नऊ वर्ष आणि परदेशातील १५ कसोटी मालिकांमध्ये अपराजित रहाणा-या दक्षिणआफ्रिकेला अखेर भारताने आपल्या भूमीत धूळ चारली. जे पंधरावर्षात शक्य झाले नव्हते ते, भारतातील खेळपट्ट्यांवर फक्त सात दिवसात शक्य झाले.
नऊ वर्ष आणि परदेशातील १५ कसोटी मालिकांमध्ये अपराजित रहाणा-या दक्षिणआफ्रिकेला अखेर भारताने आपल्या भूमीत धूळ चारली. जे पंधरावर्षात शक्य झाले नव्हते ते, भारतातील खेळपट्ट्यांवर फक्त सात दिवसात शक्य झाले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या नव्या दमाच्या संघाने दोन्ही कसोटी सामने तीन दिवसात संपवून मोठया फरकाने जिंकल्यामुळे सध्या भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.
२०००-२००१ च्या सुमारास ऑस्ट्रेलियन संघ अशा पध्दतीचे कसोटी क्रिकेट खेळून एका पाठोपाठ एक विजय मिळवत होता. त्याची आठवण या विजयाच्या निमित्ताने झाली. आठवण झाली असली तरी, ऑस्ट्रेलियाच्या त्यावेळच्या अजिंक्य कामगिरीशी भारताच्या या दोन विजयांची तुलना होऊ शकत नाही. कारण ऑस्ट्रेलियाच्या संघात तीन दिवसात सामन्याचा निकाल लावतील अशा क्षमतेचे खेळाडू होते आणि त्यांच्या विजयाला फक्त खेळपट्टीची साथ नव्हती.
भारताने दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या दोन्ही दणदणीत विजयांमध्ये खेळपट्टीची भूमिका निर्णायक होती. भारताने आपले बलस्थान ओळखून फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टया बनवल्या. त्याचा अश्विन, मिश्रा आणि जाडेजा या त्रिकुटाने अचूक फायदा उचलला. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या देशातल्या क्रिकेटपटूंची नेहमीच उपखंडातल्या खेळपट्टयांवर खेळताना त्रेधातिरपीट उडते.
वेग आणि स्विंगची सवय असलेल्या या देशातल्या फलंदाजांचे फिरकी गोलंदाजी खेळण्याचे तंत्र कच्चे असते. त्यामुळे उपखंडातल्या खेळपट्ट्यांवर या फलंदाजांचा निभाव लागत नाही. दक्षिण आफ्रिकेची हीच कमजोरी हेरुन भारताने फिरकीला पोषक खेळपट्ट्या बनवल्या. याआधीही परदेशी संघाच्या भारत दौ-यावेळी फिरकीला पोषक ठरणा-या खेळपट्ट्या बनवल्या गेल्या आहेत. त्यावेळी कसोटी सामने पूर्ण पाच दिवस तरी, चालायचे यावेळी तीन दिवसातच कसोटीचा फैसला झाला.
कारण पहिल्या षटकापासूनच फिरकी गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी बनवण्यात आली होती. टी-२० आणि वनडे मालिकेत पाहुण्यांकडून झालेल्या पराभवानंतर कसोटीमध्ये लाज निघू नये यासाठी खेळपट्टी यजमानांच्या बलस्थानानुसार बनवण्यात आली होती. पण यजमानांनी मायदेशात खेळण्याचा किती फायदा उचलायचा यालाही मर्यादा हव्यात.
हे मुद्दे उपस्थित करुन भारताच्या विजयाला कमी लेखण्याचा हेतू नाही. अश्विन, मिश्रा आणि जाडेजाने आपले फिरकीचे तंत्र-कौशल्य निश्चितच इथे दाखवून दिले. तिस-या कसोटीच्या तिस-या आणि शेवटच्या दिवशी हाशिम आमला आणि फा डयु प्लेसिसमध्ये पाचव्या विकेटसाठी झालेली ७२ धावांची भागीदारी ही मालिकेतील पाहुण्याची सर्वात मोठी भागीदारी आहे.
दोन्ही कसोटीच्या चार डावांमध्ये भारताच्या फिरकी गोलंदाजांनी मिळून तब्बल ३९ विकेट घेतल्या. वेगवान गोलंदाज वरुण एरॉनला फक्त एक विकेट मिळाला. या आकडयांवरुन खेळात समान संधी, निष्पक्षता दिसत नाही. यावरुन काही जण असाही युक्तीवाद करतील कि, भारतीय संघ परदेशात जातो तेव्हा त्याला वेगवान खेळपट्ट्यांवर खेळावे लागते.
हो, बरोबर पण म्हणून तिथे खेळपट्ट्या दहाषटकात भारतीय संघ सर्वबाद होईल अशा पध्दतीने बनवल्या जात नाहीत. आज आपण भारतीय संघ जिंकला म्हणून कौतुक करत आहोत पण हाच भारतीय संघ उद्या परदेशात ढेपाळेल तेव्हा काय ? उसळत्या चेंडूंचा सामना करताना भारतीय फलंदाजांचे तंत्र उघडे पडेल तेव्हा काय ? तेव्हा पून्हा भारतीय फलंदाजांना वेगवान खेळपट्ट्यांचा सराव व्हावा म्हणून देशात स्पोर्टिंग खेळपट्टीचा विषय निघेल.
या विषयावर फक्त चर्चा होईल प्रत्यक्षात मैदानात फरक पडणार नाही. पुन्हा दुसरा एखादा नवीन संघ येईल आपण आपल्या संघाला अनुकूल अशीच खेळपट्टी बनवू आणि पुन्हा दणदणीत विजय. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. फिरकी गोलंदाजी आणि फिरकी खेळण्याचे तंत्र आपल्या फलंदाजांना चांगले अवगत आहे असे आपण म्हणतो.
पण दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये रथी-महारथी फलंदाजांनी भरलेल्या आपल्या संघाला एकदाही तीनशेपर्यंतची मजल मारता आली नाही. आपण मिळवलेल्या विजयामुळे ही बाब झाकली गेली आहे.
पण आज ना उद्या पराभवानंतर ही बाब अधिक प्रकर्षाने समोर येईल. वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिके विरुध्दच्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यात वानखेडेची खेळपट्टी क्युरेटर सुधीर नाईक यांनी यजमानांना अनुकूल बनवली नाही. परिणामी भारताला मालिका गमवावी लागली. म्हणून संघ संचालक रवी शास्त्री यांनी क्युरेटर सुधीर नाईक यांच्याशी वाद घातला होता. यावरुन जिंकण्यासाठी आपला रडीचा डाव दिसतो.