ग्रामीण भागात डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्यासाठी होणा-या शारीरिक व मानसिक त्रासातून या महिलांची सुटका करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद ग्रामीण महिला हंडा मुक्ती कार्यक्रम राबवणार आहे.
ठाणे- ग्रामीण भागात डोक्यावर हंडा घेऊन महिलांची पाणी आणण्यासाठी पायपीट सुरूच असते. या शारीरिक व मानसिक त्रासातून या महिलांची सुटका करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद ग्रामीण महिला हंडा मुक्ती कार्यक्रम राबवणार आहे. यात थेट सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेसाठी फक्त सहा लाखांचा खर्च येणार आहे.
या योजनेत सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणी उचलून ते एका टाकीत टाकण्यात येणार आहे. नंतर या पाण्याचा गावपाडय़ांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या संबंधीचा प्राथमिक अहवाल जिल्हा परिषदेने तयार केला असून, १२० गावांत ही योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्य्मा सेस फंडातून एक कोटीच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. राज्यात ८५ टक्के ग्रामीण पाणीपुरवठा हा भूजलावर अवलंबून असतो. त्यामुळे विहिरीतील पाणी हा ग्रामीण पाणीपुरवठय़ाचा फार महत्त्वाचा घटक आहे.
दिवसेंदिवस भूजलातील पाण्याची पातळी खोल खोल जात असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी खोदण्यात येणा-या विहिरी या गावपाडय़ांपासून लांब तसेच खोल खाचरात किंवा उतारावर खोदण्यात येतात. या लांब अंतरावरील व खोलीच्या ठिकाणी असलेल्या विहिरीतील पाणी उपसून ते हांडे डोक्यावर वाहून नेण्याची अवघड जबाबदारी महिलांवर पडते. त्यासाठी त्यांचे दिवसातील ३ ते ४ तास वाया जातात. लहान लहान वाडय़ा-वस्त्यांसाठी पाणीपुरवठा योजनांच्या मागणीची पूर्तता करणे हा जिल्हा प्रशासनाचा व पाणीपुरवठा खात्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अशा योजनांची देखभाल दुरुस्ती करणे, विद्युत मंडळाची बिलाची रक्कम अदा करणे, याबाबी लहान वाडय़ा वस्त्यांच्या क्षमतेच्या पलीकडच्या असून नळपाणीपुरवठा योजनांची मागणी प्रचंड आहे.
या सर्व अडचणींचा विचार करून महिलांच्या डोक्यावरील हंडय़ाने पाणी वाहून नेण्यासाठीचे कष्ट कमी करणे, योजना देखभालीचे कष्ट कमी करणे, विद्युत मंडळाच्या देयकातून सुटका करणे व योजना सुरळीत चालू राहण्यासाठी लांब व डोंगराळ भागातील खोल विहिरीवर सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना राबवण्याचे जिल्हा परिषदेने ठरवले आहे.
योजनेचे फायदे
ग्रामीण भागात विहिरीवरून दूरवरून पाणी आणत असल्याने मुलींना तिसरीपासून शाळेतून घरी ठेवण्यात येते. तो वेळ वाचल्याने मुली नियमित शाळेत जाऊन शिक्षण घेणार आहेत. या योजनेत वीजबिल भरण्याची गरज नाही. त्यामुळे पाणीपट्टीपासून मिळमार पैसा पूर्णपणे फंडात जमा होत असल्याने ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ होते. ग्रामीण भागात दिवसातील अनेक तास भारनियमन नसल्याने अनेकांना पाणी मिळत नाही. पण सौरऊर्जेमुळे गावक-यांना पाणी उपलब्ध होणार आहे. खेडय़ागावात पाण्यासाठी महिलांची लांबच लांब पायपीट होत असते. पण सौरऊर्जेमुळे आता महिलांचा त्रास वाचणार आहे.
अशी आहे योजना
या योजनेत अस्तित्वातील विहिरीवर अत्यल्प अश्वशक्तीचा सौरऊर्जेवर आधारित पाणबुडी पंप बसवून ५ हजार लिटर क्षमतेच्या उंचावरील टाकीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर ते नळाद्वारे गाव व पाडय़ात पुरवण्यात येणार आहे. या योजनेसाठी ६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही योजना राबवण्याचे काम एक कंपनी करणार असून ५ वर्षे देखभाल-दुरुस्ती ही कंपनी करणार आहे.