पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बी. सी. रॉय यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारत सरकारने एक जुलै हा दिवस डॉक्टर दिन म्हणून जाहीर केलेला आहे.
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बी. सी. रॉय यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारत सरकारने एक जुलै हा दिवस डॉक्टर दिन म्हणून जाहीर केलेला आहे. अनेक लोक आजारी पडतात आणि त्यांना डॉक्टरकडे जावे लागते. रुग्णांच्या आयुष्यात आजारी पडेल, तो दिवस त्यांच्यासाठी डॉक्टर्स डे असतो. डॉक्टर्स डेच्या निमित्ताने डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंधाबाबत चर्चा व्हावी, विचारविनिमय व्हावा, ही अपेक्षा असते.
विशेषत: गेल्या काही वर्षामध्ये डॉक्टर आणि रुग्ण यांचे संबंध बिघडत चालले आहेत. एखादा रुग्ण एखाद्या रुग्णालयात दाखल होतो आणि दगावतो. डॉक्टरांनी योग्य लक्ष न दिल्यामुळे रुग्ण दगावला, अशी रुग्णाच्या नातेवाइकांची भावना होते आणि ते डॉक्टरला दोष देतात. काही वेळा रुग्णालयात मोडतोड करतात, प्रसंगी डॉक्टरला मारहाणसुद्धा करतात. अशा मारहाणीच्या घटना गेल्या दहा वर्षात खूप वाढल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरी व्यवसाय करणा-या मंडळीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
एरवी कोणीही कोणाला अकारण मारहाण केली की, त्या विरोधात फिर्याद दाखल करता येते, खटला भरला जातो आणि शिक्षाही होते. त्यासाठी कायदा आहे; मात्र, डॉक्टरला केल्या जाणा-या मारहाणीच्या बाबतीत वेगळा कायदा करावा, अशी मागणी डॉक्टरांच्या संघटनेने केली आणि तसा कायदा झालाही आहे. डॉक्टर आपल्या रुग्णाकडे कधी दुर्लक्ष करत नसतात. आपल्या रुग्णालयात आलेल्या रुग्णाचा आपल्या देखरेखेखाली खाली उपचार सुरू असताना मृत्यू व्हावा, असे कोणत्या डॉक्टरला वाटत असते का? हा त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा तर मुद्दा असतोच; परंतु, त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेचाही मुद्दा असतो.
एखाद्या रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण किरकोळ आजारी असतानासुद्धा त्याच रुग्णालयात मरण पावला तर त्या घटनेने डॉक्टरांच्या व्यवसायावरही परिणाम होत असतो. एकंदरीत डॉक्टर मंडळी रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत नसतात, असे डॉक्टरांचे म्हणणे असते आणि त्यांचे हे म्हणणे अमान्य करण्याचे काही कारणही नाही. काही वेळा तर मुळातच अत्यंत अत्यवस्थ रुग्ण रुग्णालयात दाखल केला जातो आणि डॉक्टरने त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढावे, अशी अवास्तव अपेक्षा केली जाते. डॉक्टर हासुद्धा माणूसच आहे आणि वैद्यकीय उपचारांनासुद्धा एक मर्यादा आहे. पण रुग्णाच्या नातेवाइकांचे मात्र भलतेच आग्रह असतात. परंतु मुळात त्यांच्या मनामध्ये डॉक्टर मंडळीविषयी आकस असतो आणि ही खरी अडचण आहे. डॉक्टरी व्यवसायात अलीकडे गरप्रकार फार वाढले आहे आणि डॉक्टरांनीच आपली प्रतिमा बिघडवून घेतलेली आहे.
डॉक्टर निव्वळ लोकांचे पैसे काढण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना फक्त बिलाशी देणेघेणे असते, रुग्णाच्या जीवाशी देणेघेणे नसते, अशी लोकांची भावना झालेली आहे. डॉक्टरी व्यवसायात गैरप्रकार वाढलेले आहेत. त्यामुळे समाजात डॉक्टरांची प्रतिमा बिघडली आहे. सगळेच डॉक्टर तसे नाहीत, काही अपवाद आहेत. डॉक्टरसुद्धा आपल्या क्षेत्रात वाईट प्रवृत्ती शिरल्या असल्याचे मान्य करतात. एकंदरीत समाजात डॉक्टरांची बिघडलेली प्रतिमा कोठे तरी त्यांना होणा-या मारहाणीला कारणीभूत ठरत असते. त्यामुळे डॉक्टर-रुग्ण यांच्यात परस्परांमध्ये सामंजस्य वाढीस लागणे आवश्यक आहे.