सध्या भारतात सर्वत्र चिनी वस्तूंनी कब्जा केला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी किमतीमध्ये नावीण्यपूर्ण मांडणी आणि उत्कृष्ट सजावट असल्याने साहजिकच चायनिज माल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पहिली पसंती मिळत आहे.
यामध्ये चिनी बनावटीचं पिस्तूल, मोबाईल, कॉम्प्युटर, अन्य इलेक्ट्रिक तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू, फटाके सर्वच आलं. त्यामुळे शिवा गिरकराच्या थोरल्या पोराने म्हणजेच राकेशने गावात चायनिज माल आणल्याचे कळल्यावर बेरडवाडीतल्या तरुण पोरांमध्ये उत्साह आला. बाबू गेंडय़ाने ही बातमी तातू बावधनकराच्या हॉटेलमध्ये दिली तेव्हा तात्या वाणी, राजू बांवकर, दत्या घरकर, किशोर नेपाळी वगैरे मंडळी जैतापूरच्या ऊर्जा प्रकल्पावर सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा करत होते. पण बाबूने ही बातमी सांगितली तेव्हा देशाभिमान बाळगणा-या तात्या वाण्यानी पहिली तोफ डागली. ते म्हणाले,
‘त्या राकेशाक पयला व्हानेन माराक व्हया. खरा म्हंजे चीन हय़ों हिंदुस्थानाचो मोटो शत्रू आसा. आतसून ढवळाढवळ करीत तो आपल्या देशाची अर्थयवस्था बिघडव्न टाकता हा. आनी त्या शिवा गिरकराच्या पोरान आपल्या देशाची अर्थयवस्था खिळखिळी करूचो इडो उचलल्यान की काय?’
‘अवो पन तात्यांनू, चीन हय़ों भारताचो सहकारी आसा. आनी ता सांगासाठी चीनचे पंतप्रधान भारत भेटीक येव्क निघाले हत.’ राजू बांवकराने तात्यांना शांत करण्याच्या आणि त्याबरोबरच आपल्याला फार काही माहिती असल्याच्या अशा दोन्ही उद्देशाने माहिती दिली. पण यावर गप्प बसतील तर ते तात्या कसले? भजीबरोबर आलेली कच्ची मिरची कचाकचा चावत ते राजूच्या अंगावर गेले आणि म्हणाले,
‘राजू, तुका हय़ेच्या भुतूरची कायव गती नाया. ते हिंदुस्थानात येतले तेवा ते पाकिस्तानातव जानार आसत. कारण पाकिस्तान हय़ों चीनचो जनो मित्र आसा. हय़ेच्यातच तू काय ता समजान जा.’
‘अवो पन तात्या, ता आपनाक काय करूचा हा? स्वस्त्यात एकादी वस्तू गावत आसली तर ती सोडूची कित्या? अवो, भारतात गावनारो सात हजाराचो मोबाय्ल मेड इन चायनाचो तीन हजाराक गावता हय़ों फायदा कोनाचो?’
‘तुज्या आवशीच्या घोवाचो!’ तात्यांनी आपल्या धारदार शब्दांनी किशोर नेपाळय़ाच्या थोबाडात मारली. पण किशोर नेपाळी त्यामुळे अधिकच पेटून उठला आणि म्हणाला,
‘तात्यांनू, तुमका काय करूचा हा ता तुमी करा. पन राकेश गिरकरान हाडलेली एखादी चायनाची वस्तू माका पसंत पडली तर, ती आपन घेव्न टाकनार.’
‘अरे, चायनाचो माल कोन घेता ताच मी बगतंय. घेना-याचे आनी इकना-याचे दोगवांचे तंगडे नाय तोडान टाकलंय तर नावाचो तात्या वाणी नाय.’
असं म्हणून तात्या उठले आणि राकेश गिरकराच्या घराकडे जायला निघाले. पण एवढय़ात घराकडून परत आलेल्या बाबू गेंडय़ाने तात्यांना थांबवलं आणि विचारलं,
‘तात्यांनू, तुमी तावातावान खंय चल्लास?’
‘खंय म्हंजे? चायनाचो माल हाडलेल्या त्या शिवाच्या पोराचो चांगलो समाचार घेव्न येतंय.’ तात्यांच्या या बोलण्यावर बाबू गेंडय़ा म्हणाला,
‘तात्यांनू, माजा आयका आनी जाव नका. राकेशान चायनाचो डुप्लीकेट माल हाडल्यान हा.’
‘आयकलास काय रे? एक तर चायनाचो माल आनी तो सुद्धा खोटो! म्हणान सांगा होतंय की, वगीच पैशे फुकट घालव नूको.’ बाबूच्या बोलण्याने तात्यांची पॉवर वाढली. पण त्यांना थांबवित किशोर नेपाळय़ाने बाबूला विचारलं,
‘बाबू, राकेशान चायनाचो डुप्लीकेट माल हाडल्यान हय़ां तुका कसा समाजला?’
‘कसा म्हंजे! चेह-यावरसून कळला.’
‘कोनाच्या चेह-यावरसून? राकेशच्या?’ इति. किशोर नेपाळी.
‘अरे फुकन्या, राकेशच्या चेह-यावरसून कसा कळतला? त्येना हाडलेल्या पोरीच्या चेह-यावरसून माका कळला.’ बाबू गेंडय़ाने असं विचित्र काहीतरी सांगितल्यावर तात्या वाण्यासह हॉटेलातले सगळेचजण संभ्रमात पडले. बाबू काय बोलतोय तेच कुणाला समजत नव्हतं. शेवटी आपली सहनशक्ती संपुष्टात आल्यावर राजू त्याला म्हणाला,
‘बाबू, तू आमका यवस्तित काय ता सांग रे! हकडे चायनाच्या मालान तात्यांचो जीव जाय्त चल्लो हा.’ राजूच्या बोलण्यावर बाबू थोडा वेळ थांबला. आपल्या सुटलेल्या पोटावरून काही वेळ त्याने हात फिरवला आणि मग म्हणाला,
‘अरे बाबानो, राकेश गिरकरान चायनाचो माल हाडल्यान म्हंजे चायनीज पोरीशी लगीन करून तो त्येका घेव्न गावात इलो हा. पन ती डुप्लीकेट आसा. म्हंजे दिसता चायनिज पोरीसारी! गोरी पान, नाक चपटा, डोळय़ारच्या भुवयांचो पत्तो नाय. पन यवस्तित बगितल्यार ती गावठीच असल्याचा लक्षात येता. आपल्या जिल्हय़ातलीच हा ती! समाजला?’ बाबू गेंडय़ाने राकेश गिरकराच्या चायनिज मालाची अशा प्रकारे चिरफाड केल्यावर सगळय़ांनीच आपापल्या कपाळावर हात मारून घेतला. बाबूच्या स्पष्टीकरणाने तात्यांचा चेहरा मात्र गिलीट उडालेल्या दागिन्यांसारखा झाला. थोडय़ा वेळाने किशोर नेपाळी तात्यांना म्हणाला,
‘तात्यांनू, आता या गावठी चायनिज मालाचा तुमी काय करतलास?