येणा-या ९ ऑक्टोबरला दै. ‘प्रहार’ आठव्या वर्षात पाऊल ठेवत असताना ठाणे-रायगड आवृत्तीचा दै. ‘प्रहार’ आज तिस-या वर्षात पाऊल ठेवीत आहे. ठाणे शहर फार झपाटयाने वाढत आहे.
येणा-या ९ ऑक्टोबरला दै. ‘प्रहार’ आठव्या वर्षात पाऊल ठेवत असताना ठाणे-रायगड आवृत्तीचा दै. ‘प्रहार’ आज तिस-या वर्षात पाऊल ठेवीत आहे. ठाणे शहर फार झपाटयाने वाढत आहे. ठाणे जिल्ह्याचे आता दोन जिल्हे झाले. नवीन पालघर जिल्हा अस्तित्वात आला. रायगड जिल्हाही आता मुंबईच्या हातावर आलेला आहे. उद्या पनवेल महानगरपालिका होऊ शकते.
पनवेल आणि नवी मुंबई एकजीव होत आले आहेत. महाराष्ट्रातल्या उद्योगातल्या एकूण गुंतवणुकीत सर्वात मोठी गुंतवणूक रायगड जिल्ह्यात झालेली आहे. आरसीएफ, भारत पेट्रोलियम, जिंदाल यांचा मोठा प्रकल्प असे मोठमोठे उद्योग आज रायगडमध्ये आहेत. त्यामुळे ठाणे, पालघर आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांना एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालेले आहे आणि त्या तिन्ही जिल्ह्यांचे महत्त्व मुंबई इतकेच आता अग्रगण्य आहे.
ठाणे शहर आज तिनशे पटीने वाढले. उद्योग वाढले, राहनीमान वाढले. बाजारपेठा बदलून गेल्या. हा सगळा गेल्या पन्नास वर्षातला सकारात्मक बदल, नगरांचे महानगरात रुपांतर करीत आहे. ठाणे-पालघर मिळून जिल्ह्यात नऊ महानगरपालिका आहेत.
देशात असा कोणताही जिल्हा नसेल. त्यामुळे बदलते ठाणे, नवीन पालघर जिल्हा, झपाटयाने विकसित होणारा रायगड या तिन्ही जिल्ह्यांचे प्रश्न हिरीरिने मांडण्यासाठी वृत्तपत्रांवरही जबाबदारी येते. त्यातूनच दै. ‘प्रहार’ने ठाणे-रायगड आवृत्तीचे आयोजन केले आणि दोन वर्षापूर्वी १ ऑगस्ट रोजी या आवृत्तीचा शुभारंभ झाला. त्या आवृत्तीचा हा दुसरा वर्धापन दिन.
आता ठाणे-रायगड प्रहारची आवृत्ती तिस-या वर्षात पाऊल ठेवीत आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या जिल्ह्यातील सन्माननीय व्यक्तींचा प्रातिनिधीक गौरव करून त्यांच्यापुरती कृतज्ञता व्यक्त करणे याबद्दल ‘प्रहार’ला मनस्वी आनंद आहे.
ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील वाचकांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी बांधिलकी कायम ठेवून पुढच्या वाटचालीत ‘प्रहार’ आपली जबाबदारी चोखपणे पार पडेल, जनतेचे प्रश्न लावून धरेल आणि सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी दै. ‘प्रहार’ अन्यायावर प्रहार करतच राहिल, अशी हमी ‘प्रहार’ परिवारातर्फे यानिमित्ताने देतो. आमच्या तमाम वाचकांना अभिवादन करून तिस-या वर्षाची वाटचाल करण्यासाठी त्याच वाचकांकडे बळ मागतो..