भल्या पहाटे शस्त्रास्त्रांचा खणखणाट सुरू होतो. तलवारी, भाले, आदी घासून-पुसून पुढे होतात. सगळी सुरक्षा यंत्रणाच सज्ज झालेली असते. औचित्य असते ते खंडेनवमीचे! नवरात्रीतील नवव्या दिवशी शस्त्रास्त्रपूजा करण्याची परंपरा गेले कित्येक शतके चालू आहे. ग्रामीण भागातील बलुतेदारांपासून ते लष्करातील सैनिकांपर्यंत.. सर्वत्र नवमीचा दिवस म्हणजे प्रचंड उत्साहाचा आणि जल्लोषाचा क्षणच!
मालवणी मुलखात या दिवशी शेतातील नव्या भाताचे, नव्या पिकाचे, विविध रानफुलांचे आणि साथीला आंब्याच्या पानांमधून साकारलेले तोरण घराच्या मुख्य दरवाजाला लावले जाते. लष्करी छावण्यांमध्ये खंडेनवमीच्या दिवशी शस्त्रास्त्रपूजा करतानाच बक-याची मान तोडण्याची परंपरा आहे. काही ग्रामीण भागातही ही प्रथा सुरू आहे. अलीकडे शस्त्रास्त्रांची परिणती बदलली आहे.
तलवारी, भाले दृष्टीसही पडत नाहीत, एवढया छोटया अस्त्रांची निर्मिती झाली आहे. संहारक अस्त्रे असून समृद्धीसाठी प्रत्येक ठिकाणी यंत्रणा बदलली आहे. उपकरणांचीही अशीच छबी बदलली आहे. या दिवशी लढाऊ परंपरा जोपासणारी मंडळी विधीपूर्वक शस्त्रपूजन करतात. शिल्पकार, कारागीर आपापल्या उपकरणांना मनोभावे वंदन करतात. या उपकरणांना, शस्त्रांना देव मानून पूजा करण्याची प्रथा महाराष्ट्रात आणि राजस्थानात प्रामुख्याने आढळते. या दोन्ही प्रातांत खड्गपूजेचं विशेष महत्त्व आहे.
आज तर विजयादशमी आणि खंडेनवमी एकाच दिवशी होत आहे. या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा केल्यावर दुस-या दिवशी सीमोल्लंघन करत नव्या मोहिमा सुरू करण्याची परंपरा पूर्वज जपत असत. आजही हा वसा जपला जात असला तरी त्याचा व्यास आणि त्रिज्या बदलली आहे. कृषिवलयांच्या खड्गपूजेत जसं शस्त्रास्त्रांना महत्त्व आहे तसंच दारावर तोरण बांधण्याची परंपरा मोठी आहे.
खंडेनवमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावरच नव्हे, तर जी जी महत्त्वाची जागा आहे तेथे तेथे नव्याचं बांधणं (भाताची लोंबी, वरी, तसंच आंब्याची पानं एकत्र करून बांधला जाणारा झुंबर) लावलंच जाते. पूर्वी तोरण बांधण्यासाठी अनेक शकला लढवल्या जायच्या. झेंडूच्या फु लांमध्ये आंब्याचे डहाळे, भाताच्या लोंब्या दिमाखदार दिसायच्या. शेतीची परंपरा अनेक ठिकाणी खंडित झाली. यामुळे तोरणाची परंपरा जपायची तर भाताच्या लोंब्या बाजारातून खरेदी कराव्या लागतात. आंब्याचे डहाळेही आता मिळेनासे झाले आहेत.
रायवळ आंब्यांची जागा कलमी आंब्याने घेतली. यावर पर्याय म्हणून अलीकडे सारं काही प्लॅस्टिकमध्ये अस्सल तोरण उपलब्ध झाले आहे. वर्षाच्या बाराही महिने टवटवीत दिसणारे हे कृत्रिम तोरण. माणसाचे जीवनही असेच झाले आहे. सारं काही कागदी फुलांसारखे. कोमेजायचे नाही कधी असाच अट्टहास असतो सा-यांचा. पण तरीही परंपरा जपते हो आजची पिढी, असे जेव्हा ज्येष्ठ मंडळी सांगतात तेव्हा हायसे वाटते.
पूर्वी म्हणजे अगदी अलीकडच्या काही वर्षापर्यंत शस्त्रास्त्रपूजेचा थाट काही और असायचा. गंध-अक्षता समर्पणाबरोबरच नऊ दिवस पाणी शिंपलेलं रुजवाणाच्या डहाळया शस्त्रास्त्रांवर पोहोचायच्या. घटस्थापनेदिवशी पूजेसाठी ठेवलेला घट हलवला जायचा. एकजात सर्व शस्त्रास्त्रं पूजली जायची. वह्या-पुस्तकंही पूजेच्या जाग्यापर्यंत पोहोचायची. घराघरात शस्त्रास्त्रांची जागा भलीमोठी असायची. अलीकडे शस्त्रास्त्रं कमी झाली. पुस्तकांची जागा लॅपटॉपने घेतली. ट्रंकांची जागा कपाटाने घेतली. शेतक-यांचं नांगरपूजेला असायचंच. या नांगरांऐवजी आता ट्रॅक्टर आले. खंडेनवमीची परंपरा मात्र टिकून आहे. नवमीच्या दिवशी ही प्रथा जपण्याचा कसोशीने प्रयत्न होत आहे.
त्या पाठोपाठचा उत्सव म्हणजे दसरा. विजयादशमी म्हणजे एक विजयाचा उत्सव. साडेतीन मुहूर्तापैकी एक. प्रेम कसं वृद्धिंगत करावं, याचा मुहूर्त. दसरा म्हणजे सीमोल्लंघन. या सीमोल्लंघनादिवशी आपटयाची पानं शस्त्रास्त्रांवर ठेवली जातात. त्याच वेळी शस्त्रे उचलली जातात. यामागच्या लोककथा, पुराणकथा गावोगावी बदलतात. एक मात्र कथा बदलल्या तरी परंपरा तीच असते. काही गावांमध्ये नवमीदिवशीच सोनं लुटतात. सोनं लुटण्याच्या निमित्ताने का होईना सारे जण एकत्र येतात. गावागावातील ग्रामदेवतांच्या ठिकाणी तर काही संस्थानांमध्ये शाही सोहळ्यात सोनं लुटलं जातं.
यानंतरची परंपरा सर्वात महत्त्वाची. ‘सोने घ्या सोन्यासारखे व्हा’, असं सांगत लहान-मोठं एकमेकांना सोनं देतात. अलीकडे संवाद हरवत चालला आहे. अशा वेळी आजची पिढी ज्येष्ठांना सोनं म्हणून आपटयाची पानं बहाल करते तेव्हा त्यांच्या चेह-यावर पसरलेला आनंद सोन्याहून अधिक असतो. परस्परांमधील नातेसंबंध दृढ होऊन आपुलकी, एकजूट निर्माण होण्यास यामुळे अधिकच बळ मिळतं.
आज प्रत्येकालाच गतिशील जगायचं आहे. अशा वेळी प्रत्येकाच्या संकल्पना वृद्धींगत करणारी अनेक उपकरणं, अनेक यंत्रणा सहजपणे मिळत आहेत. सायबर तंत्रज्ञानाने सारं काही डिजिटल झालं आहे. अशा वेळी खंडेनवमीही बदलली आहे. आता शस्त्रास्त्रांची जागा कमी झाली. भल्या पहाटेची गजबज थांबली. विशिष्ट कोनात अडकून ठेवलेल्या भिंतीवरच्या तलवारी आत फक्त शोभेपुरत्याच उरल्या आहेत. अन्य शस्त्रास्त्रांची रया बदलली आहे. काळाबरोबर बदलायला हवं माणसांनी, असं ज्येष्ठ मंडळी सांगायची.
आजची पिढी नव्या पिढीला हाच वसा देत आहेत. दस-याच्या शुभमुहूर्तावर सीमोल्लंघन करताना तुम्ही- आम्ही सर्वानीच बदलत्या काळाचं भान बाळगून नव्या आणि जुन्याची सांगड घालायला हवी. दस-याच्या दिवशी सोनं खरेदी करणं पुण्यदायक मानलं जातं. मात्र सोन्याचे दर एवढे वधारले आहेत की किती आणि कशी गुंतवणूक करायची याचा प्रत्येक जण विचार करू लागला आहे.