ठाणे महापालिकेत दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत मुंब्य्रात काँग्रेसच्या रेश्मा पाटील आणि कळव्यात राष्ट्रवादीचे अक्षय ठाकूर यांचा विजय झाला.
ठाणे- मुंब्रा व कळवा येथील पोटनिवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने बाजी मारली. कळव्यातून राष्ट्रवादीचे अक्षय ठाकूर १४९ मतांनी तर मुंब्रा येथे काँग्रेसच्या रेश्मा पाटील या १ हजार ७९४ मतांचे मताधिक्य घेऊन विजयी पताका फडकावली. या निवडणुकीत यंदा प्रथमच मतदारांनी ‘नोटा’ (नकारार्थी मत) वापर केला आहे.
या निवडणुकीत प्रथमच मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. कळव्यात ५३ जणांनी तर मुंब्रा येथे ६९ मतदारांनी नकारात्मक मत नोंदवले. काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झाल्याने ठाणे महापालिकेतील सत्ताधारी व लोकशाही आघाडीचे संख्याबळ समसमान झाले आहे.
ठाणे महापौर निवडणुकीत काँग्रेसचे राजन किणे, अनिता किणे, शकिला कुरेशी यांनी बंडखोरी केल्याने त्यांचे सदस्यत्व कोकण आयुक्तांनी रद्द केले होते. तर स्थायी समिती निवडणुकीपूर्वी कळव्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश साळवी यांनी राजीनामा दिल्याने या निवडणुका होऊ घातल्या होत्या. यात राजन किणे हे ‘५९ अ’मधून तर अशिया कुरेशी हे काँग्रेसचे उमेदवार ‘५७ अ’मधून बिनविरोध निवडून आले होते.
त्यामुळे केवळ दोन प्रभागांत रविवारी निवडणूक झाली. कळवा प्रभाग ‘५४ अ’मधून राष्ट्रवादीच्या अक्षय ठाकूर यांनी ५ हजार २२९ मते घेऊन शिवसेनेचे सचिन म्हात्रे यांच्यावर १४९ मतांनी मात केली. मुंब्रा प्रभाग ‘५९ ब’ मधून काँग्रेसच्या रेश्मा पाटील यांना ५ हजार ३९ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सपाच्या तुलसीमुन्नीसा रहीस यांना १ हजार ५२३ मते मिळाली. महापालिकेत सत्ताधा-यांकडे ६५ तर लोकशाही आघाडीक डे ६१ असे संख्याबळ होते. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या.
अंबरनाथ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी
अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेच्या प्रभाग ३१च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रेसी सिद्धार्थन यांचा विजय झाला आहे. शिवसेनेचा उमेदवार तिस-या क्रमांकावर फेकला गेला. अंबरनाथ नगर परिषदेचे प्रभाग ३१चे नगरसेवक पी. सिद्धार्थन यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर रविवारी मतदान झाले होते. सोमवारी सकाळी झालेल्या मतमोजणीत निवडून आलेल्या ग्रेसी सिद्धार्थन यांना ६१४ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार जयशंकर यांना दुस-या क्रमांकाची ५६२ मते मिळाली. मात्र, शिवसेनेचे उमेदवार सी. राजेंद्रन यांना ५१० मते मिळाल्याने ते तिस-या क्रमांकावर फेकले गेले.