दिल्लीत घोडेबाजार केल्याशिवाय आणि फोडाफोडी केल्याशिवाय कोणत्याच पक्षाचे सरकार स्थापन होणार नाही, हे अगदी उघड दिसत आहे. पक्षीय बलाबलाची स्थितीच तशी विचित्र आहे.
दिल्लीत घोडेबाजार केल्याशिवाय आणि फोडाफोडी केल्याशिवाय कोणत्याच पक्षाचे सरकार स्थापन होणार नाही, हे अगदी उघड दिसत आहे. पक्षीय बलाबलाची स्थितीच तशी विचित्र आहे. भाजपला या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असे स्थान मिळाले होते. ते तसेच आहे. तसे असूनही भाजपने सरकार स्थापन करण्यास नकार दिला होता. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना विचारणा करण्यात आली. त्यांना भाजपच्या खालोखाल जागा मिळाल्या होत्या. त्यांनी काँग्रेसच्या सहकार्याने सरकार स्थापन केले. पण ते ४९ दिवसच टिकले.
केजरीवाल यांनी सरकार आणि मुख्यमंत्रीपद याबाबत फारच पोरखेळ केला. आता कोणाचे तरी सरकार स्थापन करावे लागणार किंवा विधानसभा बरखास्त करून नव्याने निवडणूक तरी घ्यायला हव्यात. नायब राज्यपाल या बाबत बरेच संभ्रमात पडले आहेत. या प्रकरणात आता एक याचिका दाखल झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजपला सरकार बनवण्यासाठी १० ऑक्टोबरची मुदत दिली आहे. या मुदतीत असे काय होणार आहे. या एका महिन्यात भाजपचे नेते घोडेबाजार केल्याशिवाय आपले बहुमत कसे तयार करणार आहेत, हे काही कळत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने ही मुदत दिली आहे. या मागे न्यायालयाचा हेतू काय आहे, हे काही कळत नाही. भाजपच्या एका नेत्याचा घोडेबाजार करण्याचा प्रयत्न स्टिंग ऑपरेशन करून आम आदमी पक्षाने हाणून पाडलाआणि या प्रकरणाची सीडी न्यायालयाला सादर केली आहे. न्यायालयाने ही सीडी दाखल करून काही निर्णय देण्यास नकार दिला आहे. आता सरकार स्थापनेचाच प्रयत्न होत आहे तेव्हा या सीडीची काही गरज नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. माणसे खरेदी करण्याचा भाजपच्या एका नेत्याने केला असा ‘आप’चा आरोप आहे; पण या नेत्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप फेटाळून लावले असले तरी पक्षाने त्यांना नोटीस पाठवली आहे.
घोडेबाजार होत आहे आणि हे आरोप फेटाळले जात आहेत, अशा वातावरणात एखादा पक्ष अर्थातच आम आदमी पक्ष फुटला आणि त्याचे किमान १० आमदार भाजपात आले तरच आता सरकार स्थापन होऊ शकणार आहे. म्हणजे एक पक्षफूट अटळ तरी आहे किंवा १० ऑक्टोबपर्यंत भाजपला काहीही करता येणार नाही. विधानसभा बरखास्त होणार आहे. दरम्यान, या पक्षाने काँग्रेसबरोबर पुन्हा आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. याच वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते कुमार विश्वास यांनी काँग्रेसवर आगपाखड करून नरेंद्र मोदी यांचे मोदी स्तोत्र गायला सुरुवात केली आहे. यातून काही संकेत मिळत आहेत. आताच त्यांना मोदी आवडायला लागले आहेत हे काही सहज झालेले नाहीत. ‘आप’मध्ये फूट पडण्याचे हे संकेत आहेत. या एकूणच प्रकारामुळे दिल्लीत घोडेबाजार सुरू असला तरी त्यात भाजपचीच कोंडी झाली आहे.