एक दिवस असा येतो सारा मोहरा फिरून जातो आणि एक रात्र अशी येते सारा माहोल बदलून जाते. दिवसाचं काही सांगता येत नाही. तो आपल्या ताटात काय वाढून जातो हे कळत नाही. कधी कधी नशिबाचं ताट रिकामंच राहतं आणि आपल्याला आयुष्यात जे कधी मनात नाही ते वाढून येते. मर्ढेकरांची एक कविता आहे.
किती तरी दिवसात
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसात
नाही नदीत डुंबलो
पण चांदण्याचे दिवस थोडेच सा-यांच्याच आयुष्यात येतात; पण काही जणांना दिवसा स्वप्न बघायची आवड असते; पण त्यांना शेवटी म्हणावे लागते.
मैने चाँद और सितारोंकी तमन्ना की थी।
मुझको रात के स्याही के सिवा कुछ न मिला।।
असं जरी असलं तरी आयुष्यात कधी कधी एखादा क्षण, एखादा प्रसंग असा येतो की आपलं सारं आयुष्य त्यामुळे बदलून जाते. आपल्या आयुष्याला त्या एखाद्या छोटय़ा गोष्टीमुळे वेगळे वळण लागते. थोडक्यात, त्या एका घटनेमुळे आपण होत्याचे नव्हते होतो किंवा नव्हत्याचे पुन्हा होतो. असा दिवस किंवा रात आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. उलट आपलं सारं आयुष्य विसरायला लावणारा हा दिवस आपण आपल्या आयुष्याच्या पुस्तकात मोर पिसासारखा जपून ठेवतो. मग असे क्षण मग ते पहिल्या प्रेमाचे असोत किंवा पहिल्या कामाचे असोत. पहिल्या आनंदाचे असोत किंवा पहिल्याच दु:खाचे असतो ते प्रसंग अपण मरेपर्यंत विसरत नाही. कारण ते आलेले दिवस कधी आपल्या आयुष्यात परत येत नाहीत.
आपल्या आयुष्यात सुख-दु:खाचे अनेक ऋतू येतात. काहींच्या आयुष्यात दिवस बहारदार असतात, तर काहींच्या आयुष्याच्या रात्री चांदण्याच्या असतात. बरोबर जर कुणी प्रेमाचं माणूस असेल, तर रात्र संपू नये व दिवस मावळू नये असे आपल्याला वाटते. कारण प्रेमासारखा ऋतू नाही. एक कवी म्हणतो,
पतझड सावन बसंत बहार
एक बरसके मौसम चार
पाचवा मौसम प्यार
हा पाचवा मौसम माणसाच्या आयुष्यात एकदाच येतो. त्यात या प्रेमाच्या मोसमात एखादी चांदणी रात्र आली तर आयुष्याला चार चाँद लागतात. परंतु काहींच्या आयुष्यात काळ्या रात्रीच असतात. एकटय़ा जिवाला कुणीतरी प्रेमाचं माणूस असावं असं वाटतं. त्याला वाटते दिवस तुझ्यामुळे चांदण्याचे झाले, पण संध्याकाळी तिच्या बरोबर घालवलेले
क्षण आठवतात आणि मग तो म्हणतो,
‘या कातरवेळी पाहिजेस तू जवळी।’
परंतु एखादी रात्र आपल्या आयुष्यात अशी येते की दोन क्षण का होईना त्यामुळे आपल्या आयुष्याला वेगळे वळण लागते. विशेषत: ती रात्र पावसाळी असेल, तर ते भिजलेले प्रेमाचे क्षण आपण कधीच विसरू शकत नाही. अशी चांदणी सगळ्यांच्याच वाटय़ाला येत नाही; परंतु भाग्यवानांच्या नशिबात मात्र असे काही क्षण आले की सा-या आयुष्यात ते सोनेरी क्षण जपून ठेवावेसे वाटतात. याच अनुभवामुळे त्यांच्या आयुष्याचा प्रवास सुखद झाला. पाहिल्या प्रेमाच्या बाबतीत ‘लव्ह अॅट फर्स्ट साईट’ हा अनुभव एका कवीला एका पावसाळी रात्री कसा येतो याची कहाणी म्हणजे ‘बरसात की रात’ हा चित्रपट!
पंचावन्न-साठच्या दशकात श्री ४२०नंतर अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे पी. एल. संतोषी या दिग्दर्शकाचा ‘बरसात की रात’ हा चित्रपट! १९६० साली तो मुंबईत जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा तुफान गाजला. साठ सालचा सर्वात ‘हिट’ चित्रपट म्हणून या चित्रपटाची नोंद झाली. त्याच्यातील संगीतामुळे तो गाजलाच, परंतु त्यातील,
‘जिंदगी भर नही भुलेगी ये बरसात की रात’
या गाण्यासाठी लोक वेडे झाले होते. रौप्य महोत्सव साजरा करणा-या या चित्रपटातील नायक- नायिकांच्या भूमिकेतील कलाकारसुद्धा त्यावेळी गाजलेले होते. मधुबाला ही त्यावेळची टॉप नटी होती. तिचा सिनेमा बघण्यासाठी म्हणण्यापेक्षा तिला बघण्यासाठी लोक वेडे होत. त्यात तिच्या जोडीला भारतभूषण हा लोकप्रिय नट होता. खरं तर त्याचा अभिनय जेमतेम होता. पण बैजू बावरामधील त्याच्या कामामुळे तो गाजला होता. त्यामधील नौशादच्या संगीतामुळेच बैजू बावराही गाजला होता. या पार्श्वभूमीवर बरसात की रातमध्ये ही जोडी गाजली. या सिनेमाची कथा-पटकथा साधी व सरळ होती. एका कवीच्या आयुष्यात एक सुंदर तरुणी अचानक एका पाऊस रात्री भेटते व तिला पाहताच त्या कवीला एक सुंदर कविता सुचते. त्यामुळे तिच्या पहिल्याच दर्शनात तो तिच्या प्रेमात पडतो. तो रेडिओवर आपल्या कविता गातो, त्यामुळे त्याला पाहिल्यावर ही काव्यवेडी तरुणी त्याच्या प्रेमात पडते ते त्याच्या कवितांमुळे. परंतु नेहमीप्रमाणेच मोठा पोलीस अधिकारी असलेला तिचा बाप त्यांच्या प्रेमाच्या आड येतो. त्यामुळे प्रेमासाठी त्याच्याबरोबर ती घरातून पळून जाते व पुढे अनेक अडचणींना तोंड देत त्यांचे प्रेम कसे सफल होते हे ‘बरसात की रात’ या चित्रपटात दाखवले आहे.
एका पावसाळी रात्री एक सुंदर तरुणी (मधुबाला) पावसात सचैल भिजते. ती पावसामुळे एका छपरात आडोसा घेते. तेथेच कवी झालेला भारतभूषण केवळ पावसामुळेच थांबलेला असतो. ती भिजलेली तरुणी आपली साडी सावरीत येत असताना विजेचा कडकडाट होतो व त्यामुळे ती घाबरून त्याला क्षणभर बिलगते आणि आपण काय केले म्हणून लाजून ती तेथून जाते, पण हा भिजलेला क्षण दोघांच्या आयुष्यात प्रेमाचे बीज रुजवतो. एक दिवशी ती घरात कविता वाचीत बसलेली असताना अचानक तो कवी रेडियोवरून आपली कविता गातो त्यात आपलेच वर्णन आहे हे पाहून ती आनंदून जाते व त्या प्रसंगाच्या आनंदाचा प्रत्यय घेते. केवळ या गाण्यामुळेच ‘बरसात की रात’ गाजला ते गाणे म्हणजे,
जिंदगी भर नही भुलेगी ये बरसात की रात
एक अनजान हसिना से मुलाकात की रात
ती पावसाची रात्र मी जन्मभर विसरणार नाही, कारण त्याच बरसाती रात्री एक हसिना म्हणजे सुंदर तरुणीची आणि त्याची अचानक भेट झालेली असते. तिला पाहून ती कशी भिजली होती व काय करीत होती हे सांगताना तो पुढे म्हणतो.
हाय! वो रेशमी झुल्फोसे बरसता पानी
फुलसे गालोंपे रुकने को तरसता पानी
दिल में तुफान उठाते हुये जजबात की रात।
जिंदगी भर नही भुलेगी ओ बरसात की रात।।
काय सांगू तिच्या रेशमी भिजलेल्या केसावरून बरसणारे पाणी तिच्या फुलासारख्या गालावर थांबण्यासाठी धडपडणारे चंचल ओघळणारे पाणी पाहून ही भावरम्य रात माझ्या हृदयात तुफान उठविणारी होती.
अशी रात मी जन्मभर विसरणार नाही.
डरके बिजलीसे अचानक ओ लिपटना उसका और फिर शर्मसे बलखाके सिमटना उसका कभी देखी ना सुनी ऐसी तिलस्मात की रात।
जिंदगी भर नही भुलेंगी वो बरसात की रात।।
अचानक विजेच्या कडकडाटामुळे घाबरून विजेला बिलगणे आणि पुन्हा लज्जेमुळे लाजाळूच्या झाडासारखं जरा दूर होणं. म्हणून अशी बरसात की रात कुणी पाहिली नसेल किंवा ऐकली नसेल अशी ती चमत्काराची रात्र होती.
आणि पुढे तर तिने कमालाच केली.
सुर्ख आँचल को दबाकर जो निचोडना उसने दिल पे जलता हुआ एक तीरसा छोडा उसने
आग पानीमे लगाते हुऐ हालात की रात।
जिंदगी भर नही भुलेगी ओ बरसात की रात।।
भिजलेल्या पदराला तिने एकत्र करून जेव्हा दाबून पिळले तेव्हा तर जणू काय एखादा पेटता बाणच हृदयावर तिने सोडला. पाण्यालाच आग लावणारी ही हालात की रात होती. जिंदगीभर ही कुणी विसरणार नाही अशी ही रात आहे.
पुढे कवी म्हणतो,
मेरी नग्मोने जो बसती है वो तसवीर थी वो
नौजवानी की हँसी ख्वाबकी तावीर थी वो
आसमानोसे उतर आयी थी वो रात की रात
जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की रात।।
माझ्या गाण्यात बसवावी अशी तसवीर होती
तरुणांच्या सुंदर स्वप्नातील ती स्वर्ग होती. म्हणूनच जणू काय आकाशातून खाली आलेली ती रात्रीची स्वर्गीय रात्र होती. अशी रात कोण विसरेल. जो विसरेल तो नंदनवनातील मूर्ख समजावा.
पुढे ती राजहंसाची जोडी दुरावते. तिचा बापच तिला बंगल्यात कोंडून ठेवतो. ती आजारी पडते. त्याला भेटण्यासाठी तळमळते. हा कवी मात्र निराश होऊन एका कव्वाली पथकाबरोबर दौरे करतो. तिथे त्याची भेट त्याच्यावर मूक प्रेम करणारी पूर्वी शेजारी राहणा-या गायिकेबरोबर होते तो त्यांना कव्वाल्या लिहून देतो. एकदा कव्वाली स्पर्धा रेडिओवर सुरू असते. ती ऐकून मधुबाला घरातून पळून जाऊन त्याला भेटते. तेव्हा तो निराश झालेला पाहून ती त्याच्यावर रुसून बसते त्याचे मन वळविण्यासाठी ती त्याचंच गाणं म्हणते.
जिंदगी भर नही भुलेंगी वो बरसात की रात
एक अनजान मुसाफिरसे मुलाकात की रात
एका अनोळखी मुसाफिराबरोबर झालेली ही पावसातली रात मी आयुष्यभर विसरणार नाही.
हाय! जिस रात मेरे दिलने धडकना सिखा
शोख जजबातमे सीने मे भडकना सिखा
मेरे तकदीरसे निकली हुई सदमात की रात।
जिंदगी भर नही भुलेंगी वो बरसात की रात।।
हाय! त्या बरसाती रात्रीमुळे माझे हृदय धडकन शिकले. त्या खटय़ाळ भावनेने हृदयाला भडक.. शिकवले माझ्या नशिबात सदमा घडावी अशी रात आहे ती मी आयुष्यभर विसरणार नाही.
दिलने अब प्यार के रंगीन फसाने छेडे
आँखो आँखो मे वफाओंके तराने छेडे
आगमे डूब गयी आसवोंकी नग्मात की रात
जिंदगीभर नही भुलेंगी बरसात की रात।।
हृदयाने जेव्हा प्रेमाच्या या रंगीत कथा सांगितल्या तेव्हा डोळ्यातल्या डोळ्यात भावनांचे गाणे छेडले गेले. तेव्हा विरहाच्या आगीत ही अश्रूंची गाणी बुडून गेलेली ही बरसाती रात्र मी आयुष्यभर विसरणार नाही.
तेव्हा मधुबालेचा रुसवा काढण्यासाठी व तिला धीर देण्यासाठी तो (भारतभूषण) तिला म्हणतो,
रुठनेवाली मेरी बातसे ना मायुस हो
बहके बहके खयालोंसे ना मायुस हो
खतम होगी ना कभी तेरे मेरे साथ की रात
जिंदगीभर नही भुलेंगी वो बरसात की रात।।
माझ्यावर रुसलेल्या माझ्या प्रिये माझ्या म्हणण्यामुळे तू दु:खी होऊ नकोस. बहकलेल्या विचाराने तू दु:खी होऊ नकोस. ही आपल्या साथीची कहाणीची रात्र कधी संपणार नाही. म्हणूनच मग ते दोघे मिळून म्हणतात,
जिंदगीभर नही भुलेंगी ये बरसात की रात।
शेवटी नेहमीप्रमाणेच पित्याचा विरोध मावळतो व दोन राजहंसांच्या जोडीचं मधुर मीलन होते. या चित्रपटातील गाणी महमद रफी व लताने गायली आहेत. या गाण्यांना उर्दू काव्याची खुमारी आहे. तसेच या चित्रपटात श्यामा या सुंदर डोळ्यांच्या नटीने उपनायिकेची भूमिका केली आहे.
१९६०च्या दशकात केवळ या गाण्यामुळे हा चित्रपट धमाल गाजला. असे पावसातल्या रात्रीचे रोमॅन्टिक गाणे त्या दशकात झाले नाही. ५५-साठचा श्री ४२०चा छत्रीतला रोमॅन्टिक पाऊस आणि साठ सालची पावसात भिजवणारी रोमॅन्टिक रात्र आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. अर्थात त्याने कधी आमची पिढी आणि आजची पिढीही मधुबालेला पाहिल्यावर आयुष्यभर पावसात भिजायला तयार होईल. हे गाणे रेडिओवर चालू असताना मधुबालाने केलेला अभिनय अफलातून आहे. त्यामुळे ‘जिंदगीभर नही भुलेंगी ये बरसात की रात!