ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कावेरीताई पाटील यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
ठाणे- ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कावेरीताई पाटील यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९० वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सूना असा परिवार आहे. मंगळवारी मनीषानगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
२६ ऑक्टोबर १९२४ रोजी कळव्यात कावेरीताई पाटील यांचा जन्म झाला. शालेय जीवनापासून त्या स्वातंत्र्यलढय़ात सक्रीय होत्या. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात त्यांचा सहभाग होता. प्रभातफे-यांच्या माध्यमातून त्यांनी चळवळीत सहभाग नोंदवला. स्वातंत्र्यसैनिक गोपाळराव पाटील यांच्याशी चळवळीतच स्नेह वाढल्यानंतर १९४२ रोजी त्यांनी त्यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. त्याकाळात त्यांनी उचललेले हे पाऊल त्यांच्या धाडसीपणाचे पाऊल होते.
लग्नानंतरही त्यांनी आंदोलनात खंड पडू दिला नाही. कळवा येथील मुंबई-पुणे रस्त्यावर पहिला सत्याग्रह केला. त्यावेळी त्यांना तीन महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. न्यायालयात माफी मागण्यात त्यांनी नकार दिला होता. चलेजाव आंदोलनात त्यांनी भूमिगत राहून अनेकांना मदत केली होती. २१ ऑगस्ट १९४२ रोजी ठाणे तहसीलदार कार्यालयावरील ब्रिटीशांचा युनियन जॅक उतरवताना इंग्रजांनी त्यांना अटक करून पुण्यातील येरवडा कारागृगात टाकले होते. तेथेच त्यांनी मुलाला जन्म दिला. नंतर त्याचे नाव भारत असे ठेवण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी कळवा गावाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. पती गोपाळराव यांच्या निधनानंतर त्यांनी कळवा गावचे सरपंचपद भूषवले.
कळवा व बदलापूर येथे त्यांनी शाळांची स्थापना केली. दोन टर्म त्या ठाणे महापालिकेच्या नगरसेविकाही होत्या. गेल्या काही वर्षापासून वृद्धापकाळामुळे त्या सार्वजनिक कार्यात वावरत नव्हत्या. त्यांच्या अंत्ययात्रेत वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार संजीव नाईक, आनंद परांजपे, आमदार एकनाथ शिंदे, ठाणे महापालिका विरोधीपक्षनेते हणमंत जगदाळे माजी आमदार सुभाष भोईर, संजय केळकर आदी मान्यवर सहभागी झाले होते.