पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला पुन्हा एकदा अंधारात आहे.
पेण- पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला पुन्हा एकदा अंधारात आहे. त्यामुळे गडप्रेमींमध्ये मोठया प्रमाणात नाराजीचा सूर आहे. काही दिवसांपुर्वी वीज बिल न भरल्याने वीज मंडळाने गडावरील वीज पुरवठा खंडीत केला होता. त्यानंतर २९ हजारांचे किल्ल्याचे वीज बिल पनवेल येथील एका शिवप्रेमीने भरले होते.
हे प्रकरण तेव्हा थेट राज्यपालांपर्यत पोहोचले होते.नंतर रायगडच्या पत्रकारांनी या विषयी आवाज उठवला. एक दिवस गडावर मुक्काम ठोकून तेथील स्थिती अनुभवली. अंधाराच्या साम्राज्यात असलेल्या या किल्ल्याबाबत पत्रकारांनी पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेला निवेदन दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेने गडावरील होळीचा माळ, राज दरबार आणि समाधी स्थळाजवळ सौर उर्जेवर चालणारे दिवे बसवले. त्यामुळे गडावर थोडा उजेड झाला.
मात्र हे दिवे पुरातत्व विभागाच्या डोळ्यात खुपत होते. त्यांनी हे दिवे काढले तसेच हत्तीखाना परिसरात नेऊन ठेवले. त्याने महाराजांचा रायगड पुन्हा एकदा अंधारात गेला. स्वत: काही करायचे नाही. इतरांनाही काही करू द्यायचे नाही’ ही पुरातत्व विभागाची पध्दत आहे. या विरोधात आता कोकण कडा मित्र मंडळ रस्त्यावर उतरत आहे. मंडळाचे मार्गदर्शक दीपक शिंदे आणि अध्यक्ष सुरेश पवार यांनी २ ऑगस्टपासून चितदरवाजा येथे साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
एमटीडीसीच्या रूम्सवर पत्रे टाकायलाही पुरातत्व विरोध केला आहे. अनेक शिवभक्त रात्री या खोल्यात मुक्काम करत असतात. त्याची ही सोयही नष्ट करण्याचा डाव पुरातत्व विभागाचा आहे. किल्ल्यावरचा कचरा महाडचे महसूल खाते आणि स्वयंसेवी संस्थाच्या पुढाकारानं साफ केला जातो.
तेव्हा पुरातत्व खाते कुठे दिसत नाही. फक्त करातून मिळणारा पैसा वसूल करण्याचे काम हे खातं करीत आहे. गडावर दररोज हजारो शिवभक्त,पर्यटक आणि अभ्यासक येत असतात. गडावरची अनास्था पाहून हे सारेच अस्वस्थ होतात. या विरोधात अनेकदा चर्चा झाली, वाद झाले मात्र, आता पुरात्तव खाते साखळी उपोषणाची दखल घेते की त्याकडं दुर्लक्ष करून गडावर अंधार कायम ठेवते ते पहायचे आहे.