देशाच्या अर्थव्यवस्थेला येत्या काळात आणखी समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
नवी दिल्ली- देशाच्या अर्थव्यवस्थेला येत्या काळात आणखी समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. उच्चस्तरावरील व्याजदर आणि भाववाढीचा फटका ऑक्टोबर-नोव्हेंबर या चौथ्या तिमाहीतही उत्पादन क्षेत्राला बसण्याची शक्यता असल्याचे भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) केलेल्या एका पाहणीत समोर आले आहे.
सीआयआय आणि एस्कॉन यांनी ११० क्षेत्रांची कामगिरीचे विश्लेषण आपल्या पाहणी अहवालात केले आहे. यात कमी विकास दर ते नकारात्मक विकास नोंदवणाऱ्या क्षेत्रांचे प्रमाण ५६.४ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत हेच प्रमाण ४८.६ टक्के एवढे होते. तर उणे विकास नोंदवणा-या क्षेत्रांमध्ये १७.१ टक्क्यांवरून २०.८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांचाही फारसा परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
औद्योगिक क्षेत्राचा विकास पूर्वपदावर आणण्यासाठी आरबीआयने रेपो दरात कपात करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक, मौद्रिक आणि प्रशासकीय उपाययोजनाच औद्योगिक क्षेत्राला तारू शकतात, असे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनवाढ ०.४ टक्क्यांनी घटली होती. बांधकाम उपकरणे, मशिन उपकरणे, ट्रान्सफॉर्मर्स, वस्त्रोद्योग मशिनरी आणि ट्रॅक्टर या क्षेत्रांची कमी विकासातून उणे विकासात घसरण होण्याची शक्यता आहे.