घर असो की, नोकरी किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो महिलांचा प्रवास आजही संघर्षमयच आहे. त्यात विवाहित महिलांसाठी घरसंसार, नोकरी सांभाळून हा संघर्ष करावा लागत असल्यामुळे तो अधिकच तीव्र बनतो. मात्र, अडचणी आहेत, म्हणून हा संघर्ष मध्येच सोडून माघारी फिरण्याचे प्रसंग त्यांच्याही आयुष्यात येतात.पण संघर्ष अर्ध्यावरच सोडला तर पुढे जाता येत नाही आणि टप्प्यात असणारा विकास करणेही शक्य होत नाही.
नकारात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ केला जात नाही. एकदा का स्वत:ला ओळखले, स्वत:च्या मर्यादा जाणल्या की, आकाश पेलायला स्त्री तयार होते. या सगळय़ा जीवनप्रवाहात त्यांच्या समंजस जोडीदाराचा सहभागही मोठा असतो.
‘प्रहार’ कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्ताने शनिवारी अशाच संघर्षातून प्रगती केलेल्या, संसार सांभाळून छंदातून स्वत:साठी आणि इतरांसाठी आनंद निर्माण करणा-या तीन कर्तृत्ववान महिलांचा प्रवास अनौपचारिक गप्पांमधून उलगडला.
वसई-विरार महानगरपालिकेच्या उपायुक्त आणि ‘हुमान’ या पुस्तकाच्या लेखिका संगीता धायगुडे, सिव्हिल इंजिनीअर असूनही स्वत:ची खरी ओळख वास्तुरचना छायाचित्रणातून मिळवणा-या सतेजा राजवाडे आणि रत्नागिरीसारख्या जिल्हय़ात जिथे शास्त्रीय संगीतासाठी श्रोतेही सापडत नसत तिथे संगीताचे विद्यापीठ बनावे, अशी आकांक्षा बाळगणा-या मुग्धा भट-सामंत यांचा प्रवास समाजातील सगळय़ांसाठीच प्रेरणादायी आहे.
संगीता धायगुडे. दिसायला इतरांसारख्याच सर्वसामान्य. मात्र, त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि त्यांच्या अनुभवांनी उपस्थितांची मनोवस्था बदलून गेली. आपल्या धीरगंभीर आवाजात त्यांनी सहजसुंदर संवाद साधला. साता-यातील आंधळी गावातील एक मुलगी ते एक कुशल प्रशासकीय अधिकारी असा त्यांचा प्रवास ‘हुमान’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी रेखाटला आहे.
मात्र, हा नुसताच संघर्ष आणि वेदनेचा प्रवास नाही तर संघर्षावर मात करणारा साधना करून प्रगतीचा मार्ग स्वत:च निर्माण करणारा हा जीवनप्रवास आहे. वाचन आणि सतत नवीन शिकत राहणे हाच त्यांचा ध्यास आहे. त्यातूनच प्रगतीचे दरवाजे उघडतात. वाचनाच्या आवडीने त्यांच्या आयुष्याला आधार तर दिलाच पण सकारात्मक विचार करायला शिकवले. ख-या अर्थाने जगायला शिकवले, हे सांगणा-या धायगुडे मॅडमबरोबर ऐकणारेही एकरूप झाले.
वाचनामुळे ख-या अर्थाने मी घडले असे संगीता धायगुडे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘दहावीला असताना माझे लग्न झाले आणि मी मुंबईकर झाले. लग्नापर्यंत मी अभ्यासाव्यतिरिक्त कोणतेही पुस्तक वाचले नव्हते. लग्नानंतर पहिल्याच रात्री पतीने मला विचारले. तुम्ही काय वाचता? मी म्हणाले, ‘काहीही!’ नव-याने काही पुस्तके आणून दिली आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री या सकाळी तीन-साडेतीन वाजेपर्यंत वाचत बसले. अर्थात मला माझा जोडीदार अत्यंत समजूतदार मिळाला होता. त्याने मला कधी वाचनावरून आडकाठी केली नाही. चपाती करपली, भात लागला किंवा भाजी करपली, याच्याबाबत कधीही कुरकुर केली नाही.
मला नवनवीन पुस्तके देत गेला आणि मी वाचत गेली. वाचनाची भूक एवढी जास्त होती की, मी दिवसाला ३०० ते ४०० पानांचे पुस्तक सहज वाचून काढू लागले. विविधांगी वाचन होऊ लागले. स्वत:च्या क्षमतांचा वेध घेण्याची सवय लागली. नव-याच्या आग्रहामुळेच पुन्हा शिक्षण सुरू केले. मात्र, पदवीचे शिक्षण सुरू असतानाच माझ्या नव-याचे अकाली निधन झाले. तो माझ्यासाठी सगळय़ात मोठा धक्का होता. दोन मुलांची जबाबदारी माझ्यावर होती.
नवरा पोलिस दलात असल्यामुळे मला पोलिस कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी मिळाली. मात्र, ही नोकरी म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व नव्हते. मला त्याहीपलीकडे जाऊन स्वत:ला सिद्ध करायचे होते. या सर्व काळात मला वाचनाचे साथ झाली. गंभीर वाचन करणा-या मला कोणीतरी व. पु. काळे वाचण्याचा सल्ला दिला. अध्यात्म आणि व्यवहार यांची सांगड घालणा-या
वपुंच्या वाचनामुळे मला मानसिक उभारी मिळाली. याच काळात ‘एमपीएससी’ची परीक्षा द्यायला हवी, असे ठरवले. मात्र, ‘एमपीएससी’ म्हणजे अत्यंत कठीण परीक्षा. आतासारख्या त्या काळात नोट्स किंवा त्यासाठीची पुस्तके उपलब्ध नव्हती. दरीत उडी घ्यायची असेल तर मग दरी किती खोल आहे ते का पाहावे? असा विचार करून ‘एमपीएससी’ देण्याचा विचार केला. त्यासाठी दिवसातील २० तासांचं नियोजन केलं.
नोकरीला जाताना लोकलमध्ये, तिथून पुढे कार्यालयात जाईपर्यंत, पुन्हा नोकरीवरून सुटल्यानंतर लोकलमध्ये आणि घरी आल्यावर खातानाही ही एका हातात पुस्तक घेऊन ‘एमपीएससी’चा अभ्यास केला. घर आणि मुले सांभाळत हा खडतर संघर्ष सुरू होता. त्याचे फळ मला मिळाले. साडेतीन-चार लाख विद्यार्थ्यांमधून १८२ मुलांची निवड केली जाणार होती आणि मी ती परीक्षा पास झाली. हे सगळे वाचनामुळे शक्य झाले.
वाचनामुळे हा संघर्ष करू शकले. चरित्र वाचनातून, कथा-कादंब-यामधून अनेक कणखर व्यक्तिमत्त्वांचा परिचय झाला होता. त्यांच्या संघर्षातून आणि त्यांनी मिळवलेल्या यशापासून मला ख-या अर्थाने प्रेरणा मिळत होती. त्यानंतर मी मराठीतून एमए केले. आता मला पीएच.डी. करायची आहे. वाचनामुळेच मला शिक्षण घेण्याची प्रचंड जिद्द निर्माण झाली आणि ती आजही कायम आहे.
वाचाल तर वाचाल, हे म्हटले ते योग्यच आहे. वाचनामुळेच मी स्वत:ला सिद्ध करू शकले. शिकण्याचा माझा हा प्रवास सुरूच आहे. आज राज्याला कुशल प्रशासकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे मी युवा वर्गाकडून मोठी आशा बाळगते की, त्यांनी ‘एमपीएससी’ किंवा स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे आणि लोकांची सेवा करावी.’ जीवनाच्या संघर्षात वाचनाची साथ किती सकारात्मक बदल घडवू शकतात, जीवनाला सकारात्मक दिशा देऊ शकते, याची प्रचिती यांच्या व्यक्तिमत्त्वातून येते.
प्राचीन संस्कृती आणि धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या मंदिरे, लेणी यांना केंद्रस्थानी ठेवून आर्किटेक्चरल फोटोग्राफी करणा-या सतेजा राजवाडे या सिव्हिल इंजिनीअर आहेत. वास्तुरचनेशी त्यांचा घनिष्ट संबंध. त्यातूच त्यांना आर्किटेक्चरल फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. आज त्यांच्या वास्तूशी संबंधित फोटोग्राफीने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. वास्तूंची रचना, त्यांची संकल्पना त्यांच्या कॅमे-यातून विविध प्रकारे त्या मांडतात. प्राणी, पशू, पक्षी यांच्या कॅमे-यातून दिसतातच. वन्यप्राणी, आकाशातून छायाचित्रण यांच्यात स्पेशेलायजेशन करणारे आहेत.
सतेजा राजवाडे यांचे स्पेशेलायजेशन हे वास्तुरचनेशी संबंधित छायाचित्रणात आहेत. ‘आज प्रत्येकाचे आयुष्य धकाधकीचे झाले आहेत. लोकांमध्ये प्रचंड ताण आहेत. काही लोकांना तो सहन न झाल्यामुळे समाजात अनुचित प्रकार घडतात. मात्र, जीवनातील ताणावर मात करण्यासाठी छंद हा एकमेव उपाय आहे, असे मला वाटते. छंदामुळे तुम्हाला तुमची ख-या अर्थाने ओळख पडते. तुमची आवडनिवड कशात आहे आणि तुम्ही कशात रमता, हे समजते. आज राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मी माझ्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवते. येणा-या काळात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवण्याचा मानस आहे.’ छायाचित्रणासाठी त्यांची देशभरात विविध ठिकाणी भ्रंमती सुरू असते. त्यामुळे आजची परिस्थिती पाहता महिलांनी स्वसंरक्षण शिकून घेणे आवश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.
लग्नानंतर पुण्यातून रत्नागिरीत आलेल्या शास्त्रीय गायिका मुग्धा भट-सामंत यांचा सांगीतिक प्रवास तर श्रोत्यांविना अडला होता. रत्नागिरीत शास्त्रीय संगीताचे विद्यालय नसल्यामुळे त्यांनी आपला हा छंद कायमचा थांबवण्याचा निर्णय घेतला होता. कारण श्रोतेच नसतील तर मग गायचे कोणासाठी? त्यापेक्षा गायन बंद करावे, असा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, पतीने त्यांची समजून काढली. त्या अगदी वयाच्या ९ व्या वर्षापासून शास्त्रीय संगीत शिकल्या होत्या. त्यामुळे एवढय़ा कष्टाने शिकलेली ही पारंपरिक कला फुकट जाईल, असे त्यांनी सांगितले.
फक्त तेवढेच न करता रोज पहाटे त्यांनी रियाज करण्यासाठी मुग्धा यांना सकाळी पाच वाजता उठवायला सुरुवात केली आणि आज हा छंद एक कारकिर्दीमध्ये बदलला आहे. ‘माझ्याकडे आज ३ वर्षापासून ६० वर्षापर्यंत गाणे शिकायला माणसं येतात. शिकायची इच्छा असते पण घर लांब असल्यामुळे येता येत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवत असे. तिथे एसटीची सुविधा नसायची. आज मुले माझ्याकडे गाणे शिकायला येतात.
मुलांमध्ये शास्त्रीय गाण्यांसाठी आवड निर्माण व्हावी, यासाठी मी भावगीतही शिकले. मुलांना त्यांच्या कलेने शिकवता आले पाहिजे, त्यासाठी मी ते शिकले. २०००पासून मी माझ्या ‘खल्वायन’ या संगीत संस्थेच्या माध्यमातून गरीब आणि गुणी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून होणा-या कार्यक्रमातून शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठांची सांगीतिक मैफल मी घेत असते.
पूर्वी एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये रत्नागिरीत आलेल्या मुलांना डावलले जायचे. मुंबई आणि पुण्याकडील मुलांना प्राधान्य दिले जायचे. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भविष्यात रत्नागिरीत संगीत विद्यापीठ व्हावे, अशी माझी इच्छा आहे.’ मुग्धा भट-सामंत यांच्या अथक प्रयत्नामुळे आज रत्नागिरीत शास्त्रीय संगीताचा प्रवाह जोरदार वाहू लागला आहे. भविष्यात रत्नागिरीत संगीत विद्यापीठ बनले तर त्यात मुग्धा यांचा सिंहाचा वाटा असेल, यात शंकाच नाही.
‘हुमान’मधील अनुभव मनात साठवून ठेवण्यासारखे!
वेदना, संघर्ष आणि त्यातून तावलून-सुलाखून बाहेर पडलेली व्यक्ती म्हणजे संगीता धायगुडे. वेदना आणि संघर्षाने त्यांचे आयुष्य घडले. दादरच्या एका ग्रंथ विक्री केंद्रात ‘हुमान’ या पुस्तकाची आणि माझी ओळख झाली. मी ते विकत घेतलं. वाचायला सुरुवात केल्यावर कुठेही न थांबता सलग वाचतच राहिले. यातील प्रत्येक अनुभव मला भिडला, भावला आणि त्याचबरोबर काही ना काही शिकवत राहिला. त्यातील प्रत्येक अनुभव मनात साठवून ठेवण्यासारखे आहेत.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी गावातील एका मुलीचे हे आत्मचरित्र. त्यांचे बालपण, बालवयात मामांच्या घरी राहून घेतलेलं शिक्षण, त्यानंतर शाळकरी वयातच झालेलं लग्न, त्यामुळे अपूर्ण राहिलेलं शिक्षण, दोन मुलांच्या जन्मानंतर पतीचं आजारपण आणि त्यातच पतीचा अकाली मृत्यू हे सोसून पुढे जाणारी स्त्री ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी हा त्यांचा प्रवास यात उलगडतो.
नकारात्मक परिस्थिती, खिन्न, उदास झालेलं मन, अनेक अडचणी, जगण्याची इच्छा नाहीशी होणं, या सर्वातून मार्ग काढत आयुष्यानं घातलेल्या अनेक हुमानांना (कोडय़ांना) त्या सामोऱ्या गेल्या. त्यापैकी राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेच्या रूपाने त्यांच्यासमोर एक मोठे हुमान उभं राहिलं. या हुमानालाही त्यांनी आव्हान देण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी रोजच्या २० तासांच्या अभ्यासाचं नियोजन केलं. याव्यतिरिक्त बातम्या ऐकणं, पेपरवाचन इत्यादी केलेलं अभ्यासाचं नियोजन यामुळे परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्या पास झाल्या.
सहनशीलता, चिकाटी, धाडस, नेतृत्व गुण आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी असे बरेच गुण त्यांच्याकडून घेण्यासारखे आहेत. हे पुस्तक वाचताना तुम्ही इतकं समरसून जाता की, तुम्ही आपसूक भावुक बनता. मात्र, या आत्मचरित्राची शक्ती इतकीच नाही. जीवनात येणाऱ्या नकारात्मक प्रसंगांवर मात करता येते आणि प्रचंड जिद्दीनं आपले ध्येय गाठता येतं, हे हात धरून सांगणारं हे आत्मचरित्र आहे.
पत्नी, प्रेमळ आई आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी अशा आयुष्यातील सगळय़ाच भूमिकांना धायगुडे मॅडम न्याय देतात. एका महिलेच्या जिद्दीची, कष्टाची ही कहाणी या पुस्तकाच्या माध्यमातून वाचायला मिळाली. त्यांचे हे आत्मचरित्र सर्वच महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
(‘हुमान’ वाचल्यानंतर ‘प्रहार’च्या नमिता वारणकर यांनी व्यक्त केलेले मनोगत.)