अकराच्या दरम्यान माका पांदनीतसून कोनतरी जाताना दिसलो. भाय्र येव्न बगीतलंय तर काळोख आसल्यामुळा कोन तो कळत नवतो.’
‘मग पुढे?’ शिवाच्या भावाने उत्सुकतेने विचारलं.
‘फुडे काय? मी मनात ठरवलंय, हयां चोराक कायव करून पकडायचा. सरळ त्येचो पाटलाग धरलंय.’
‘अरे पण कुठला चोर होता तो? आणि कसली चोरी करायला आला होता?’
‘ताच सांगतंय. आदी आय्कान तर घी. अण्णा पावसकराच्या मोरयेजवळच्या बागेत एका झाडार माका हालचाल दिसली. गडग्यामागसून मी हळूच त्या झाडाजवळ गेलंय आनी बॅटरी मारलंय.’
‘पण कोण होता तो?’
‘दत्त्या मालपेकर!’
‘काय सांगतोस? दत्त्या? कमाल आहे!’ दत्त्याचं नाव ऐकून परशा अगदी चक्रावून गेला होता.
‘कमाल कसली? आता आंब्याचो मोसम हा ना! दत्त्यासारखे भुरटे चोर रातरीच्या काळोखाचो फायदो घेव्न आंबे काढतंत. त्येच्यात दारयेचा भागता.’
‘मग बॅटरी मारल्यावर पुढे काय झालं?’
‘काय व्हनार? माज्या हातापाया पडाक लागलो. मी पन मग त्येका जास्ती काय बोलाक नाय. त्येका सांगलंय, मायझंया, काळोखात हात-पाय मोडान घेतलंस तर हे दोन-चारशे रुपये तुका दोन-चार हजाराक पडतले, असा सांगितलंय नि मी सरळ घराकडे इलंय. पन घराकडे येव्न बगतंय तर मायझंयो बबन्या सुतार माज्या हथरूणात ढेंगा वर करून झोपलो होतो.’
‘आता हा बबन्या सुतार मध्येच कुठून आला?’ परशाला बबन्या सुताराची भूमिका काही लक्षात येत नव्हती. पण त्याच्या गोंधळात अधिक भर न घालता शिवा त्याला म्हणाला,
‘काय नाय रे, त्या चोराक बगीतल्यार पयल्यांदा मी बबन्या सुताराक घेव्न इलंय. तो पन खळयातच झोपता ना! मी त्येका हाडलंय माज्या सोबतीक. पन त्येच्या डोळयार झोप! दांडो शोधापर्यंत रांडेचो माज्याच हथरूनात पांघरून डोक्यार घेव्न झोपलो. मग मी त्येचो नाद सोडलंय नी येकटोच त्या चोराच्या मागावर गेलंय. घराक येयपर्यंत माका एक वाजलो.’
शिवा गिरकराने रात्रीची गंमत सांगितली आणि तिकडे जेवणाच्या खोलीत शिवाच्या बायकोच्या हातातला चहाचा कप हातातून सटकून खाळकण् फुटला. मनातल्या मनात तिने नव-याला प्रश्न केला, अवो, भुरटो चोर पकडूसाठी तुमी काळोखात धडपडत गेलास. पन त्या काळोखात तुमच्या घरात घरफोडी झाली त्येचा काय?