वामनराव कोठारे विषण्णपणे झोपाळ्यावर बसले होते. पत्नी शीला आत खुडबुडत होती. सून आणि मुलाचा फोटो वामनरावांच्या हातात होता नि ते रडत होते.
वामनराव कोठारे विषण्णपणे झोपाळ्यावर बसले होते. पत्नी शीला आत खुडबुडत होती. सून आणि मुलाचा फोटो वामनरावांच्या हातात होता नि ते रडत होते. ‘तुमचा मुलगा तुम्ही बुळा करून ठेवलायत. तुमच्या छत्रछायेत तो सदैव खुरटलेला राहील.
अठ्ठावीस वर्षाचा घोडा झाला तरी तोबरा बापाचाच. मला निर्णय स्वातंत्र्य असलेला, स्वयंप्रज्ञ नवरा हवाय’ असं फाडफाड बोलून ती माधवला घेऊन निघून गेली होती. शीलाताई बाहेर आल्या. माधव-मीता यांचा फोटो हाती घेऊन वामनराव रडत आहेत हे बघून त्यांचा तिळपापड झाला.
‘‘आण्णा तो हिकडं! गेला ना तो? बायकोच्या पाठीपाठी? बुगुबुगु! अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी? जा बाबा जा! जिथं ऱ्हाशील तिथं सुखी अस. माय-बाप आहोत तुझे. श्रापत नाही तुला.’’ शीलाताईंनी तो फोटो चक्क टराटरा फाडला नि त्याचे तुकडे तुकडे हवेत भिरकावले.
नेमका त्याच वेळी एमआयटीत शिकत असलेला राघव आत आला, तो एमटेकनंतर डॉक्टरेट करीत होता. वामनराव आणि शीलाताईंचा द्वितीय पुत्र उंच, गोरा, देखणा नि प्रखर बुद्धिमान. त्याने ते तुकडे शांतपणे गोळा केले.
‘‘याने काय होणार आई?’’
‘‘माझ्या रागाला उतारा तर मिळेल?’’ त्या फडफडल्या.
‘‘सीता, आत ये ना! बाहेर का उभीयस?’’ त्याने हाकारले. ती आत आली, तिची कांती सावळी पण विलक्षण तेजपुंज होती, नाक धारदार नि तनु सडपातळ होती. ती साडी नेसली होती आणि एक लांबसडक शेपटा कमरेशी बिलगला होता.
‘‘ही सीता अय्यर, माझी सहाध्यायी.’’
सीतानं पटकन् वामनरावांचा झोपाळा गाठला. त्यांच्या पायाशी बसली. चरणस्पर्श केला माथा टेकून. तिचं कुंकू त्यांच्या पायाला लागलं.
‘‘बाबा, नाही म्हणू नका. मी प्रेम करते राघववर. दक्षिणी ब्राह्मण असले तरी आमच्या तीन पिढया मुंबईतच वावरल्या. आजोबा, अप्पा-अम्मा नि आम्ही! मी उत्तम मराठी बोलते बाबा. राघव माझ्या पदरात टाका.
एवढं दान द्या बाबा.’’ वामनराव कोठारे एकदम अवघडले. कोण ही सीता अय्यर? आणि राघव आपल्याशी कधीच काहीच कसं बोलला नाही हिच्याबद्दल? मीता राजेनं माधव कोठारे गिळला! अगदी जातीतली सून केली होती. वर्षभर धीर नाही निघाला तिला..
‘‘बाबा, मी आपल्याला राघवची सोबत मागते आहे. तुमचं नि आईचं प्रेम मागते आहे. मी आपणास वचन देते. आय प्रॉमिस यू बाबा! मी आपणास आणि आईला कधीही दुखविणार नाही. आपणापासून कधी विलगणार नाही.
पश्चात्तापाचा एकही मौका मजकडून देणार नाही. आय प्रॉमिस पीस, प्रॉस्पॅरिटी आणि हॅपिनेस फ्रॉम माय साईड.’’ वामनरावांच्या डोळ्यातून टपटप आसवे तिच्या मस्तकावर पडली आणि तिच्या अश्रूंनी वामनरावांचे पाय भिजले.
‘‘ऊठ बाळ. अखंड सौभाग्यवती हो.’’ सीता त्या आशीर्वादाने खुलली. अंतर्बाफुलली. शीलाताईपाशी ती त्वरेनं गेली नि त्यांना बिलगली.
‘‘मी या घराचं नंदनवन करेन आई. विश्वास ठेवा. तुम्हाला कधीही एकटं करणार नाही. आपल्या छायेत, मायेत, राघव आणि सीता यांचं सुख सामावलं आहे.
माझं ड्रेस कोडसुद्धा तुमच्या आवडीचं असेल. मी संपूर्ण शाकाहारी आहे, पण राघवसाठी नि तुम्हा दोघांसाठी नॉनव्हेज डिशेस करेन मी. मला शिकवाल ना आई?’’
‘‘अगदी शिकवेन हो सीता.’’ शीलाताईंनी खुशीनं मान डोलावली.
‘‘मग आजच विवाह संपन्न होऊ दे. जेथे राघव तेथे सीता!’’
‘‘अगं पण आजच?’’
‘‘मी ठाण्यात राहाते. आपण मुलुंडला. एक स्टेशनाचं तर अंतर. माझे मामा होम हवन करतील. विठ्ठल मंदिराचे पुजारी आहेत ते. लग्न या घरात होईल. या घराचे एकटेपण राघव आणि सीता आजच्या आज संपवतील.
मला राघवने माधव-मीताबद्दल सारे सांगितलेय. मला आपले घर आनंद, प्रेम, माया, उत्साह यांनी भरून टाकायचे आहे. तुम्ही कधीही दु:खी, कष्टी, एकटया.. असता नये आई. तुम्ही, नि बाबाही!’’ आणि माझ्या प्रिय वाचकांनो, ते लग्न झाले.
होय! अगदी त्याच दिवशी! वामनराव आणि शीलाताई कोठारे यांच्या वास्तूत. विवाह म्हणजे मोठया जेवणावळी, मंडप, अमाप खर्च नि तोरा-दिमाख थोडीच आहे? विवाह म्हणजे सहजीवनाचा सुंदर संकल्प.
जोडीने जीवन जगण्याचा प्रसन्न नि विश्वासू करार. मोठा डामडौल करून माधव कोठारे नि मीता राजे विवाहबद्ध झाले होते. वर्षभरसुद्धा त्या सुनेला सासू-सासरे झेपले नाहीत. एकत्र कुटुंबात राहाणे नाही पटले. ताटावरून पाटावर करणारी सासू तिला नजरेसमोर नको झाली नि सासऱ्यांच्या कर्तबगारीचा तिला नॉशिया आला.
राघव आणि सीता, दोघांचे वय पंचवीस होते. दोघांना चार हजार पाचशे प्रत्येकी विद्यावेतन होते. दोघे डॉक्टरेट करीत होते, नि त्यांचे एकमेकांवर निरातिशय प्रेम होते. इतके की जणू सीता अय्यर ही पोर माथ-पिता अय्यरांच्या पोटी राघवसाठीच जन्मास आली होती.
राघव आणि सीता जोडीनं सोसायटीत लाडू वाटून आणि नमस्कार करून आले. आशीर्वाद घेऊन आले. अतिशय साधेपणाने संपन्न झालेला हा विवाह वामनराव आणि शीलाताईंच्या संसारात मधुघट घेऊन आला. पुनश्च सुख सहवास, पुनश्च तारुण्याची साथ. ना कटुबोल ना वाद!
‘भाजी कुठली करू आई?’ हा सुद्धा मान शीलाताईंचा.
‘बाबा, सिनेमा कुठला बघूया? चौघांनी एकत्रच करायची मजा! अहो थिएटरमध्ये कोणी न कोणी आमच्या शेजारी बसणारच ना? मग ते तुम्ही असलात तर ते का आम्हाला टोचणार आहे?’
‘मी दोशा नि उतप्पम फार छान बनवते. करू का आई?’
‘बाबा, हे माझं विद्यावेतन, नि हे राघवचं! आपल्या चरणी अर्पण. देवघरात कशाला ठेवू? तुम्ही दोघंच आहात आमचा ईश्वर!’ अशा मधुमधुर बोलांनी ते घर परत एकदा आनंदात नाहून निघाले. शीलाताई कधी एकांतात स्वत:ला चिमटा काढून बघत. ‘देवा.. सुखाची चटक माणसाला फार चटकन लागते. हे सारं टिकाऊ आहे ना पांडुरंगा?’ त्या वारंवार पांडुरंगास पुसत. आणि वर्षभरातच..
‘‘आई, राघवचं पोट तडस लागतंय. कालपासून त्याला लघ्वी झाली नाहीये. आपण त्याला डॉ. बाळकृष्ण खरे यांचेकडे घेऊन जाऊ या का? चांगले यूरॉलॉजिस्ट आहेत.’’ सीता म्हणाली.
‘‘माझी व्हायव्हा-व्होसे आज असल्यानं तो नाही म्हणेल म्हणून सांगते आई. तुम्ही इनसिस्ट करा. मी व्हायव्हाला नाही जाणार, मला राघवपेक्षा काहीच महत्त्वाचं नाही. माझं जीवनही!’’
शीलाताई तिच्याकडे बघत राहिल्या. तिच्या डोळ्यातून आसवांच्या धारा गालावर सांडत होत्या. त्यांनी सीताला हृदयाशी धरली.
‘कुणी शिकवलं गं यवढं प्रेम करायला?’’ त्यांनाही अश्रू आवरेनात.
‘जेथे राघव तेथे सीता आई!’.. दोघींनी एकमेकींच्या पाठी चिंब ओल्या केल्या. राघवचं एक न ऐकता सीता नि कोठारे दांपत्य डॉ. बाळकृष्ण खरे यांच्याकडे गेलं. सीतानं तिच्या डीनना इमर्जन्सी कळविली. आणि हाय किडनी फेल्युअरचं निदान झालं.
‘किडनी मिळेपर्यंत डायालिसिस!’’ डॉक्टरांनी जाहीर केलं.
‘माझी घ्या डॉक्टरसाहेब. माझा नि राघवचा रक्तगट एकच आहे. ओ पॉझिटिव्ह. माझा जन्म राघवसाठीच आहे. किडनी माझ्या शरीरात असली काय नि त्याच्या शरीरात असली काय!’
‘अगं किती लहान वय तुझं!’ शीलाताईंचा कंठ दाटला.
‘एका किडनीवर माणसं वर्षानुवर्षे जगतात आई. तुम्ही जराही चिंता करू नका.’ सीताचा निर्धार. पक्का होता.
राघवला बॉम्बे हॉस्पिटलला हलवलं. सीताची शरीर चाचणी झाली. ब्लड टेस्ट, सेल टेस्ट, टिश्शू टेस्ट, ही टेस्ट नि ती टेस्ट.
‘मॅच झालं गं सारं! सीता..’ वामनराव कंठ दाटल्या अवस्थेत होते.
‘ते होणारच होतं बाबा. मी नि राघव एकमेकांचे प्राण आहोत.’
पण..
हे पणच किती वाईट असतात ना प्रिय वाचकांनो! किडनी रोपण करायच्या आतच राघवचे प्राणोतक्रमण झाले. ही वॉज इन बेस्ट हँड्स. विथ बेस्ट ऑफ फॅसिलिटीज. पण तहीही राघवने जगाचा निरोप घेतला. सीताला हे कळतच नव्हते.
का रडताहेत सारे?
राघवचे आई-बाबा— आपले आई बाबा?
अरे मी देणार माझी किडनी! काय? ही इज नो मोर? देवा, तू मला फसवू शकत नाहीस, तुला पक्क ठाऊक आहे. जेथे राघव तेथे सीता! ती राघवच्या देहावर ओणवी झाली. चैतन्य लुप्त! अशी ‘यात्रा’ त्या वृद्ध जोडप्याच्या नशिबी होती.
आता वामनराव एकटेच झोपाळ्यावर गात बसतात. ‘निरोप कसला घेता नाथा! जेथे राघव तेथे सीता!’ शीलाताई लाडक्या राघव-सीतेला शोधत राहतात घरभर. मुक्या मुक्या.