होळीकरिता कोकणात जाणा-या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन, मागील पाच महिन्यांपासून केवळ देखभालीच्या कारणास्तव यार्डात गेलेली डबल डेकर त्या निमित्ताने तरी बाहेर काढली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र असे काहीच झाले नाही. त्यामुळे आता उन्हाळी स्पेशल गाडी म्हणून तरी चालवणार का, याची वाट कोकणी माणूस पाहात आहे. मध्य रेल्वेच्या अधिकारी वर्गाकडे या विषयी विचारणा केल्यास डबल डेकर पुन्हा कोकण रेल्वे मार्गावर धावेल की नाही, यावर कोणीही बोलायला तयार नाही. यावर मध्य रेल्वेचा इरादा काय असावा, हे स्पष्ट होते.
मागील गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर ट्रेन चालवून उदो-उदो करून घेण्याचा मान मध्य रेल्वेने मिळवला. मात्र त्यानंतर चालवण्यात आलेली डबल डेकर केवळ काही दिवस चालवल्यानंतर तोटय़ात जात असल्याचा निष्कर्ष काढून ढिसाळ नियोजनावर पांघरून घालण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेच्या अधिका-यांकडून अगदी सोयीस्कररित्या करण्यात आला.
वस्तूत: गणेशोत्सवात चालवण्यात आलेली गाडी प्रीमियम दराने चालवण्याचा घाट घालत मध्य रेल्वेने प्रवाशांचा खिसा चांगलाच कापण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हुशार प्रवाशांनी रेल्वेच्या या प्रयत्नांना यश येऊ दिले नाही, हेदेखील तेवढेच खरे. अखेर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठल्याने सामान्य दरांत चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला खरा, मात्र तोही दिवाळीत कमी गर्दीचा वेळी. त्यामुळे प्रवाशांचे हित न जपता ढिसाळ नियोजनाचे आणखी एक उदाहरण मध्य रेल्वेने दाखवून दिले.
गणेशोत्सवातील प्रीमियम दरानंतर दिवाळीत सामान्य दरांत चालवण्याचा निर्णय घेतल्याने अव्वाच्या-सव्वा भाडे वसूल केले गेले तर दिवाळीत कोकणात जाणा-या प्रवाशांची संख्या खूपच कमी असते. मात्र असे असतानादेखील रेल्वेने कोणताही विचार न करता ही गाडी चालवली आणि अपेक्षेप्रमाणे अपयश पदरात पाडून घेतले. आता कोकण रेल्वे मार्गावर होणा-या गर्दीबाबत मध्य रेल्वे प्रशासनाला माहीत नसेल, असे म्हणता येणार नाही. मात्र खुद्द रेल्वे मंत्र्यांच्याच गावी गाडी न चालवण्याचा विडा उचललेल्या मध्य रेल्वे प्रशासनाला समजावणार कोण? कोकणातील गणेशोत्सव, नाताळ, होळी, उन्हाळी सुट्टी या दिवसांत प्रचंड गर्दी होते. हे काही रेल्वेच्या अधिका-यांना माहीत नसेल असे म्हटले तर त्यांच्या अनुभवावर संशय व्यक्त करण्यासारखेच होईल.
भारतीय रेल्वेला सर्वाधिक नफा महाराष्ट्रातून मिळतो; मात्र, महाराष्ट्रात गाडय़ा सोडण्यात आतापर्यंतच्या सर्वच रेल्वेमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचा आजवरचा इतिहास आहे. याला राजकीय, भौगोलिक, आर्थिक अशी कोणतीही कारणे असोत अन्याय झाला, हे सत्यच. देशभरात असे किती तरी मार्ग आहेत जिथे रेल्वेला नफा मिळत नाही. प्रत्यक्षात रेल्वे ही कोणतीही व्यावसायिक संस्था नसून ती एक सेवा देणारी संस्था असल्याने फायद्याचा विचार करणे चुकीचे आहे, याची जाणीव असताना अपेक्षेप्रमाणे नफा न झाल्याने डबल डेकरला मध्य रेल्वेने अगदी सहज तोटय़ाचा शिक्का मारला. सणा-सुदीच्या दिवसांत मिळेल त्या गाडीने डबल पैसे मोजत खासगी वाहनांनीदेखील कोकणातील प्रवासी प्रवास करतात, तर मग डबल डेकरने का बरे जाणार नाहीत. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास या गाडीला चांगला प्रतिसाद मिळेल, यात तिळमात्र शंका नाही.
भारतीय रेल्वे संपूर्ण देशाकरिता कार्यरत असली तरी सर्वाधिक रेल्वेचे जाळे हे महाराष्ट्रात आहे. मात्र केवळ रेल्वे मंत्रालय दिल्लीत असल्याने रेल्वे मंत्रालयाला येथील प्रवाशांच्या भावना कधी कळल्याच नाहीत, हे दुर्दैवच. एका बाजूला बुलेट ट्रेनचा सुरू करण्याचा घोषणा करण्यात आली आहे. सत्तेच्या जोरावर अशक्य असलेल्या गोष्टी शक्य करण्याचे प्रयत्न सुरू असताना सर्वाधिक महसूल देणा-या महाराष्ट्राकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले जात आहे. आता बुलेट ट्रेन देशात धावणे, ही बाब काही वाईट नाही. मात्र साहजिकच पडणारा प्रश्न बुलेट ट्रेनकरिता देशातील अन्य कोणता मार्ग नव्हता का? व्यवसायाचे कारण पुढे करत गुजरात राज्याकरिता करण्यात येणारा हा खटाटोप असल्याची चर्चा अनेक ठिकाणी सुरू आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केल्यास मुंबई ते गोवा या मार्गावर बुलेट ट्रेन चालवून पर्यटनाला चालना देता आली असती; प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. गोव्यातील पर्यटनाचा विचार केल्यास मोठय़ा प्रमाणात नव्याने रोजगार निर्मिती होऊ शकतो. केवळ दुपदरीकरणाचा प्रश्न मिटवल्यासदेखील हे शक्य आहे; मात्र या संदर्भात कोण किती गंभीर आहे, हे समोर येत आहे. त्यामुळे केवळ सत्तेचा जोरावर कोणाला किती फायदा मिळतो आहे, हे काही वेगळे सांगायला नको.
मुंबई-अहमदाबाद या मार्गावर चालवण्यात येणारी डबल डेकर ट्रेन ही सामान्य दरात चालवण्यात येते; मात्र मध्य रेल्वेने कोकणात चालवताना ही गाडी प्रीमियम दरात चालवली. त्यामुळे मध्य रेल्वेची कोकणातील प्रवाशांच्याकरिता असलेली मानसिकता या निमित्ताने उघड झाली. डबल डेकर ट्रेन भरलेल्या प्रवाशांनी गोव्यापर्यंत नेल्यास जवळपास १६ लाखांचे दिवसाचे उत्पन्न मिळते; मात्र मागील पाच महिन्यांपासून देखभालीकरिता गाडी यार्डात उभी राहिल्याने आतापर्यंत कोटय़वधींचे नुकसान मध्य रेल्वेला सहन करावे लागले आहे.
मुख्य म्हणजे पहिल्याच प्रवासात या गाडीला ग्रहण लागले, असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. अगदी पहिल्याच वेळी गाडी रोहा स्थानकापर्यंत गेली आणि नेहमीप्रमाणे हद्दीचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर कधी कोकण रेल्वे मार्गावर विस्कळीत वाहतूक आणि अन्य कारणांनी या गाडीचा वेग कमी केला. मात्र असे असले तरी डबल डेकरच्या वाटेत सोयीस्कररित्या आडवे आले ते मध्य रेल्वे प्रशासन. कधी अल्प प्रतिसाद तर कधी देखभाल अशी कायमच टोलवा-टोलवीची उत्तरे प्रशासनाकडून देण्यात आली.
आतापर्यंत डबल डेकरचा खेळखंडोबा झाला तो आता पुरे करा आणि स्वत:च्या फायद्यासाठी नव्हे तर प्रवाशांच्या हितासाठी उन्हाळ्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर गाडी चालवण्यास मध्य रेल्वे प्रशासनाने रस दाखवावा आणि हो तेही योग्य नियोजन करून. शिवाय आता रेल्वेमंत्र्यांनी स्वत: याकडे लक्ष देऊ न मध्य रेल्वेचे इरादे बदलवून आपण कोकणातील रेल्वेमंत्री आहोत, याची आठवण करून देण्यास काहीच हरकत नसावी. रेल्वेला सर्वाधिक फायदा मिळवून देणारे मार्ग हे महाराष्ट्रात आहेत. त्यात कोकण रेल्वेचा मार्गही आहे. त्यामुळे या मार्गावरील दुपदरीकरण आणि त्याचबरोबर डबल डेकरचा नियमित प्रवास आणि काटेकोर नियोजन करणे तसे वेळापत्रक आखणे आवश्यक आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या कार्यकाळात काही महत्त्वाचे निर्णय घेऊन कोकण आणि महाराष्ट्रातील इतर मार्गावरील प्रवासी रेल्वे सेवा अधिक चांगली करावी. त्याचबरोबर प्रवाशांना सेवासुविधा, स्थानकांची देखभाल-व्यवस्था अशा गोष्टींकडेही लक्ष द्यावे. कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ा प्रवाशांनी भरून वाहत असताना तिथे डबल डेकरसारख्या गाडय़ा नियमित चालवणे हे प्रवाशांसाठीही उपयोगी ठरेलच पण त्याचबरोबर रेल्वेच्या महसुलात मोठय़ा प्रमाणात वाढ करणारेही ठरेल.