जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोहाच्या गुनखाली अटक केलेल्या विद्यार्थ्यांची तातडीने सुटका करण्यात यावी, अशी मागणी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व अन्य राजकीय नेत्यांनी शनिवारी केली.
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोहाच्या गुनखाली अटक केलेल्या विद्यार्थ्यांची तातडीने सुटका करण्यात यावी, अशी मागणी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व अन्य राजकीय नेत्यांनी शनिवारी केली. तर विद्यापीठाच्या परिसरात देशविघातक कृतींना थारा देणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले.
संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरूच्या विरोधात कार्यक्रम आयोजित केल्याने जवाहरलाल नेहरू महासंघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला. या विरोधात माकपचे नेते सीताराम येचुरी, कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डी. राजा, जदयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन कन्हैया कुमारच्या सुटकेची मागणी केली.
येचुरी म्हणाले की, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वातावरण तंग आहे. याप्रकरणी संबंध असलेल्या २० जणांची यादी दिल्ली पोलिसांनी जारी केली आहे. यात डी. राजा यांच्या मुलीचाही समावेश आहे. कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
या विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा आवाज दाबणारे देशविरोधी आहेत. ते तुमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना याची जाणीव नाही की तुम्ही अधिक मजबूत बनणार आहात, असे ते म्हणाले. लोकशाही मजबूत होण्यासाठी योग्य पद्धतीने चर्चा व वादविवाद होणे गरजेचे आहे.
दरम्यान, विद्यापीठाचे कुलगुरू के. कस्तुरीरंगन यांनी संकुलाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.