अजीझ नाझा यांची ‘‘चढता सुरज धीरे धीरे ढलता हैं, ढल जायेगा’’ ही कव्वाली कदाचित अलीकडच्या काळातील सर्वात जास्त लोकप्रिय कव्वाली असेल. उर्दू भाषा उत्तम येणारे श्रोते सोडा, अगदी जुजबी हिंदी येणा-यालाही ही जबरदस्त कव्वाली सहसा माहीत असतेच. अजीझ नाझा यांचा वरच्या पट्टीतला आवाज, मूळ कव्वालीतील आशयगर्भ भाव, त्या आशयाला चपखल बसणारी चाल आणि कर्णमधुर संगीताने ही कव्वाली एके काळी देशभर गाजली होती. आजही ती लोकप्रिय आहे. गंमत म्हणजे या कव्वालीचे कवी, गायक, संगीत, दिग्दर्शक हे सगळे एकच होते – अजीज नाझा! मुंबईतील हा मलबारी शायर मूळचा केरळचा. त्याची मातृभाषा मल्याळम, शिक्षण झाले गुजराथी माध्यमातून आणि त्यांनी शायरी केली अस्खलित उर्दूमधून! अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी गाणीही गायली आहेत.
‘‘चढता सुरज’’ या त्यांच्या कव्वालीने कितीतरी पिढय़ांना जीवनाची निष्फळता समजावून दिली. ही कविता जशी ‘‘लागले नेत्र रे पैलतीरी’’ म्हणणा-या वृद्धांमध्ये लोकप्रिय झाली होती. तसेच तिने अगदी १६/१७ वर्षाच्या युवकांनाही एकेकाळी अक्षरश: वेड लावले होते. मला सर्वात जास्त भावले होते, ते होते कव्वाली सुरू होण्याच्या आधीच्या शेरमधले शब्द –
हुवे नामवर बेनिशा कैसे कैसे,
जमी खा गयी नौजवा कैसे कैसे.
एकापेक्षा एक नामवंत कसे नामशेष होऊन जातात. पायाखालची जमीनच त्या बलाढय़ वीरांना, कबरेच्या रूपाने, कशी गिळून टाकते ते सांगणारे हे कवीचे भाष्य! हा शेर ऐकला की, मला प्रथम आठवतो तो माझा भाऊ पमा! तो पुण्याच्या टेल्को कंपनीत काम करीत होता. तेव्हा द्रवरूप साबण कुठेच नव्हता. टेल्कोच्या कारखान्यात कामगारांना घरी परत जाताना हातपाय धुवायला साबणाची एक वडी दिली जायची. रोज नळांवर ह्या साबणाचा उरलेला भाग फेकून दिला जायचा. ही लाखो रुपयांची नासधूस भावाला पटायची नाही. जर साबणाचे द्रवरूप तयार केले तर ते बाटलीत ठेवता येईल. कामगार हातावर ओतून घेतील आणि बाटली पुन्हा ठेवू शकतील. प्रचंड नासधूस टळेल आणि कंपनीचे पैसे वाचतील या विचाराने भावाला घेरले. त्याच्या पुण्यातल्या घरीच त्याने प्रयोग करून १९७९च्या आसपास स्वत:ही लिक्विड सोप तयार केले. त्याचे उत्पादन आपण औद्योगिक स्तरावर करावे अशी महत्त्वाकांक्षा त्याच्या मनात निर्माण झाली. पण स्वत:चा कारखाना काढायचा म्हणजे मोठे भांडवल हवे, जागा हवी. एका तरुण कामगाराकडे किंवा त्याच्या वडिलांकडेही एवढा पैसा कुठून असणार? त्याने अनेक बँकांत प्रयत्न केले. पण कर्जासाठी तारण म्हणून काहीही देऊ न शकणा-या सामान्य माणसाला इतके मोठे कर्ज देणार कोण? तेव्हा बँकांत हल्लीसारखे फोन करून ‘कर्ज घ्या हो’ म्हणण्याची पद्धत नव्हती. उलट कर्जदाराला हजार चकरा माराव्या लागत. अर्थात पमाचे काम काही झाले नाही.
भावाची प्रत्येक कल्पना अफाट असे. तो आम्हाला त्याच्या अशा इनोव्हेशनच्या अनेक कल्पना बारकाईने समजावून देत असे. रोजच्या जगण्यात येणा-या प्रत्येक समस्येवर तो उपाय शोधायचा, तोही तंत्रज्ञानातून! पुण्याच्या गावाबाहेरील औद्योगिक भागात रिक्षाची वाट पाहत असताना अनेकदा ती भरून येत असे आणि दुरून हात करूनही शेवटी प्रवाशाच्या नशिबी निराशा येई. हा अनुभव पहाटे लवकर किंवा रात्री उशिरा प्रत्येकाने घेतलेला असतो. पण आज पमाला जावून कितीतरी वर्षे झाली तरीही त्यावर कुणीही इलाज शोधलेला नाही. पमाने एक अगदी छोटे उपकरण तयार केले होते, जे रिक्षाला लावले तर रस्त्यावर वाट पाहणा-या प्रवाशाला रिक्षाची मागील आसने मोकळी आहेत की भरलेली ते अंधारातही दुरून कळू शकणार होते. पुन्हा या उपकरणाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर करायचे म्हणजे भांडवल लागणार. तरीही पमाने त्याच्या परीने सर्व प्रयत्न केले. शेवटी सगळे अडायचे ते पैशापाशी. आपल्या उत्पादनाचे औद्योगिक जगातील जबरदस्त पोटेन्शियल समजलेला पमा मग हळूहळू खचत गेला आणि वयाच्या केवळ ३४ व्या वर्षी हृदयविकाराच्या पहिल्याच झटक्यात त्याचे देहावसान झाले.
ससून हॉस्पिटलच्या शवागरातून त्याचे पार्थिव ताब्यात घेताना सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यावरही मीसुद्धा सरकारी रुग्णालयांतील रितीरिवाजाप्रमाणे तिथल्या कर्मचा-याला भावाचा देह ‘‘ताब्यात देण्यासाठी’’ दारूच्या एका क्वार्टरचे पैसे दिले होते. आज जेव्हा मी ‘‘चढता सुरज धीरे धीरे ढलता हैं, ढल जायेगा’’ या कव्वालीच्या आधीचा हा शेर ऐकतो तेव्हा पमाचा तो ससूनमधला थंडगार देहाचा गोठवून टाकणारा स्पर्श मला आठवतो!
ही कव्वाली ऐकताना, घरच्या जिवलग माणसांपासून अगदी प्रसिद्ध अशा व्यक्तीपर्यंत, अनेकांचे चेहरे माझ्या डोळ्यांसमोरून तरळून जातात. दुसरा चेहरा दिसतो तो रणरागिणी स्व. इंदिराजींचा! कोटय़वधी भारतीयांच्या मनावर राज्य करणारी, खुद्द अटलजींनी गौरविलेली ही दुर्गामाता! पण त्यांचा अंत केवढा करूण झाला होता! ज्या तत्त्वांसाठी त्यांनी आयुष्य वेचले ते त्या शेवटपर्यंत जगल्या आणि शेवटी त्याच उदात्त तत्त्वाने त्यांचा बळी घेतला! सुरक्षेतील ‘‘त्या दोघा’’ रक्षकांना काढून टाका किंवा त्यांची किमान बदली तरी करा असा सल्ला इंदिराजींना गुप्तहेर संस्थांनी दिला होता असे म्हणतात. मात्र, सर्व धर्माच्या व्यक्तींवर माझा सारखाच विश्वास आहे. कुणाच्या धर्मामुळे त्याची माझ्या सुरक्षा व्यवस्थेतून बदली होणार नाही, असे ठामपणे सांगून स्व. इंदिराजींनी ते अस्तनीतले निखारे तसेच जवळ ठेवले. शेवटी कोणतीही दयामाया न दाखवता त्या नराधमांनी आपल्या उपकारकर्त्यांचा बळी घेतलाच. म्हणजे पुन्हा ‘‘जमी खा गयी नौजवा कैसे कैसे.’’ अमेरिकेच्या डोळ्यांत डोळे घालून पाहणा-या धाडसी इंदिराजींचा देह त्यांच्या बंगल्याच्या आवारातील जमिनीवर कोसळलाच ना!
आज पुन्हा या कव्वालीची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवा झालेले स्व. अटलजींचे दु:खद निधन! खरे तर अटलजी ९३ वर्षाचे होते. म्हणजे त्यांचे जीवन जगून झाले होते. कोणत्याही निकषानुसार ते दीर्घायुच म्हटले पाहिजेत. परंतु, काही व्यक्ती आपल्याला नेहमीच हव्या असतात. त्या आपल्या जीवनातून कधीच जाऊ नयेत असे वाटत असते. अशा व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेतरी नुसत्या आहेत ही जाणीवसुद्धा फार सुखद आणि आश्वासक असते. माणसाला आतून भावणा-या, पण स्वत: अंगीकारता न येणा-या उदात्त जीवनमूल्यांची जपणूक करणारे असे लोक फार विरळ असतात. ते लोक म्हणजे समाजाचा सांस्कृतिक ‘‘सेफ डीपॉझिट व्हॉल्ट’’च असतो. जे अनमोल आहे, आपल्याला सांभाळता येणारच नाही, अशी भीती वाटते. मात्र, जे टिकलेच पाहिजे ते आपण अशा सेफ ‘‘डिपॉझिट व्हॉल्ट’’मध्ये ठेवून देत असतो. मग आपली अनमोल दौलत इथे सुरक्षित आहे असे आपल्याला वाटते. स्व. अटलजी असेच होते. भारतीय राजकारणातील सुसंकृपणाच्या वारशाचा अटलजी हा शेवटचा मालुसरा होते. इंग्रजीत म्हणतात तसे “The last Roman”
अनेक चढउतार पाहिलेल्या अटलजींना यश दिसले ते जनता पक्षाचे सरकार आल्यावर, पण लगेच ते पडलेही! पुन्हा मोठा काळ वनवासात घालवून अटलजी पंतप्रधानपदी विराजमान झाले. एकदा नाही तर तीनदा. पण त्यातही त्यांना मानवी स्वार्थाच्या क्षुद्रपणाचे अनेक अनुभव घ्यावे लागले. थकलेला, निराश झालेला, उमद्या मनाचा हा कवी शेवटी मौनात गेला. ते देशातील राजकारणाची अवनती पाहून मनातूनच खचले असावेत. शेवटी शेवटी त्यांना स्मृतिभ्रंशाने पछाडले. परवा त्यांनी जगाचा निरोप घेतला. एका दुर्लक्षित विचारधारेला शून्यातून उभे करणा-या, पंतप्रधानपदापर्यंतचा मोठा सन्मान मिळवून देणा-या दिलदार माणसालाही शेवटी जमिनीने गिळलेच!
एकापेक्षा एक कव्वाल्या लिहून जगाचे मनोरंजन आणि उद्बोधन करणारे अजीझ नाझासुद्धा ८ ऑक्टोबर १९९२ ला गेले. त्यांनाही शेवटी कबरीने गिळलेच. आज त्यांचीच ही कव्वाली जीवनाचे हे विदारक अंतिम सत्य आपल्याला पुन:पुन्हा सांगत राहते. त्यांचे अजरामर शब्द मनात रेंगाळत राहतात –
‘‘तू यहाँ मुसाफिर है ये सराये फानी है
चार रोज की मेहमां तेरी जिन्दगानी है
जर जमीं जर जेवर कुछ ना साथ जायेगा’’
या कव्वाली अटलजींसाठीच लिहिल्यात अशा वाटाव्या, अशा दोन ओळी आहेत –
‘‘आज तक ये देखा है पानेवाले खोता है
जिन्दगी को जो समझा जिन्दगी पे रोता है’’
अटलजींचे शेवटचे दीर्घ मौन हे असेच ‘‘जिंदगी को जो समझा जिंदगिपे रोता है’’ वर्गातले होते. भारताच्या त्या सुपुत्राला पुन्हा शतश: नमन!