शेतकरी कर्जमाफीसाठी कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीला साकडे घालून विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेच्या तिस-या टप्प्याला कोल्हापूरातून प्रारंभ झाला.
मुंबई- शेतकरी कर्जमाफीसाठी कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीला साकडे घालून आणि लोकराजा राजर्षि शाहू महाराजांच्या जन्मस्थळावर त्यांना वंदन करून विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेच्या तिस-या टप्प्याला मंगळवारी कोल्हापूरातून प्रारंभ झाला.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.
शेतक-यांना कर्जमाफी मिळेपर्यंत या नादान, मुर्दाड सरकारच्या विरोधात लढण्याचे व शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचे सामर्थ्य आम्हाला दे, असे साकडे आई अंबाबाईला घातल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, वरिष्ठ काँग्रेस नेते रोहिदास पाटील, संघर्ष यात्रेचे समन्वयक आमदार सुनिल केदार यांच्यासह प्रमुख स्थानिक नेते व अनेक आमदार उपस्थित होते.
राज्यभरात तूर खरेदीबाबत सुरू असलेल्या अनागोंदी कारभारावर विखे-पाटील यांनी चांगलेच आसूड ओढले. यावेळी खासदार राजू शेट्टी व कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचाही चांगलाच समाचार घेण्यात आला. हे दोघे आता सरकारमध्ये सहभागी आहेत. तेव्हा जनतेला फसविण्याचा धंदा त्यांनी बंद करावा, अशी टीकाही त्याच्यावर करण्यात आली.
जनता जेवढ्या वेगाने डोक्यावर घेते, त्याच्या दुप्पट वेगाने जमिनीवर आपटते, हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ध्यानात ठेवावे, अशी इशारावजा सूचनाही विरोधी पक्षनेत्यांनी दिली.
शेतक-यांची व्यथा मांडण्याचा आणखी एक सनदशीर प्रयत्न म्हणून, येत्या महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी शेतकरी कर्जमाफी व हमीभावाच्या मागणीसाठी ग्रामसभेत ठराव करावा. आणि तो ठराव त्यांनी सरकारकडे पाठवावेत, असे आवाहन विरोधीपक्षांकडून संयुक्त संघर्ष यात्रेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
शेतक-यांकडील शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करण्याचा शब्द सरकारने दिला होता. परंतु, शेतक-यांकडे हजारो क्विंटल तूर पडून असताना खरेदी बंद करणे, हा शेतक-यांचा विश्वासघात आहे. तूर खरेदी बंद करणे म्हणजे व्यापा-यांना शेतक-यांच्या लुटीसाठी खुला परवाना देण्यासारखेच असल्याची तोफ विरोधी पक्षनेत्यांनी डागली.