देशातील मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्ये केबल सेवेचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली- देशातील मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्ये केबल सेवेचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. मात्र यासाठी आता कुठलीही नवी मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
संसदेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबपर्यंत या चार प्रमुख शहरांतील एक कोटी 20 लाख ग्राहकांना डिजिटायझेशनने जोडले जाणार आहे. यासाठीची दिलेली मुदत ही अंतिम असून या मुदतीतच हे काम पूर्ण होईल, असा विश्वासही सरकारने संसदेला दिला आहे. डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित केबल ऑपरेटर्सना सेट टॉप बॉक्स दिलेल्या मुदतीत लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक नोव्हेंबरला ही यंत्रणा संपूर्णपणे कार्यान्वित होईल, असा विश्वास माहिती आणि प्रसारण सचिव उदयकुमार वर्मा यांनी व्यक्त केला आहे.
डिजिटायझेशनसंदर्भात केबल ऑपरेटर, मल्टी सिस्टीम ऑपरेटर आणि ‘ट्राय’च्या पदाधिका-यांशी वर्मा यांनी चर्चा केली. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या शहरांमध्ये डिजिटायझेशनची प्रक्रिया मंदगतीने सुरू असल्याचे त्यांनी फेटाळले. सरकारकडून 2014 पर्यंत संपूर्ण देशभर डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.