शार्दूल ठाकूर आणि बलविंदर सिंग संधूच्या (प्रत्येकी ४ विकेट) प्रभावी माऱ्याच्या जोरावर रणजी करंडकाच्या दुस-या फेरीत (ब गट) माजी विजेत्या मुंबईने पंजाबला १५४ धावांत रोखले.
मुंबई : शार्दूल ठाकूर आणि बलविंदर सिंग संधूच्या (प्रत्येकी ४ विकेट) प्रभावी माऱ्याच्या जोरावर रणजी करंडकाच्या दुस-या फेरीत (ब गट) माजी विजेत्या मुंबईने पंजाबला १५४ धावांत रोखले.
पहिल्या दिवसअखेर गुरुवारी यजमानांनी २ बाद १०३ धावा केल्यात. ‘वनडाउन’ श्रेयस अय्यरने ६१ धावांची नाबाद खेळी करताना मोठी आघाडी घेण्याच्या मुंबईच्या आशा पल्लवीत केल्यात.
मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर श्रीदीप मांगेला (७) लवकर बाद झाला. अन्य सलामीवीर अखिल हेरवाडकरलाही (१९) मोठी खेळी करण्यात अपयश आले. मात्र श्रेयसने एक बाजू लावून धरताना मुंबईला सावरले.
त्याने ४३ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६१ धावांची खेळी करताना मुंबईचे ‘शतक’ फलकावर लावले. त्याला सूर्यकुमार यादवची (खेळत आहे १६) चांगली साथ लाभली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. पहिल्या डावातील आघाडीसाठी यजमानांना आणखी ५१ धावा हव्यात. सद्यस्थितीत मुंबईला मोठी आघाडी घेण्याची संधी आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार आदित्य तरेने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय मध्यमगती गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर मनन वोहराने (३४) आश्वासक सुरुवात केली तरी प्रमुख फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.
कर्णधार युवराज सिंगही केवळ १३ धावा करू शकला. मध्यमगती शार्दूल ठाकूर आणि बलविंदर संधूने ठराविक अंतराने प्रतिस्पर्ध्यांना हादरवले. मधल्या फळीतील गितांश खेरामुळे (३२) पंजाबला दीडशेपार मजल मारता आली. चहापानापूर्वी पाहुण्यांचा डाव ५७ षटकांत संपला.
शार्दूल (४७-४) आणि बलविंदरने (३१-४) अप्रतिम मारा केला. अन्य मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीने एक विकेट घेतली. मध्यमगती गोलंदाजांना मिळालेले यश पाहता कर्णधार तरेने डावखुरा फिरकीपटू हरमीत सिंग (४ षटके) आणि अभिषेक नायरचा (९ षटके) फार कमी वापर केला.
संक्षिप्त धावफलक : पंजाब – १५४(वोहरा ३४, खेरा ३२, ठाकूर ४७-४, संधू ३१-४) वि. मुंबई – २ बाद १०३(अय्यर खेळत आहे ६१).
महाराष्ट्र ५ बाद २३१ खडिवले, बवणेने सावरले
कटक : ‘ब’ गटातील अन्य लढतीत ओदिशाविरुद्ध महाराष्ट्राने पहिल्या दिवसअखेर ५ बाद २३१ धावा केल्या. सलामीवीर हर्षद खडिवले (७४) आणि अंकित बवणेच्या (६०) दमदार खेळीमुळे पाहुण्यांनी अडीचशेपार मजल मारली. हर्षद आणि अंकितने दमदार फलंदाजी केली तरी सलामीवीर स्वप्नील गुगले (२) तसेच केदार जाधवसह (२) कर्णधार रोहित मोटवानीने (२२) निराशा केली. ओदिशातर्फे बिपलब समंतरायने ३ आणि सूर्यकांत प्रधानने २ विकेट घेतल्या.