अधिनियमाच्या अनुषंगाने राज्य शासनाने तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशात काही बदल केले आहेत. पारदर्शी पद्धतीने, गुणवत्तेच्या आधारे व केंद्रीभूत पद्धतीने करण्याबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्या थोडक्यात समजून घेऊ या.
मागील वर्षी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र कायदा क्र.२८- महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क याचे विनियमन) कायदा २०१५ पारित केला असून त्यानुसार प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी व त्यावरील देखरेखीसाठी आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांची नेमणूक केलेली आहे.
वरील अधिनियमाच्या अनुषंगाने राज्य शासनाने प्रवेश प्रक्रियेचे नियम तयार करून प्रसिद्ध करणे अपेक्षित होते व त्यानुसार तंत्रशिक्षण विभागाने सर्व प्रवेशासाठीचे पात्रता निकष व प्रवेश प्रक्रिया पद्धती याबाबत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे. प्रवेश प्रक्रियेचे नियम तयार करत असताना प्रवेश पारदर्शी पद्धतीने, गुणवत्तेच्या आधारे व केंद्रीभूत पद्धतीने करण्याबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
सर्व पदवी व पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. प्रवेश परीक्षा ही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा असेल किंवा राज्य शासनाने मान्यता दिलेली इतर कोणतीही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा असेल. (उदा. वास्तुशास्त्र पदवी प्रवेशासाठी नाटा ही प्रवेश परीक्षा असेल.
तथापि दहावी व बारावी नंतरचे पदविका अभ्यासक्रम, थेट द्वितीय वर्ष पदविका व पदवी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र अभ्यासक्रम आणि थेट द्वितीय वर्ष औषधनिर्माणशास्त्र पदवी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेमधून सूट देण्यात आलेली आहे. संस्था स्तरावरील प्रवेशाव्यतिरिक्त सर्व प्रवेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आयुक्त यांच्या देखरेखीखाली करण्यात येतील.
केंद्रीभूत प्रवेश व संस्था स्तरावरील प्रवेश हे फक्त केंद्रीभूत प्रवेशासाठी तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील गुणवत्ता क्रमांकाच्या आधारे करण्यात येतील. अनिवासी भारतीय विद्यार्थी, विदेशी विद्यार्थी, ओ.सी.आय. ई. यांची गुणवत्ता यादी ही सक्षम प्राधिकरणाद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल व ज्या संस्थांना अशा प्रकारचे प्रवेश करण्याची राज्य शासन व समुचित प्राधिकरणाची मान्यता असेल अशा संस्थेमध्ये प्रवेशासाठी आवेदनपत्र सादर करतील व सक्षम प्राधिकरणाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील गुणवत्ता क्रमानुसार त्यांचे प्रवेश संस्था स्तरावर करण्यात येतील. या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दोन प्रकारची केंद्र असतील.
सुविधा केंद्रात(ऑनलाईन) अर्ज भरणे, कागदपत्रांची तपासणी/छाननी करणे व तक्रारींचे निवारण करणे यासारख्या सेवा पुरवल्या जातील. प्रवेश उपस्थिती केंद्रात उमेदवार प्रवेशाबाबतची कागदपत्रं सादर करू शकतील.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्पे
सक्षम प्राधिकरणाद्वारे प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका प्रकाशित करणे, उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी आवेदनपत्र सदर करणे. उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी सादर केलेल्या माहितीची व आवश्यक कागदपत्रांची सुविधा केंद्रावर जाऊन पुष्टी करणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे कागदपत्रांची तपासणी केलेल्या उमेदवारांचीच नावे तात्पुरती गुणवत्ता यादीमध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. सक्षम प्राधिकरणाद्वारे तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, त्यावरील हरकती किंवा तक्रारीनुसार आवश्यक त्या दुरुस्त्यांसह अंतिम गुणवत्ता यादी, सर्व फेरीसाठी उपलब्ध जागांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे, उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने केंद्रीभूत प्रवेशासाठी विकल्प अर्ज सादर करणे, विकल्प अर्जामध्ये उतरत्या पसंतीक्रमाने पाहिजे असलेल्या अभ्यासक्रमांची यादी सदर करणे, पहिल्या, दुस-या व तिस-या फेरीतील जागांचे वाटप संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे, ही माहिती उमेदवारांना त्यांच्या लॉगइनमधूनसुद्धा उपलब्ध असेल.
फ्रीझ, स्लाईड किंवा फ्लोट म्हणजे काय?
प्रवेश स्वीकारतेवेळी उमेदवारास फ्रीझ, स्लाईड किंवा फ्लोट यापैकी एक पर्याय निवडणे आवश्यक आहे. फ्रीझचा अर्थ उमेदवारास वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घ्यायचा असून त्यापेक्षा चांगल्या पयार्याची तो अपेक्षा ठेवत नाही. अशा प्रकारातील विद्यार्थी दुस-या व तिस-या फेरीस पात्र असणार नाहीत.
स्लाईडचा अर्थ उमेदवारास वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घ्यायचा असून फक्त त्याच संस्थेमध्ये त्यापेक्षा चांगल्या विकल्पाची जागा मिळाल्यास तो घेणार आहे, असे विद्यार्थी दुस-या व तिस-या फेरीस पात्र असतील.
फ्लोटचा अर्थ उमेदवारास वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घ्यायचा असून त्यपेक्षा चांगल्या विकल्पाची जागा मिळाल्यास तो घेणार आहे, असे विद्यार्थी दुस-या व तिस-या फेरीस पात्र असतील. चौथ्या फेरीमध्ये उपलब्ध असलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
केंद्रीभूत प्रवेशाच्या सर्व फे-या झाल्यानंतर संस्था स्तरावर प्रवेश करण्यात येतील. या प्रक्रियेसाठी गुणवत्ता यादीतील सर्व उमेदवार पात्र असतील. याबाबत आवश्यक सूचना नियमांमध्ये दिलेल्या आहेत.
प्रक्रियेची वैशिष्टे : उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी आवेदनपत्र सदर करणे अनिवार्य असून सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या गुणवत्ता क्रमांकानुसारच सर्व प्रवेश, संस्थास्तरासहित करण्यात येतील. उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने सर्व प्रक्रिया करायच्या असल्याने प्रणालीद्वारे देण्यात आलेला संकेतांक व पासवर्ड काळजीपूर्वक सांभाळायचा आहे.
तसेच पासवर्ड कोणालाही सांगता कामा नये. तसेच अर्जात ईमेल व मोबाईल क्रमांक अचूक भरावा, जेणेकरून सक्षम प्राधिकारी यांचेकडून वेळोवेळी मिळणारे संदेश प्राप्त होतील. पहिल्या तीन फे-यांसाठी एकच विकल्प अर्ज घेण्यात येईल. त्यामुळे तीन वेळा वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ व श्रम कमी होतील.
याकरिता उमेदवाराने काळजीपूर्वक व अभ्यासपूर्वक सर्व विकल्प अर्ज भरावयाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत पासवर्ड दुस-या कोणालाही देऊ नये जेणेकरून त्याचा दुरुपयोग होणार नाही तसेच त्याची गुप्तपणे नोंद ठेवावी. उमेदवारास पहिल्या तीन फे-यांमध्ये एकही ठिकाणी प्रवेश नाही मिळाल्यास त्यास तो विकल्प अर्ज बदलण्याची संधी चौथ्या फेरीपूर्वी देण्यात येईल.
चुकीचे विकल्प भरणे, चुकीने फ्रीझ करणे किंवा विचार बदलाने यासाठी त्यास अर्ज बदलासाठी एक संधी असेल. चुकीचे किंवा कमी विकल्प भरल्यामुळे त्याचे वर्ष वाया जाणार नाही. राखीव जागा भरण्यासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या, दुस-या, तिस-या व चौथ्या फेरीमध्ये पात्र उमेदवारांना जागांचे वाटप करण्यात येईल.
शेवटच्या फेरीतील शेवटच्या टप्प्यापर्यंत राखीव जागा त्या संवगार्तील उमेदवारांना देण्याचा प्रयत्न केला जाईल व त्यानंतर त्या गटासाठीचा उमेदवार उपलब्ध नसल्यास त्या सर्वसाधारण गटातील उमेदवारांना देण्यात येतील.
प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रवेश रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. प्रवेश प्रवेश निश्चिती केंद्रावर प्रवेश रद्द करता येईल व त्याने भरलेली रक्कम सुद्धा तेथूनच प्रक्रिया शुल्क वजा करून तात्काळ परत करण्यात येईल. यामुळे प्रवेश रद्द करतेवेळी विद्यार्थ्यांना होणारा त्रास व वेळेचा होणारा अपव्यय टाळता येणार आहे.
उमेदवारांना पूर्ण फीभरणेबाबत संस्था दबाव आणत असल्याबाबतच्या तक्रारी येत असतात. ब-याच वेळा त्यांची कागदपत्रे परत दिली जात नाहीत व पयार्याने विद्यार्थ्यांचे इतर ठिकाणचे प्रवेश रद्द होण्याची शक्यता असते. हे सर्व प्रकार यामुळे टाळता येणार आहेत.
संस्था स्तरावरील प्रवेश करताना सुद्धा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता क्रमांक विचारात घेण्यात येणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कायद्यांतर्गत समावेश असलेल्या सर्व संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राजपत्रात अधिसूचित केल्याप्रमाणे सर्व उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी सादर केलेल्या माहितीची व आवश्यक कागदपत्रांची सुविधा केंद्रावर जाऊन पुष्टी करणे आवश्यक आहे.
या प्रक्रियेची नियमावली तयार करण्यात आलेली असून यामध्ये गुणवत्तेच्या आधारे पारदर्शी पद्धतीने व केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश करण्यात येणार आहेत. शासकीय, अनुदानित व विनानुदानित संस्थांचे प्रवेश आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांचेमार्फत एक खिडकी पद्धतीने केंद्रीभूत प्रवेश परीक्षेद्वारे करण्यात येतील.
अधिक माहितीसाठी वरील सर्व अधिसूचना तंत्र शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य उमेदवारी असलेल्या उमेदवारासाठी अभ्यासक्रम आणि त्यासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा किंवा इतर परीक्षा जी प्रवेश परीक्षा समजण्यात येईल.