काही दिवसांपूर्वीची गोष्ट. ठाणे शहरात रात्री रिक्षातून प्रवास करणा-या एका तरुणीने रिक्षावाल्याच्या संशयास्पद हालचाली पाहून चालत्या रिक्षातून उडी मारली. त्यातून झालेल्या अपघाताने ती कोमात गेली. या घटनेने बरीच खळबळ उडाली. बरेचदा अशा प्रकारे टॅक्सी वा रिक्षातून कधी एकटीने, तर कधी शेअरिंगमध्ये प्रवास करताना महिलांवर अनेक संकटं ओढावतात. टॅक्सी-रिक्षातून प्रवास करताना विनयभंग, लुबाडलं जाण्याच्या, दागिने, मोबाइल, पैसे आदी सामान चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
गेल्या सहा महिन्यांच्या आकडेवारीनुसार चोरी, लुबाडणुकीच्या ४१७ नोंदी पोलिस ठाण्यात केल्या गेल्या आहेत. २४२९ इजा केल्याच्या तर ३४७ या बलात्काराच्या नोंदी केल्या गेल्या आहेत. यांपैकी काही गुन्हे हे टॅक्सी-रिक्षासारख्या सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना घडले आहेत. मुंबई-ठाण्यात अनधिकृतपणे टॅक्सी-रिक्षा चालवणा-यांची संख्या मोठी आहे. त्यांचा गुन्ह्यांत सहभाग असल्याचं अनेकदा उघडकीला आलं आहे. असं असलं तरी वाहतूक उपायुक्त असं म्हणतात की, रिक्षा-टॅक्सीमध्ये घडणा-या गुन्ह्यांच्या बाबतीत मुंबई सुरक्षित आहे. ही गोष्ट धक्कादायक आहे. अर्थात, सगळेच रिक्षा-टॅक्सीवाले गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, असं नव्हे, तर काही प्रामाणिकही आहेत. हे खरं असलं तरी त्यांची संख्या कमी आहे.
सध्या मुंबई-ठाण्यात परराज्यांतून आलेल्या रिक्षा-टॅक्सीवाल्यांचीही मोठी संख्या आहे आणि तिच्यात सतत वाढ होत आहे. यामुळेही हा प्रवास असुरक्षित झाला का, असाही प्रश्न आहे. विशेषत: तरुण मुली, महिला यांना हा प्रवास सुरक्षित वाटतो का, वयस्क, अपंग-अंध लोकांना या वाहनांतून प्रवास करताना काय अनुभव येतो, ही वाहतूक व्यवस्था कशी असावी असं त्यांना वाटतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या वाहतूक व्यवस्थेत काय बदल अपेक्षित आहेत यावर मान्यवर व सर्वसामान्यांची जाणून घेतलेली ही मतं-
आपणही सावधगिरी बाळगावी!
मुंबईसारख्या शहरात रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणं, काही प्रमाणात नक्कीच धोकादायक बनलं आहे. आज मुली घराबाहेर पडतात. रात्री उशिरापर्यंत त्यांना काम करावं लागतं. त्यामुळे कामानिमित्त त्यांना टॅक्सी-रिक्षा यांसारख्या वाहतूक व्यवस्थेचा वापर करावाच लागतो. म्हणून मला असं वाटतं की, नेहमी कायद्यात सुधारणा करा अशी अपेक्षा करत बसण्यापेक्षा एक जबाबदार नागरिक म्हणून आपणच काही तरी सावधगिरी बाळगली पाहिजे. रिक्षा किंवा टॅक्सीत बसण्यापूर्वी प्रथम त्या वाहनाचा नंबर टिपून घ्यावा आणि मोबाइलवरून आपल्या घरातल्या किमान दोन जणांना तरी पाठवावा. म्हणजे आपल्या घरच्यांना त्याची माहिती तर होतेच शिवाय तो वाहनचालकही सतर्क राहतो. ते वाहन कुणाचंही असलं तरी तपासादरम्यान याचा नक्कीच फायदा होतो. दुसरं असं की, रात्री उशिरा झाला असेल तर वाहनचालक शेअरिंगमध्ये प्रवासी घेत असल्यास त्याला प्रतिकार करणं आवश्यक आहे. खरं तर सगळ्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. हे प्रत्यक्षात उतरवणं शक्य आहे की नाही, हे मला माहीत नाही पण किमान ठरावीक ठिकाणी तरी रिक्षा आणि टॅक्सी यांच्या स्टँडवर सीसीटीव्ही बसवावेत. – शुभा राऊळ, माजी महापौर
सगळ्यात मोठा दोष यंत्रणेचा!
नुकत्याच ठाण्यात झालेल्या घटनेवरून आपण महिलासांठी रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित नाही, असं विधान करणार असू तर ते चुकीचं आहे. कारण मी स्वत: रात्री उशिरापर्यंत कित्येक वेळा टॅक्सी आणि रिक्षाचा वापर करते, पण कधी धोका वाटला नाही. आज आपल्याकडे कित्येक प्रीपेड टॅक्सी आहेत, ज्यातून प्रवास करणं निश्चितच सुरक्षित आहे. आजही आपल्या समाजात अनेक माणसं चांगली आहेत, मात्र काळजी करायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे. या बाबतीत सगळ्यात मोठा दोष हा आपल्या यंत्रणेत आहे. कारण सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आरटीओ विभागात होतो. केवळ ठाण्यात कित्येक बेकायदेशीर परमिटधारक आहेत. कित्येक उत्तर भारतीय रोजगारासाठी मुंबईसारख्या शहरात रोजगाराच्या हेतूने येतात. त्यातले बहुतांश लोक वाहनचालक म्हणून नोकरी स्वीकारतात. त्यांचे नाव, पत्ता, नंबर त्या त्या संघटनेकडे असतातच, असं नाही. कोणीही येतं आणि परमिट मिळवतं असा कारभार सुरू आहे. त्यावर कारवाई होताना दिसत नाही. म्हणूनच यावर प्रीपेडचा पर्याय योग्य वाटतो. रात्री उशिरापर्यंत ही प्रीपेडची सोय सुरू ठेवावी. – अॅड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्यां
मुंबई सुरक्षितच!
मुंबई हे शहर प्रवासी वाहतुकीसाठी सुरक्षित आहे. रात्री-अपरात्री कित्येक जण रिक्षा आणि टॅक्सीतून प्रवास करतात. हा प्रवास सुरक्षित नसता तर त्यांनी तो करायचा विचार केला नसता. आपल्या मुंबईतील आरटीओ आणि पोलिस अधिकारी आपल्या जबाबदा-या चोखपणे पार पाडत असतात. त्यांच्या काम करण्याच्या पद्धती आणि व्यवस्थेमुळे रात्री फिरणारी कोणातीही व्यक्ती या मुंबईत सुरक्षितच असते. या सगळ्या गोष्टी शक्य होतात, कारण त्यांचा चोख बंदोबस्त आणि जनसामान्यांचं सहकार्य. त्यातूनही जर रिक्षा, टॅक्सीमधून प्रवास करताना एखादी गोष्ट घडली तर त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाते. पुन्हा ही घटना घडू नये म्हणून कृत्य करणा-या व्यक्तीला धडा शिकवला जातो. – भरत कळसकर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अंधेरी आरटीओ ऑफिस, प्रीपेड सेवा
महिला टॅक्सीचालकांची संख्या वाढायला हवी!
टॅक्सी आणि रिक्षातून प्रवास करणा-यांमध्ये महिला, वृद्ध माणसं तसंच लहान मुलं यांची संख्या जास्त असते. माझ्या दृष्टिकोनातून त्यांनी टॅक्सी किंवा रिक्षातून प्रवास करणं तसं असुरक्षितच आहे. एखाद्या टॅक्सी किंवा रिक्षाचालकाने काही करण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांचा सामना तितक्या ताकदीने करू शकत नाहीत. त्यांना लुबाडलं जाण्याचा , त्यांच्यावर अत्याचार होण्याचा धोका जास्त असतो. महिला आणि मुलं सुरक्षित राहावीत, यासाठी काही महिन्यांपूर्वी महिला टॅक्सीचालकांना ट्रेनिंग दिलं गेलं, पण खूपच कमी महिला टॅक्सी चालक स्वत: टॅक्सी चालवतात. महिला टॅक्सी किंवा रिक्षाचालकांची संख्या वाढली तर महिलांना आणि मुलांना त्यातून प्रवास करणं जास्त सुरक्षित वाटेल. एअरपोर्टच्या ठिकाणी असणा-या प्रीपेड सेवांना हल्ली प्राधान्य मिळतं. लोकांना त्यातून प्रवास करणं सुरक्षित वाटतं, पण या सेवांचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणून सरकारने या सेवा वाढवाव्यात. तसंच सरकारने जनसामान्यांच्या सुरक्षिततेबाबत काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. – डॉ. कामाक्षी भाटिया, के. ई. एम. रुग्णालय
सरकारने लक्ष घालावं!
आपल्याकडे नुसत्याच घोषणा दिल्या जातात, मात्र कायद्यांची पुरेशी अंमलबजावणी होताना दिसत नाही. सार्वजनिक वाहतुकीतील प्रवासाच्या सुरक्षेचंही तेच झालेलं आहे. आज लोकल, बस, रिक्षा, कुठेही प्रवासी सुरक्षित दिसत नाहीत. आम्ही नुकतीच रेल्वे खात्याकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी काही उपाय करावेत अशी मागणी केली आहे. नुसते हेल्पलाइन क्रमांक देऊन किंवा तुमचा प्रवास सुखाचा होवो, अशा घोषणा देऊन काही होत नाही, तर यात सरकारचं सक्रिय सहकार्य पाहिजे. महिलांनीदेखील जागरूक राहिलं पाहिजे. आपल्यासोबत पुरुष आहे म्हणजे कुठेही, कोणत्याही वेळी, कसाही प्रवास करताना आपण सुरक्षित राहू या गरसमजात त्यांनी राहू नये. स्वत:ची काळजी त्यांनीच घेतली पाहिजे. फक्त प्रवास करतानाच नव्हे तर प्रत्येक वेळी त्यांनी हे लक्षात ठेवावं. स्वसंरक्षणाचे मार्ग त्यांनी शिकले पाहिजेत, अवलंबले पाहिजेत. कुठेही एकटय़ाने प्रवास करताना आजूबाजूच्या वातावरणाचा नीट अंदाज त्यांनी घेतला पाहिजे. म्हणजेच त्या एकटय़ाने प्रवास करतानाही सुरक्षित राहतील. मुंबईसारख्या शहरात प्रवाशांचा विशेषत: महिला प्रवाशांचा सार्वजनिक प्रवास निर्धोक व्हावा म्हणून आम्ही वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करतच असतो. शासनाकडून ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत, असं मला वाटतं. – सुशीबेन शाह, अध्यक्ष, राज्य महिला आयोग
टॅक्सी-रिक्षाचालकांनाही सामाजिक जागृतीचं प्रशिक्षण द्यावं!
आजच्या घडीला अवेळी तसंच अनोळखी ठिकाणी टॅक्सी-रिक्षातून प्रवास करणं हे सर्वसामान्य माणसांना सुरक्षित वाटत नाही. अंधांच्या बाबतीत तर ही एक जोखीमच असते. कित्येकदा तर नेहमीच्या रस्त्याने प्रवास करताना ब-याचदा टॅक्सी-रिक्षा मिळवणं अवघड होतं. रिक्शावाले अजिबात दाद देत नाहीत. ‘मीटर रीडिंग’च्या बाबतीतही फसवणूक होते. टॅक्सी-रिक्षात चढता-उतरतानाही अपंग, अंधांना वेळही लागतो आणि विशेषत: अपंग असल्यास त्रासही होतो. सर्वसामान्यांना टॅक्सी-रिक्षाचालक कुठे घेऊन जात आहे, हे कळतं, अंधाला तर त्याचाही अंदाज येऊ शकत नाही. हाताता काठी असलेल्या अपंग वा अंधांच्या बाबतीत तरी माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा. एखादी अपंग व्यक्ती, वयस्कर मंडळी, रुग्ण वा तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची गरज असलेली व्यक्ती यांचं भाडं स्वीकारणं टॅक्सी-रिक्षाचालकांना सक्तीचं केलं पाहिजे. सर्वसामान्य व्यक्ती पाहू शकतात त्यामुळे चालक वा प्रवासात सोबत असणारी अनोळखी व्यक्ती कशी आहे, तिचे हावभाव काय आहेत, हे तिच्याकडे पाहून संभाव्य धोक्याची त्यांना जाणीव होते. आम्हाला मात्र जोपर्यंत अनपेक्षित स्पर्श होत नाही, तोपर्यंत समोरच्याचा हेतू कळत नाही. प्रवासादरम्यान काही शंकास्पद वाटल्यास आपण ज्या टॅक्सी वा रिक्षात बसलो आहोत, त्याचा क्रमांक, निघाल्याचं ठिकाण आणि पोहोचण्याचं ठिकाण ठरावीक क्रमांकावर ‘एसएमएस’ केल्यास ती टॅक्सी वा रिक्षा दरम्यानच्या योग्य मार्गावर आहे का, याचा ट्रॅक ठेवला जाऊ शकतो. पण हे सगळं अंध व्यक्तींना करणं कठीण असतं. यासाठी अंध व्यक्तींचा विचार करता, रिक्षा आणि टॅक्सीमध्ये ‘टॉकिंग मीटर’ असावं. काही रिक्षा आणि टॅक्सी स्टँड स्टेशनपासून दूर असतात, मग शोधाशोध होते. अशा वेळी त्यांची जागा निश्चित असल्यास व त्या ठरावीक जागी रेल्वेतील अपंगांच्या डब्याजवळ ‘बिप’चा आवाज कायम वाजत असतो, त्याप्रमाणे आवाज सुरू असल्यास टॅक्सी-रिक्षा स्टॅँड कुठे आहे, हे ओळखणं आणि तिथे पोहोचणं सोपं होईल. अंध आणि अपंग व्यक्तींना टॅक्सी-रिक्षात बसल्यावर त्यांचा मोबाइल त्या वाहनाबाहेर फेकला गेल्यास त्यांच्या प्रवासाचा मार्ग ‘ट्रॅक होणं’ तिथेच संपतं. या कारणास्तव व एकूणच सुरक्षितेसाठी टॅक्सी-रिक्षा चालकांचे परवाने, त्यांची ओळखपत्रं यांची काटेकोर तपासणी होत राहणं गरजेचं आहे. शिवाय सामाजिक जागृतीविषयीचं प्रशिक्षणही टॅक्सी-रिक्षाचालकांना दिलं गेल्यास प्रवास अधिक सुरक्षित होऊन टॅक्सी-रिक्षाचालकांच्या वागण्यात अपेक्षित बदल घडू शकेल. – प्रा. डॉ. अभिधा धुमटकर, सहायक प्राध्यापिका, साठे महाविद्यालय, विलेपार्ले
मुंबईतली सार्वजनिक वाहतूक सुरक्षितच आहे!
रिक्षा-टॅक्सीतून प्रवास करणं असुरक्षित आहे, असं मला मुळीच वाटत नाही. आमचं वाहतूक खातं अतिशय काटेकोरपणे काम करतं. मुंबईत महिलांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आज मुंबईच्या रेल्वे स्थानकावर रात्री एक वाजता जरी एखादी महिला उतरली तरी ती एकटीनं टॅक्सीचा-रिक्षाचा प्रवास करू शकते. आपल्याकडचे काही रिक्षा-टॅक्सीवाले लोक जे प्रवासी त्यांचा ऐवज, दागिने विसरून वाहनांमधून विसरून जातात, ते प्रामाणिकपणे परत करतात. कधी एखाद्याचा अपघात रस्त्यावर झाला असेल तर माणुसकीच्या नात्यातून ते त्या व्यक्तीला मदतही करतात. दारू किंवा व्यसन करणा-या वाहनचालकांवर मुंबई वाहतूक पोलिस नेहमीच कठोर कारवाई करतात. अशा गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद मुंबई वाहतूक खात्याने केली आहे. तेव्हा मुंबईत रिक्षा-टॅक्सीतून प्रवास करणं असुरक्षित आहे, असं मला मुळीच वाटत नाही – प्रताप दिघावकर, पोलिस उपायुक्त वाहतूक, मुख्यालय व पूर्व उपनगरे, मुंबई
अनधिकृत वाहनचालक आणि सरकारी उदासीनता कारणीभूत!
मला वाटतं की, काही अनधिकृत टॅक्सी-रिक्षा चालकांमुळे त्यातून प्रवास करणा-या प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. यासाठी स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रीपेड टॅक्सी सेवा सीएसटी स्थानकापासून सुरू केली आहे. होतं काय की, काही अनधिकृत चालकांमुळे जे अधिकृत परवानाधारक टॅक्सी-रिक्षाचालक आहेत तेही भरडले जात आहेत. मुंबईत त्यातल्या त्यात परिस्थिती बरी आहे, पण इतर काही ठिकाणी प्रवाशांना फसवलं जाण्याच्या घटना घडत आहेत. कधी कधी काही चालक हे व्यसन करून वाहन चालवताना आढळतात, हेही तितकंच खरं आहे. पण त्यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने पोलिसात तक्रारही केली आहे. मात्र त्याबाबतीत आमचा अनुभव तितकासा चांगला नाही. कारण पोलिस अशा अनधिकृत चालकांवर कठोर कारवाई करताना दिसत नाहीत. काही पोलिस या लोकांकडून हप्ते घेत असल्यामुळे ते अशा लोकांना रोखू शकत नाहीत आणि मग त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आमचा प्रयत्न आहे की, समाजातले वयस्कर लोक, महिला, मुली यांना सुरक्षित प्रवास करण्यास मिळावा, त्यासाठी आम्ही आमच्या सेवेतील प्रत्येक ड्रायव्हरचं छायाचित्र, त्याचा इथला आणि गावचा पत्ता-फोन या सा-याची नोंद ठेवतो. तसंच जिथून आमची प्रीपेड सेवा देणारे बूथ आहेत, तिथेही आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्यामुळे रात्री दोन वाजता जरी एखादी महिला एकटीने प्रवास बुक करण्यासाठी आली तर त्याचा रेकॉर्ड आमच्याकडे राहतो. प्रत्येक वेळेस ग्राहकाला आम्ही रितसर पावती देतो. त्यामुळे आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने पूर्ण काळजी घेतो की, आमच्याकडे येणा-या प्रत्येक महिलेला सुरक्षित प्रवासाचा लाभ घेता यावा. त्यासाठी सरकारने अधिकाधिक महिला टॅक्सीचालकांना मोफत परवाने देण्याची सोय करायला हवी. प्रत्येक स्टेशनपासून पी्रपेड टॅक्सीचा पर्याय जर आपल्याला देता आला तर निश्चितच काही प्रमाणात का होईना छेडछाड, लुटमार अशा गुन्ह्यांना चाप बसेल. त्यासाठी सरकारची मानसिकता दिसत नाही. जेव्हा कधी एखादं अघटित घडतं तेव्हाच फक्त त्या घटनेची चर्चा जोरात होते. त्यावर वादंग होतात. महिन्या-दोन महिन्यांनी पुन्हा सगळं बासनात जातं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रवाशांनीही एखाद्या वाहनातून प्रवास करताना सजग राहायला हवं. एखाद्या वेळेस काही शंका आली, तर लगेच आरडाओरडा करायला हवा. पोलिसांनी प्रसिद्ध केलेले काही नंबर आपल्या मोबाइलमध्ये ठेवावेत आणि गरज पडल्यास त्यावर फोन करून आपण अडचणीत आहोत हे कळवायला हवं. शक्यतो प्रीपेड टॅक्सी, किंवा संघटनेद्वारे दिल्या जाणा-या टॅक्सी-रिक्षा सुविधेचा लाभ घ्यायला हवा. – के. के. तिवारी, अध्यक्ष, स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा संघटना
प्रवाशांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे!
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणती यंत्रणा असायला हवी याबद्दल, आशा करणंचआम्ही सोडून दिलं आहे. हे बदल केव्हा होतील, कधी होतील काहीच सांगता येत नाही. त्यापेक्षा मी किंवा माझ्यासारख्या ज्या काही महिला प्रवाशी रिक्षा-टॅक्सीतून प्रवास करतात त्यांना एवढंच सांगू इच्छिते की, त्यांनी स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी. अशा वाहनांतून प्रवास करताना स्वत:ला शक्य असेल तेवढी सावधगिरी बाळगावी. प्रवासादरम्यान काही वाईट प्रसंग होत असेल असं लक्षात आलं तर सुरक्षेच्या दृष्टीनं ती जे काही करता येईल ते त्यांनी करावं. यापलीकडे इतर कोण तुमच्या सुरक्षिततेसाठी काही करू शकेल, असं मला वाटत नाही. – सुमैया खान, महिला टॅक्सी ड्रायव्हर
चालकांना कोड नंबर द्या!
आजकाल आपण अनेक घटना ऐकतो, पाहतो, अनुभवतो. यावरून रिक्षा-टॅक्सीतून प्रवास करताना असुरक्षित वाटतं, हे खरं आहे. अगदी अलीकडेच माझ्या शेजारी राहणा-या बाई रिक्षातून प्रवास करत असताना त्यांची रिक्षा सिग्नलपाशी थांबली. सिग्नल सुरू होत असतानाच काही कळायच्या आत झपाटय़ाने एक मुलगा त्यांच्या रिक्षापाशी आला आणि त्यांच्या दंडावर काहीतरी वार करून पसार झाला. त्यांना सुरुवातीला काही कळलंच नाही. नंतर त्यांना हात रक्ताने माखलेला दिसला. त्या मुलाला त्यांना फक्त इजा करायची होती की, त्याला त्यांच्या गळ्यातील ऐवज चोरायचा होता, हे त्यांना नीट कळलंच नाही. पण हे होताना या प्रसंगात त्या रिक्षावाल्याने त्यांना काहीच मदत केली नाही. बरेचदा असंही बोललं जातं की, या रिक्षावाल्यांचा आणि स्थानिक भुरटय़ा चोरांचं संगनमत असतं. पण ते शोधणार कोण? अशा वेळेस माझ्यासारख्या ज्येष्ठ वयाच्या व्यक्तींना प्रवास करताना अधिकच असुरक्षित वाटतं. सगळेच रिक्षा-टॅक्सीवाले वाईट असतात, असं म्हणता येणार नाही. काही खूप चांगले असतात. तुम्हाला मदत करतात. पण त्यांची संख्या अतिशय कमी आहे. म्हणूनच मला वाटतं, प्रत्येक महत्त्वाच्या स्थानकाच्या ठिकाणासाठी प्रीपेड टॅक्सीची सुविधा असायला हवी किंवा एखाद्या विभागातील टॅक्सी-रिक्षाचे तसंच त्यांच्या चालकांचंही विभागवार कोडिंग करायला हवं. म्हणजे जर एखाद वेळेस कोणाला त्या रिक्षा-टॅक्सीवाल्याबद्दल काही तक्रार असेल तर स्थानिक पोलिस स्थानकात वा त्यांच्या अधिकृत बूथवर ती करता येईल. त्यासाठी प्रत्येक विभागाची नोंद आरटीओनं करायला हवी. अमुक इतक्या अंतरापासून अमुक इतक्या अंतरापर्यंत जर प्रवास करायचा असेल तर त्याची नोंद व्यवस्था प्रत्येक परिसरासाठी असायला हवी. म्हणजे महिला, मुली, आमच्यासारखे वयस्क लोक यांना प्रवास करताना सुरक्षित वाटेल. एखादा वाहनचालक दोषी आढळल्यास पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करायला हवी. म्हणजे गैरवर्तणूक करणा-या, नशेत वाहन चालवणा-या वाहनचालकांना चाप बसेल. – रश्मी ओक, ज्येष्ठ महिला संघटना, सदस्य
गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे प्रवासी असुरक्षित!
आजकाल सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास करणं खरंच असुरक्षित झालेलं आहे. पोलिस यंत्रणेचा वचक उरलेला नाही. विघातक प्रवृत्तींना कोणतीही भीती उरलेली नाही. आज प्रवाशांवर कुठेही हल्ला होऊ शकतो, कोणत्याही सार्वजनिक वाहनातून जाताना त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याची उदाहरणं आपण रोजच पाहतोय. याचं कारण म्हणजे समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतेय. सोशल मीडियामुळे नको ती माहिती लोकांपर्यंत पोहोचतेय. आता कामानिमित्त घराबाहेर जाणं भागच असेल, तर ते कोणी टाळू शकत नाही. महिलांनाही त्यांनी सातच्या आत घरात आलंच पाहिजे असं सांगता येणं शक्य नाही, पण मग एखाद्या प्रवाशाला धोका होतोय असं आढळलं तर इतर प्रवाशांनीही पुढे येऊन त्याचं रक्षण केलं पाहिजे. बघ्याची भूमिका घेता कामा नये. गुन्हेगार आक्रमक असतील तर काही काळापुरतं आपणही स्वसंरक्षणासाठी आक्रमक व्हायला हरकत नाही. कारण ही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली तर उद्या अशी वेळ आपल्यावरही येऊ शकते हे इतर प्रवाशांनीही लक्षात ठेवावं. एकूण सार्वजनिक प्रवासातील सुरक्षेबाबत उपाय शोधताना सर्वात आधी सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. एकटी पोलिस यंत्रणा कुठे कुठे मदतीला येणार तुमच्या? त्यामुळे सार्वजनिक प्रवास सुखाचा करायचा असेल तर समाजाने स्वत:चा दृष्टिकोन बदलला पाहिजे. राजकीय पक्षदेखील आज त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी रस्त्यावर उतरून प्रसंगी हाणामारी, नुकसान करताना दिसतात. लोकांमधल्या आक्रमकतेला, गुन्हेगारी प्रवृत्तीला अशा काही घटना खतपाणीच घालतात व त्याचा एकंदरीतच सर्वच ठिकाणी परिणाम दिसतो, याचं भान राजकीय पक्षांनीदेखील ठेवावं.- भारती मोरे, सामाजिक कार्यकर्त्यां
रिक्षा स्टँडवरील कार्यालयात प्रवासाची नोंद असावी!
मी रोज रिक्षाने प्रवास करते. त्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. पण यातून हवी असलेली सुरक्षा आम्हाला कधीच मिळत नाही. रिक्षा, टॅक्सी यांसारख्या वाहनात सुरक्षा यंत्रणा येईल तेव्हा येईल, पण मला असं सुचवावसं वाटतं की, रिक्षाच्या युनियन असतात. प्रत्येक रिक्षा स्टँडवर त्यांचं एक छोटसं ऑफिस असावं. जिथे एखाद्या प्रवाशाला अमुक एका ठिकाणी जायचं आहे, तो प्रवासी कोणत्या रिक्षानं जाणार आहे, किती वाजता रिक्षा पकडली अशा सगळ्या माहितीची नोंद असावी. ही यंत्रणा फारशी खर्चिक नाही. – शिल्पा सावंत, प्रवासी
लंडनमधील टॅक्सीसेवेचा आदर्श घ्यावा!
लंडनमधील टॅक्सी प्रवास हा जगाच्या टॅक्सी-रिक्षा प्रवासामधला सगळ्यात आदर्श आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशा प्रकारे असावी याचं ते एक उत्तम उदाहरण आहे. या टॅक्सींच्या डिझायनिंगपासून या टॅक्सीत बसणा-या लोकांच्या सुरक्षेपर्यंत अनेक गोष्टींचा विचार करण्यात येतो. एकाच कंपनीच्या व एकसारख्या दिसणा-या या टॅक्सीज या देशाची शान आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या टॅक्सी बनवताना सर्व आकारमानाच्या लोकांना इथे बसणं अगदी आरामदायी कसं होईल याचाही विचार केला जातो. टॅक्सीतून प्रवास करणा-यांना बसताना त्रास होऊ नये यासाठी इंग्लंडमधल्या टॅक्सीचं छतही उंच असतं. या टॅक्सीचे परवान्यासाठीच्या अटी फार जाचक असतात व त्या टॅक्सी चालवणा-यांना पूर्ण कराव्याच लागतात. त्यात सगळ्यात पहिल्यांदा येतं वाहन चालवण्याचं कौशल्य. वाहतुकींच्या सर्वच नियमांची टॅक्सी ड्रायव्हर्सना अगदी काटेकोर माहिती असावी लागते. त्यासाठी त्यांच्या विविध चाचण्याही घेतल्या जातात. त्या सा-या प्रक्रियेतून जाताना कुठेही शॉर्टकट वा कुठेही भ्रष्टाचार केला जात नाही. नियमांचं काटेकोर पालन केलं जात असतं. एखादा वाहनचालक चाचणीत अयशस्वी झालेल्यांना पुन्हा संधी जरी मिळत असली तरी त्याच्याही मर्यादा पाळल्या जात असतात. टॅक्सी चालवणा-यांना रस्त्यांचं योग्य ते ज्ञान असलेच पाहिजे, अशी अट इथे आहे. त्यामुळे ‘मला माहीत नाही, तुम्हीच रस्ता सांगा’ असं वाक्य तुम्हाला स्वप्नातही ऐकू येणार नाही. प्रवाशांना जवळच्या रस्त्याने इच्छित स्थळी नेलं पाहिजे, अशी इथली अट आहे. त्यामुळे तुम्हाला रस्त्यांची किती माहिती आहे याचीही कडक चाचणी घेतली जाते. या कामासाठी इतक्या चाचण्या घेतल्या जातात, त्यामुळे हे काम फार महत्त्वाचं व जबाबदारीचं आहे याची भावना टॅक्सीचालकांच्या मनात निर्माण होत असते. या सा-या गोष्टींबरोबरच सौजन्यपूर्ण वागणूक ही तर अगदी अत्यावश्यक गोष्ट आहे. इंग्लंडमध्ये टॅक्सीचालकाला टीप देण्याची पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही कधी विसरलात, तर चालक तुम्हाला त्याचीही सौजन्याने आठवण करून देतो. इंग्लंडमधल्या टॅक्सींच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट अशी की, टॅक्सी चालवण्याच्या कामाला इथे प्रतिष्ठा आहे. त्यामुळे प्रवासी व टॅक्सीचालक यांच्यातले संबंध नेहमीच सौदार्हपूर्ण असतात. – निकिता गुल्हाने, अनिवासी भारतीय, लंडन
संकलन
तृप्ती राणे
शब्दांकन
राजेश शिरभाते, विशाखा शिर्के, अदिती पराडकर, श्रद्धा पाटकर-कदम, प्रियांका चव्हाण, प्रतीक्षा चौकेकर