कल्याण डोंबिवली एमआयडीसीमधील फेस दोनमधील प्रोबेस इंटर प्रायजेस या रसायनांच्या कंपनीत झालेल्या स्फोटानंतर अनेक प्रश्न पुन्हा समोर आले आहेत.
कल्याण- डोंबिवली एमआयडीसीमधील फेस दोनमधील प्रोबेस इंटर प्रायजेस या रसायनांच्या कंपनीत झालेल्या स्फोटानंतर अनेक प्रश्न पुन्हा समोर आले आहेत. हा भयंकर स्फोट कसा झाला, याची माहिती चौकशीत बाहेर येईलच मात्र, या दुर्घटनेमुळे कल्याण-डोंबिवली शहर व ग्रामीण परिसर, मोहने, शहाड, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागातील मोठे कारखाने व एमआयडीसी क्षेत्रातील विविध प्रकारच्या उद्योगांमधील सुरक्षिततेचे प्रश्न समोर आले आहेत.
प्रदूषण, कामगारांची सुरक्षितता, धोक्याची पातळी अशा अनेक प्रश्नांवर यानिमित्ताने गंभीर होणे अत्यंत गरजेचे असल्याचेही या दुर्घटनेने अधोरेखित झाले आहे. कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील एमआयडीसीमुळे महापालिकेला कायम उत्पन्नाचे साधन निर्माण झाले. स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला. छोटय़ा उद्योगांना पूरक काम मिळाले. या भागात नवीन बाजारपेठ निर्माण झाली.
उद्योग वाढल्यामुळे प्रत्येक एमआयडीसीचे स्वत:चे वेगळे असे अस्तित्व निर्माण झाले. पण त्याच बरोबर प्रदूषण व रासायनिक कारखाने यामुळे मानवी जीवनही सुरक्षित राहिले नाही.
१६ मार्च १९९३ मध्ये कल्याण-मोहने मार्गावर धाकटे शहाड येथे खुल्या नाल्यातून वाहणा-या रासायनिक पाण्यावर प्रक्रिया होऊन निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे नऊ जण मरण पावले. तर ५६ महिला व पुरुषांना विषारी वायूची बाधा झाली. त्यावेळी कावळे, चिमण्या, उंदीर, कोंपडय़ा, कुत्री, म्हशी, बैल असे पशुपक्षीही विषारी वायूमुळे गतप्राण झाले.
यावेळी कामगारमंत्री शाबीर शेख होते, त्यांनी जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणाखाली चौकशी समिती नेमली. मात्र, पाण्यात सोडलेल्या रसायनामुळे निर्माण झालेला विषारी वायू कोणत्या कंपनीतून सोडलेल्या रसायनामुळे ही वायूबाधा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रात कारखान्यातून रसायनांचे छोटेमोठे स्फोट हे नित्याचे झाले आहेत. आगीच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. डोंबिवलीत झालेला हिरवा पाऊस हे अलीकडचे उदाहरणही ताजेच आहे. डोंबिवलील कारखान्यातून जे प्रदूषण हवेत केले जाते त्यामुळे हा हिरवा पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरही याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. कल्याण शहरात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय आहे. पण त्या कार्यालयाकडून नियमबाह्य वागणा-या उद्योगांना नोटिसा देण्याशिवाय कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. कोणत्या कारखान्यात कोणती रसायने वापरली जातात. तेथे सुरक्षा यंत्रणा सक्षम आहे का, याची पाहणी, तपासणी वेळच्या वेळी केली जात नाही. या सर्व भागातील उद्योगांची कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ उत्पादक संघटना आहे.
पूर्वी या संघटनेतर्फे कामगार उद्योग सुरक्षा सप्ताह साजरे केले जात. त्या माध्यमातून छोय़ा उद्योगातील कामगारांना रसायने हाताळण्याची, अपघात झाला तर प्रथमोपचार करण्याचे शिक्षण दिले जात असे. कोणत्या उद्योगात कोणती रसायने वापरली जातात ती किती घातक आहेत, याची माहिती या संघटनेकडे आहे का, या दृष्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते, हे सर्व प्रश्न आता या या भीषण स्फोटातून निर्माण झाले आहेत.
अंबरनाथ परिसरात विम्को, धरमसिंग या कंपन्या होत्या. केंद्र शासनाच्या अखत्यारीत लष्कराला लागणारी शस्त्रे निर्माण करणारी ऑर्डनन्स कंपनी या ठिकाणी आहे. यानंतर या भागात अंबरनाथ-बदलापूर एमआयडीसी निर्माण झाली. आता डोंबिवलीतील रासायनिक उद्योग हे अंबरनाथ येथे हलविण्यासंबंधीचे विचार व्यक्त करण्यात आले आहेत. पण हे रासायनिक उद्योग अंबरनाथ येथे नेऊन हा प्रश्न सुटणार आहे का? उलट यामुळे डोंबिवली प्रमाणेच अंबरनाथच्या नागरिकांचे जीवन धोक्यात येईल, आज डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कंपन्यांची संख्या प्रमाणबाहेर वाढली हे खरे आहे. मात्र, यातील किती कंपन्यांनी रितसर परवानगी व सुरक्षेचे निकष पाळले आहेत. हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने बेकायदा सुरू असलेल्या किती कंपन्यांवर कारवाई केली, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनीही या प्रश्नांकडे लक्ष्य वेधले आहे. मात्र, त्यांच्याकडून ठोस उपाय करण्याची अपेक्षा डोंबिवलीकरांनी व्यक्त केली आहे. भीषण स्फोटामुळे परिसरातील रहिवासी भागातील इमारतींच्या काचा फुटल्या. घरांना तडे गेले. त्यामुळे निवासी व औद्योगिक क्षेत्र इतक्या जवळ कसे उभारले गेले, हा प्रश्नही आहे.
डोंबिवली शहराचा पूर्व भाग, डोंबिवली परिसरातील ग्रामीण भागातील लोकसंख्या मागील ३० ते ४० वर्षात सतत वाढत गेली. त्यामुळे औद्योगिक भागात नवीन संकुले, बांधकामे निर्माण झाली. ती वाढत वाढत एमआयडीसी पर्यंत गेली आणि दोन्ही क्षेत्रे एकत्र झाली. यातील अवैध बांधकामांची चौकशी व्हायला हवी. ही बांधकामे होताना सुरक्षेचे निकष डावलले गेले होते का, याचीही माहिती घ्यायला हवी. या भीषण स्फोटाच्या चौकशीसाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त होणार आहे. या समितीने सर्वागाने या घटनेची चौकशी करावी व भविष्यात अशी घटना पुन्हा होणार नाही, या बाबत उपाय करण्याची गरज आहे.