रेल्वे अर्थसंकल्प पुढील महिन्यात अखेरीस सादर होत असताना रेल्वेला घटत्या प्रवासी व मालवाहतूक उत्पन्नाची चिंता सतावत आहे. रेल्वेला निर्धारित लक्ष्य गाठता आलेले नाही.
नवी दिल्ली – रेल्वे अर्थसंकल्प पुढील महिन्यात अखेरीस सादर होत असताना रेल्वेला घटत्या प्रवासी व मालवाहतूक उत्पन्नाची चिंता सतावत आहे. रेल्वेला निर्धारित लक्ष्य गाठता आलेले नाही. त्यामुळे आर्थिक संकटात रेल्वे सापडली असतानाच अर्थसंकल्पीय तरतुदीतही १२ हजार कोटीची कपात करण्यात आली आहे. त्यात सातव्या वेतन आयोगामुळे रेल्वेवर ३२ हजार कोटीचा बोजा पडला आहे.
डिसेंबर २०१५ मध्ये रेल्वेने मालवाहतुकीतून ९,५३३ कोटी ७ हजार रुपये मिळवले तर लक्ष्य १०,९१८ कोटी ५३ लाख रुपये होते. प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत डिसेंबरमध्ये रेल्वेने ४०३२ कोटी ६१ लाख रुपयांचे लक्ष्य ठेवले होते पण प्रत्यक्ष उत्पन्न ३७८६ कोटी १२ लाख इतकेच झाले. रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. डिसेंबरमध्ये ६८ कोटी २४ लाख तिकिटांची नोंदणी झाली तर लक्ष्य ७१ कोटी ७९ लाख होते.
ही घट १.९४ टक्के होती. लक्ष्य साध्य करण्यात रेल्वेला अपयश आल्याचे मान्य करून एका अधिका-याने सांगितले की, सहसा आर्थिक चित्र डोक्यात ठेवून लक्ष्येही नेहमीच जास्तीची ठेवली जातात. डिसेंबरमध्ये उत्पन्न फारसे आशादायक नसले तरीही जानेवारी ते मार्च दरम्यान उत्पन्न चांगले होईल, अशी आशा आहे. रेल्वेला अर्थमंत्रालयाने पत्र लिहून अर्थसंकल्पीय तरतुदीत कपात करत असल्याचे कळवले आहे. १२ हजार कोटीवर रेल्वेला पाणी सोडावे लागणार आहे. मात्र अर्थमंत्रालयाच्या संपर्कात आम्ही असून हा प्रश्न लवकरच सुटेल, असे हा अधिकारी म्हणाला.