बनावट कागदपत्रांच्या आधारे टोलेजंग इमारती उभाारून जमीन मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी डोंबिवलीतील नामांकित भगवती बिल्डरचे अशोक जोशी यांना विष्णुगनर पोलिसांनी अटक केली.
डोंबिवली – बनावट कागदपत्रांच्या आधारे टोलेजंग इमारती उभाारून जमीन मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी डोंबिवलीतील नामांकित भगवती बिल्डरचे अशोक जोशी यांना विष्णुगनर पोलिसांनी अटक केली. मंगळवारी कल्याण न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील दुसरा आरोपी एस. व्ही. तर्टे असून त्यांना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही.
अंबरनाथ पूर्वेतील कानसई परिसरात राहणारे केमिकल कन्सल्टंट अतुल कुलकर्णी यांचे वडील दत्तात्रय कुलकर्णी यांच्या नावावर कोपरगाव येथे जमीन आहे. डिसेंबर १९९४ मध्ये कुलकर्णी यांनी बिल्डर जोशीबरोबर जमिनीचा व्यवहार केला होता. साठे करार केल्यानंतर जमिनीच्या मोबदल्यात धनादेशही देण्यात आले होते. मात्र धनादेश वटले नाहीत, असे कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. जमीन विक्रीचा मोबदला मिळाला नसताना सह हक्कदार लक्ष्मण बांदेकर यांचा ४ ऑगस्ट १९९९ रोजी मृत्यू झाला. मात्र बांदेकर यांची बनावट स्वाक्षरीचा वापर करून बिल्डर जोशी याने ११ऑगस्ट २००१ रोजी कुलमुख्यत्यार पत्र तयार केले. कुलमुख्यातर पत्र एस. व्ही. तर्टे यांच्याकडून तयार करण्यात आले.
याच कुलमुख्यत्यार पत्राद्वारे केडीएमसीकडून विविध परवानग्या मिळवल्या. याच परवानग्यांच्या आधारे सदर जमिनीवर चार मजली दुमजली आणि सात मजली दोन आणि चार इमारतींचे गृहसंकुल उभारले. यात एकूण १९२ फ्लॅट्स आहेत. मात्र जमीनमालक कुलकर्णी यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नसल्याने त्यांनी २६ सप्टेंबर रोजी विष्णुनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन बिल्डर जोशी व एस. व्ही. तर्टे यांच्याविरोधात कलम ४२०, ४६५, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल के ला आहे. विष्णुनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांनी ४५ दिवसांच्या तपासानंतर बिल्डर जोशी याला अटक केली आहे.