ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात दिवसागणिक सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.
ठाणे – ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात दिवसागणिक सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. गेल्या दहा महिन्यात अशा ३ हजार ५७४ घटना घडल्या असून यात चोरटय़ांनी ३८ कोटींवर डल्ला मारला आहे. त्यामुळे या घटना रोखणे पोलिसांच्या दृष्टीने अवघड जागेचे दुखणे ठरत आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरात ३३ पोलीस ठाणी येत आहेत. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दिवसागणिक सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, घरफोडीच्या घटना घडत आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत या घटना वाढल्या असून एकूण ३ हजार ५७४ अशा प्रकारच्या घटनांचे अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या सर्व घटनांत ३८ कोटींचा माल चोरटय़ांनी रफूचक्कर केला आहे. यातील फक्त १८ टक्के गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. तर ८३ टक्के गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नाही.
मालमत्तेची वासलात सोनसाखळी चोरीत चोरलेल्या, घरफोडीत चोरलेल्या ऐवजांची वासलात ही चोर मंडळी ते वितळून लावत आहेत. तर दुचाकी व चारचाकी चोरलेल्या गाडय़ा बाहेरच्या राज्यात विकण्यात येतात. त्यामुळे या चोरांच्या मुळाशी पोहोचणे पोलिसांना अवघड होत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी सोनसाखळी चोरींच्या घटनांचा अभ्यास करून आंबिवली येथील इराणी टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. पण त्यानंतरही शहरात एकटय़ा जाणा-या महिलांना लुटण्याच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे अशा घटनांवर पायबंद घालणे पोलिसांच्या दृष्टीने अवघड होत आहे.
खब-यांचे जाळे उसवले
शहरात कोणतीही घटना घडल्यानंतर पोलीस आरोपींचा माग काढून त्यांना अटक करायचे. यामागे पोलिसांच्या खब-यांच्या जाळ्याची महत्त्वाची भूमिका असायची. पण सध्या खब-यांचे जाळे उसवू लागल्याने पोलिसांना आतल्या खबरी पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे पोलीस आयुक्तालय परिसरात अशा घटना वाढत असल्याचे बोलले जात आहे.