टीमवर्कची ओळख आपल्याला कॉलेज लाईफपासूनच होते. स्कूल-कॉलेजच्या विविध ग्रुप्सवर काही प्रोजेक्टची जबाबदारी सोपवली जाते. यामुळे टीमवर्क करायला प्रोत्साहनच मिळतं. पण टीमवर्क करताना काही काळजी घेणं आवश्यक आहे.
एकटं काम करणं अतिशय सोपं असतं. पण जेव्हा टीमवर्कची गोष्ट येते तेव्हा प्रत्येकालाच ग्रुपमध्ये काम करणं सुरक्षित वाटतंच असं नाही. एखाद्या ग्रुपला कोणतीही असाइनमेंट दिली जाते तेव्हा वर्गातली मुलं आपापला स्वत:चा असा एक ग्रुप बनवतात. या ग्रुपमध्ये काही मुलांना कित्येक समस्यांचा सामना करावा लागतो.
कारण प्रत्येक सदस्याचं स्वत:चं असं वेळापत्रक असतं. मात्र टीममध्ये आल्यावर आपल्याला संपूर्ण ग्रुपसोबत प्रत्येकाची वेळापत्रकं सांभाळून काम करावं लागतं. प्रत्येकाशी कोऑर्डिनेट करणं हे सगळ्यात मोठं काम आहे. त्यातही ही सगळी मुलं एकाच क्लासमधली, बॅचमधली किंवा एका वयाची असतील तर हे अधिकच कठीण काम होतं. टीमवर्क करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणूया.
टीमवर्क व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक
ग्रुपमध्ये किंवा टीममध्ये काम करणं हे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे. विभक्त कुटुंबपद्धती आणि गॅझेटच्या युगात उपक्रम कुठेतरी मागे पडल्यासारखे होतात. टीमवर्कमध्ये प्रोजेक्ट म्हणा किंवा काही उपक्रम केल्याने लोकांना ओळखणं किंवा समजून घेणं जमायला लागतं.
विभिन्न स्वभावाला जाणायला लागतो. त्याचप्रमाणे प्रत्येक विभिन्न स्वभावाच्या माणसांशी कसं वागायचं हे आपसूकच समजत जातं. विद्यार्थ्यांसाठी टीममध्ये काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे ते स्वत:ला एक प्रकारे प्रोफेशनल जीवनाला सामोरे जाण्यासाठी तयार करत असतात. एकटं काम करण्यापेक्षा सगळ्यांसोबत काम केल्याने त्या प्रोजेक्टला तर ते समजून घेतातच, पण त्याचबरोबर त्यांना बरंच काही शिकायला मिळतं.
मित्रच लीडर असतील तेव्हा..
ग्रुप प्रेझेन्टेशन, नाटक, कॉलेज बँड, ग्रुप डान्स आदी गोष्टींमध्ये आपल्या वयाचाच अघोषितच कोणी टीम लीडर असतो. म्हणजे कोणी एखादा आपोआपच जबाबदारी घेतो. त्याला आपल्या टीमला पुढे घेऊन जायचं असतं.
एकाच वयाचे असूनही बाकीच्या सदस्यांपेक्षा त्याला मॅच्युअर व्हावं लागतं. कारण त्याला आपल्या टीमला बरोबर घेऊन जायचं असतं. इतरांपेक्षाही लीडरला अधिक काम करावं लागतं. महत्त्वाचे निर्णय, जबाबदा-याही अंगावर घ्याव्या लागतात.
काही चुकलं की त्या लीडरलाच ऐकून घ्यावं लागतं म्हणूनच टीमच्या इतर सदस्यांनीही लीडरला समजून घेणं आवश्यक आहे. आपलं काम चांगलंच झालं पाहिजे असा प्रत्येकाने विचार करायला हवा, कारण हे केवळ टीमलीडरचं काम नाही.
प्रत्येकाला स्वातंत्र्य द्या
प्रत्येकाने समजून आणि मिळून मिसळून काम केलं की प्रत्येकाला आपल्या जबाबदाऱ्यांची समज येते आणि स्वतंत्रपणे काम करता येतं. तसंही कोणालाही बंधनात अडकवून त्याच्याकडून उत्तम काम करता येत नाही. म्हणूनच प्रत्येकावर विश्वास ठेवा आणि त्याच्या वाटय़ाची जबाबदारी त्याच्यावर सोपवा.
कोणालाही मी त्या टीममध्ये नाही असं अजिबात वाटता कामा नये, हे लक्षात ठेवावं. प्रत्येकाबरोबर समान वागणूक असणं हा टीमच्या यशाचा मार्ग आहे. कोणालाही काहीही समस्या आल्यास त्याला मदत करणं आवश्यक आहे. प्रत्येकालाच एकमेकांबरोबर मिळून मिसळून काम करणं आवश्यक आहे.
समस्येतून मार्ग काढा
वेगवेगळ्या स्वभावाचे आणि विभिन्न गोष्टींमध्ये रस असणारी लोकं एकत्र येतात तेव्हा काही समस्यांना सामोरं जावंच लागतं. विशेषत: मुलं अपरिपक्व किंवा एकाच वयाचे असतात तेव्हा अशा समस्या येतातच.
प्रत्येक जण निष्ठावानच असेल याची काही गरज नाही; पण अशी व्यक्ती टीममध्ये असणं म्हणजे त्याची त्या टीमसोबत काम करण्याची लायकी असते. प्रत्येक सदस्यांचा स्वभाव आणि वागण्याची पद्धत ही वेगवेगळी असते.
कोणी हसतमुख असेल तर कोणी एकदम गंभीर.. अशा लोकांबरोबर काम करणं म्हणजे कठीणच काम म्हणावं लागेल. मात्र कोणतीही समस्या आल्यावर ती सगळ्यांनी मिळून सोडवावी, हार मानून ग्रुपमधून बाहेर पडू नये. गरज असल्यास कोणी वरिष्ठ मंडळींसोबत चर्चा करणं हा उत्तम पर्याय आहे.
स्वत:ची जबाबदारी ओळखा
प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव असणं आवश्यक आहे. सतत कोणी ना कोणी आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देणं ही चुकीची गोष्ट आहे. कोणताही ग्रुप इव्हेंट असू दे त्यात सगळ्या मेंबरची बरोबरीची जबाबदारी असते. पण त्यातही लीडर म्हणून त्याची जबाबदारी अधिक असते.
अशा परिस्थितीत तो आपली जबाबदारी दुस-यांच्या खांद्यावर टाकू शकत नाही. बरोबरच्या लोकांना कधीतरी काही ना काही समस्या येऊ शकतात. याचा अर्थ टीमलीडर त्यांना ऑर्डर देऊ शकत नाही. तो विनंती किंवा सुचवू शकतो. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीबरोबरच आपल्या टीमचं ध्येय लक्षात ठेवलं पाहिजे.
सगळ्यांचं एकच लक्ष्य असेल तरच ते यशस्वी होते. अशा वेळी मैत्री आणि शत्रुत्व बाजूला ठेवूनच समान जबाबदा-या द्याव्या लागतात. जबाबदारी मिळाल्यानंतर अॅटिटय़ूड आपोआपच बदलतो. कोणताही इव्हेंट यशस्वी झाल्यावर त्याचं श्रेय त्या टीमलाच जातं.
टीमचा अर्थच असा आहे की सगळी मंडळी एकमेकांसोबत परिचित असतील आणि त्यांना एकमेकांसोबत काम करणं सहजशक्य होईल. दिवसभर चर्चा केल्यावरही तुम्ही नंतर चॅटिंगच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर वगैरे एकमेकांसोबत चर्चा कराल तर काम करणं आणखी सहज होईल.
प्रॅक्टिस करत असाल तर त्याची प्रत्येक गोष्ट एन्जॉय करा. कोणत्याही संकल्पनेबाबत नकारात्मक विचार करू नका. प्रत्येकाचं म्हणणं ऐकल्यानंतरच पूर्ण प्लानिंग करा. ज्याला जे काम चांगलं जमतं, त्याला तेच काम द्या. एका टीमची किंवा प्रोजेक्टच यश हे त्या टीमवर अवलंबून असतं हे कायम लक्षात ठेवा.