पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाप्रमाणे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही आयआरबीकडून अतिरिक्त टोलवसुली केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाप्रमाणे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही आयआरबीकडून अतिरिक्त टोलवसुली केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या महामार्गासाठी आयआरबीने २६७ कोटी गुंतवले होते, मात्र आतापर्यंत कंपनीने १०९३ कोटींचा टोल वसूल केला आहे. मात्र कंपनीला १४६१ कोटी रुपये वसूल करायचे आहेत. त्यासाठी हा टोल २०१९ पर्यंत वसूल केला जाणार आहे. त्याला नागरिकांचा तीव्र विरोध आहे.
राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या आदेशामुळे रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आपल्या संकेतस्थळावर ही आकडेवारी प्रसिद्ध केली.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आयआरबीने २६७ कोटी रुपये गुंतविले होते. त्यासाठी २००६ पासून टोल आकारण्यास सुरुवात केली होती. एमएसआरडीसीने जाहीर केलेल्या माहितीनुसार आयआरबीला १४६१ कोटी टोल वसुली करायची आहे. त्यापैकी जून २०१५ अखेर या महामार्गावर १०९३ कोटी रुपयांचा टोल वसूल केला आहे. तर आणखी ३९७ कोटी रुपये कंपनीला वसूल करायचे आहेत.
येत्या चार वर्षात ३९७ कोटी १० लाख ३१ हजार ७६३ रुपये वसूल केले जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक महिन्याला ८ कोटी २७ लाख २९ हजार ८२८ रुपये, तर प्रत्येक दिवसाला २७ लाख ५७ हजार ६६० रुपये वसूल करणार आहे.
एमएसआरडीसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महिन्याला जवळपास १० लाख वाहने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जातात. त्यामुळे साधारण १५५ रुपये टोल धरला, तर दरमहा १५ कोटी ५० लाख रुपये तर वर्षाला १८० कोटी रुपये जमा होतात. वर्षाला १८० कोटी म्हटल्यास सव्वा दोन वर्षात १४६१ कोटी वसूल होतील.
मात्र, त्यानंतरही आयआरबीकडून २०१९ पर्यंत वसुली करण्यात येणार आहे. महामार्गाच्या कामावर २६७ कोटींची गुंतवणूक करून जवळपास त्याच्या पाचपट टोलवसुली केली जाणार. मात्र, त्यानंतरही टोलधाडीचा उद्योग सुरूच राहणार आहे. त्यामुळे सव्वा दोन वर्षानंतर आयआरबीकडून टोलमुक्ती मिळणे किंवा नंतरची रक्कम एमएसआरडीसीला देणे गरजेचे आहे.