अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ‘आपले भाषण न छापल्यास उपोषणाला बसणार’ असा इशारा दिला आहे.
पुणे- साहित्य संमेलन संपले तरी अद्याप १३५ पानी संमेलनाचे अध्यक्षीय भाषण अखिल भारतीय साहित्य महामंडळाने छापलेले नाही. ही गोष्ट श्रीपाल सबनीस यांच्या फारच जिव्हारी लागली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने साहित्य संमेलन अध्यक्षांचे भाषण न छापून राज्यघटनेचा व व्यक्तिस्वातंत्र्याचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांनी २६जानेवारीच्या आत ते छापून प्रदर्शित केले नाही, तर २७ जानेवारीला मी व माझी पत्नी महामंडळाच्या बाहेर लाक्षणिक उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी महामंडळाला दिला आहे.
सबनीस यांच्या या भूमिकेमुळे साहित्य महामंडळासमोर नवी डोकेदुखी सुरू झाली आहे. साहित्य महामंडळाने चूक केली असली तरी अजून वेळ गेली नाही, असे सांगत सबनीस यांनी आपले भाषण लोकांपर्यंत पोहचवावे, अशी अपेक्षा सबनीस व्यक्त केली होती. महामंडळाने एक पाऊल मागे येत भाषण छापण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हे असहिष्णू व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. संमेलनाध्यक्षांचे भाषण न छापणे, त्यात काही मुद्दे आक्षेपार्ह आहेत, असे सांगणे हा त्याचाच भाग आहे. पण महामंडळाला अशा ‘सेन्सॉरशिप’चा अधिकार नेमका दिला कोणी? अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष डॉ. सबनीस यांनी टीका करत आपले मौन सोडले आहे.
नुकतेच पिंपरीमध्ये साहित्य संमेलन दिमाखात पार पडले; मात्र हे संमेलन सुरुवातीपासून वेगवेगळ्या कारणांनी चच्रेत राहिले. संमेलनात संमेलनाध्यक्षांची भूमिका मांडणारे भाषणच यंदा साहित्य महामंडळाने छापूनही वाटले नाही. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत वाद गाजत राहिले. साहित्य महामंडळाने सबनीस यांची जास्तीत जास्त गोची कशी करता येईल, याचे प्रयत्न केले. अखेर सबनीस यांनी साहित्य संमेलन पार पडताच आपले मौन सोडत महामंडळावर सडकून टीका केली आहे.
ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कोणत्याही साहित्य संमेलनाचे मुख्य आकर्षण हे अध्यक्षांचे भाषण असते. अध्यक्षांचे भाषण छापून ते साहित्य संमेलनात वितरित करणे ही महामंडळाची जबाबदारी असते; मात्र यंदा असे घडले नाही.
माझे भाषण छापूनही ते वाटलेच गेले नाही. यामागे महामंडळाचे पदाधिकारी राजकारण करत होते. या भाषणात काही मुद्दे आक्षेपार्ह आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. संमेलनाध्यक्षांचे भाषण न छापणे, त्यात काही मुद्दे आक्षेपार्ह आहेत, असे सांगणे म्हणजे महामंडळाचे असहिष्णूपणाचेच वागणे आहे.
महामंडळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहे की विरोधात, हे महामंडळाने एकदाचे सांगून टाकावे. महामंडळाला अशा सेन्सारशिपचा अधिकार कोणी दिला. संमेलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझे छापील भाषण रसिकांना मिळू न देणे ही माझी, माझ्या विचाराची व पर्यायाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे.
पुस्तक लिहून बुरखा फाडणार!
साहित्य संमेलन, त्याआधी संमेलनाध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक व यादरम्यान आलेल्या अनुभवावर आपण लवकरच पुस्तक रूपाने भाष्य करणार आहोत. संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून संमेलनाच्या समारोपापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली राजकीय व्यक्तींसोबत साहित्य क्षेत्रातील मंडळींनीही राजकारण कसे केले, हे सगळे अनुभव शब्दबद्ध करणार आहे.
डॉ. पी. डी. पाटील माझ्या मागे उभे राहिले!
महामंडळाच्या दोन पदाधिका-यांनी विठ्ठल वाघ यांना, तर एकाने अरुण जाखडे यांना जाहीर पाठिंबा दिला. पदाधिका-यांनी असा पाठिंबा देणे योग्य आहे का? मी महामंडळाला नको होतो; पण लोकशाही मार्गाने निवडून आल्याने त्यांची गोची झाली. अशा वेगवेगळ्या घटना घडल्या असल्या तरी स्वागताध्यक्ष या नात्याने डॉ. पी. डी. पाटील माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याचे मी पुस्तकात नमूद करणार आहे. अध्यक्षांची आत्मकथा हे पुस्तक लिहून मी अनेकांचा बुरखा फाडणार आहे, असेही सबनीस यांनी सांगितले.