नरवीर चिमाजी आप्पांच्या कुशल रणनेतृत्वाने व बाजी भीवराव रेटरेकर यांच्या अतुल पराक्रमाने पावन झालेल्या तारापूर किल्ल्यावर येत्या २४ जानेवारी २०१६ रोजी किल्ले वसई मोहीम परिवारातर्फे आगळावेगळा २७८वा तारापूर विजय दिन साजरा करण्यात येणार आहे. २००८ सालापासून किल्ले वसई मोहीम संस्था तारापूर किल्ल्याची अभ्यास सफर व इतिहास संकलन करीत आहे. सदर ऐतिहासिक घटनेस यंदा २७७ वर्षे ( १७३९ – २०१६) पूर्ण होत आहेत.
तारापूर किल्ल्याच्या संवर्धनाची गरज व गतकाळाच्या इतिहासाची साक्ष जपण्यासाठी यंदापासून सह्याद्री मित्र परिवार, माकुणसार या मोहिमेत सहभाग घेत आहे. सदर मोहिमेचा मुख्य उद्देश तारापूरचा खरा इतिहास कळावा व किल्ल्याच्या विजय दिन सोहळय़ातून ज्ञात-अज्ञात वीरांना मानवंदना देण्यात यावी हा आहे. सदर मोहिमेत किल्ल्यातील वास्तूचे पूजन, किल्ल्याच्या प्रवेशद्वारास तोरण इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. तारापूर किल्ल्याच्या इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी व दुर्गसंवर्धनाची गरज लक्षात घेण्यासाठी जंजिरे-तारापूर मार्गदर्शन सफर यावेळी करण्यात येईल. इतिहासाचे स्मरण करण्यासाठी आयोजित केलेली ही मोहीम विनाशुल्क आहे.
टीप : तारापूर किल्ल्यास भेट देण्यासाठी प्रथम डहाणू रेल्वे मार्गावरील बोईसर स्टेशन गाठावे. येथून तारापुरास जाण्यासाठी खासगी रिक्षा व बससेवा उपलब्ध आहेत. तारापूर किल्ल्यास जाण्यासाठी वाणगाव रेल्वे स्थानकाहूनसुद्धा बससेवा व रिक्षांची सोय आहे. तारापूर किल्ल्याबाहेर तारकेश्वर महादेवाचे पेशवेकालीन मंदिर आहे.