भारतात पर्यावरणाबद्दल प्रचंड अनास्था असल्यामुळे प्रदूषण तसेच वृक्षतोड यामुळे मोठय़ा प्रमाणात पर्यावरणाची हानी होत आहे. विशेष बाब म्हणजे भारतील सगळय़ाच नद्या या प्रदूषित झाल्या आहेत. प्राचीन आणि अत्यंत धार्मिक अधिष्ठान असलेली गंगा नदी तर स्वच्छ करण्यापलीकडे गेली असून मी जवळजवळ मृत झाली आहे.
ज्या नद्यांच्या काठी भारतीय संस्कृती उगम पावली आणि तिचा विकास झाला आणि ज्या नद्यांना मातेचे दर्जा दिला जातो, त्याच प्रदीर्घकाळापासून प्रदूषित होत आहेत. नद्या प्रदूषित होऊ नये म्हणून आतापर्यंत देशभरात अनेक योजना राबवल्या गेल्या. गंगा नदीला वाचवण्यासाठी अनके योजना आल्या आणि गेल्या पण त्यामुळे गंगेचे होणारे प्रदूषण काही थांबवलेले नाही. अलीकडे प्रश्नोतरांच्या तासाला देशातील नद्या स्वच्छ करण्यासाठी केंद्राने राज्यांना ५ हजार १६० कोटी रुपये दिले असल्याची माहिती जलसंधारण आणि नदी विकास खात्याच्या मंत्री उमा भारती यांनी लोकसभेत दिली. देशातील २९ राज्यांचा विचार केला तर ही रक्कमच मुळी कमी वाटते. यातील किती रक्कम प्रत्येक राज्यांच्या वाटेला येईल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. सरसकट ही रक्कम देण्यात आली आहे की, त्या त्या राज्यातील प्रदूषित नद्या आणि प्रदूषणाच्या पातळीनुसार राज्यांना मदत करण्यात येईल, याबाबत काहीच सविस्तर माहिती मिळालेली नाही. जल प्रदूषण ही भारतातील इतर अनेक समस्यांपैकी एक जटील अशी समस्या आहे. औद्योगीकरण, वाढते सांडपाणी, शेतात टाकले जाणा-या रासायनिक खतांमुळे जमिनीवरील आणि जमिनीखालील पाण्याचा साठा अधिकाधिक प्रदूषित होत चालला आहे. आधीच भारतात शुद्ध पाण्याची वानवा असताना अधिकाधिक पाणी प्रदूषित होत असल्यामुळे त्याचा मानवी जीवनावरही मोठय़ा प्रमाणात दुष्परिणाम जाणवत आहे. शुद्ध पाणी मिळणे ही प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, हाच नागरिक आपली कर्तव्ये विसरला आहे. नद्यातील प्रदूषणाला भारतीय नागरिकांची मानसिकताही मोठय़ा प्रमाणात जबाबदार आहे. नद्यांमध्ये मोठी जैवविविधता असते. मात्र, त्यात वाढणा-या प्रदूषणामुळे ही जैवविविधता नष्ट होते. नदीच्या पाण्यात सांडपाणी, रासायनिक कारखान्यातील प्रक्रिया न केलेले जड पाणी सोडले जाते. या जड पाण्यावर कारखानदारांना प्रक्रिया करणे बंधनकारक असते. मात्र, पैसे वाचवण्यासाठी असा प्रक्रिया प्रकल्प कारखान्यात उभा केला जातो. पण त्याचा वापर करण्यात येत नाही. कारखान्यातील पाण्यावर प्रक्रिया न करता असे पाणी थेट नदीत सोडल्यामुळे अशा जड पाण्यात असलेले अनेक रासायनिक घटक नदीत जातात आणि पाणी प्रदूषित होते. लोखंड, शिसे अशा अनेक जड धातूबरोबर इतरही रासायनिक बाबी नद्यात जातात. असे पाणी मनुष्याला आणि प्राण्यांनाही प्यायला घातक असते. त्याबरोबर मानवी विष्ठा, धुणीभांडी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी नद्यांचा वापर केला जात असल्यामुळे नद्या प्रदूषित होतातच पण त्याचबरोबर जलजन्य तसेच त्वचेच्या आजारांच्या साथीही पसरवतात. कॉलरा तसेच नायटा, खरुज असे त्वचारोगही होतात. काही वेळात पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त झाल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होतात. दात, त्वचा, डोळे त्यांच्यावर त्याचा मोठा दुष्परिणाम होतो. त्यामुळे अंधत्व तर येतेच पण त्याचबरोबर शरीरात अनेक व्यंग निर्माण होतात. देशातील अनेक राज्यांमध्ये ही एक मोठी समस्या बनली आहे. याबाबत आणि एकूणच जलप्रदूषणाबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागरुकता निर्माण करणे आता आवश्यक आहे. जशी पाणी हे अमृत आहे, जीवन आहे तसेच मनुष्यप्राण्यांचे जीवनही मौल्यवान आहे. जल प्रदूषण हे फक्त पशुपक्ष्यांनाच नाही तर सगळय़ाच मानवी साखळीला घातक आहे. प्रदूषित पाण्याच्या वापरामुळे मानवी जीवाला एवढा मोठा धोका निर्माण झाला असताना आणि पाण्याची मोठय़ा प्रमाणात टंचाई असणा-या भारताला जल प्रदूषणाबाबत आता तरी कठोर असे निर्णय घेणे आवश्यक आहे. सरकारच्या कठोर अंमलबजावणीमुळे प्रदूषित नद्या स्वच्छही होतील पण भारतीय मानसिकताही सुधारणे आवश्यक आहे. स्वच्छ झालेली नदी पुन्हा प्रदूषित होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कायद्याची नाही तर शिस्त आणि आत्मभानाची आवश्यकता आहे. केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करणे आणि एकमेकांशी समन्वय ठेवणे आवश्यक आहे.