मुंबई आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी तानसा धरणातून आलेली जलवाहिनी सोमवारी दुपारी ठाण्यातील वर्तकनगर येथे फुटली.
ठाणे- मुंबई आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी तानसा धरणातून आलेली जलवाहिनी सोमवारी दुपारी ठाण्यातील वर्तकनगर येथे फुटली. यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला.
ही जलवाहिनी फुटल्याने ठाणे आणि मुंबई उपनगरांमध्ये पुढील दोन दिवस १९ आणि २० ऑगस्ट रोजी पाणीकपात होणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क अधिका-यांनी दिली.
मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरांमध्ये २५ टक्के पाणी कपात केली आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. पाईपलाइन दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणारी १८०० मि.मी व्यासाची जलवाहिनी सोमवारी दुपारी ठाणे येथील वर्तकनगर भागात फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून जात येथील परिसर जलमय झाले. येथील काही भागांमध्ये पाणी साचून अनेकांच्या घरातही गेल्याचे वृत्त आहे.
दरम्यान महापालिकेच्या जलअभियंता विभागाने, जलवाहिनी दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या जलवाहिनीतून पुरवठा होणारे पाणी दोन्ही बाजुने बंद करण्यात आले. तब्बल सात किलोमीटर अंतरावर पसरलेली ही जलवाहिनी आहे.
प्रारंभी या जलवाहिनीतील पाणी वाहून घालवून त्यानंतर दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवस २५ टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आले असल्याची माहिती जलअभियंता तथा उपायुक्त रमेश बांबळे यांनी दिली.
मात्र, मंगळवारपर्यंत ही कपात असली तरी बुधवारपर्यंत ही कपात राहिल, असे जलअभियंता विभागातील अधिका-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत मुंबईकरांवर पाणीकपात लागू असेल, असे बोलले जात आहे.