शेतक-यांकडून युरियाचा अवाजवी वापर कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलपाठोपाठ आता युरियाच्या किंमती नियंत्रणमुक्त करण्याचे ठरवले आहे.
मुंबई- पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नियंत्रणमुक्त केल्यानंतर आता केंद्र सरकारकडून युरिया खताच्या किंमतीदेखील नियंत्रणमुक्त करण्याची शक्यता आहे. शेतक-यांकडून युरिया खताचा अवाजवी केला जाणार वापर कमी केला जावा, यासाठी केंद्र सरकारने युरियाच्या किंमती नियंत्रणमुक्त करण्याचे ठरवले आहे.
तीन वर्षात टप्प्याटप्याने सरकारने युरिया नियंत्रणमुक्त करण्याचे संकेत दिले आहेत. येत्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली हे युरिया नियंत्रणमुक्त करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे समजते. यामुळे येत्या तीन वर्षांत युरियाच्या किंमतीत २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या युरियाची सबसिडी ही कंपन्यांना दिली जाते. त्याऐवजी ती आता थेट ग्राहकांना दिली जाणार आहे. त्यामुळे युरियाचे दर महागले तरी त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळेल असे सरकारमधील काहींचे मत आहे.
तर दुसरीकडे, खतांचे दर वाढल्याने महागाई आणि दुष्काळाने गांजलेले गरीब शेतकरी खतासाठी पैशांची तजविज कशी करणार, असा प्रश्न काही शेती तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सध्या युरियाचे ५० किलोचे पोते २६८ रुपयांपर्यंत मिळते. मात्र शेतक-यांकडून युरियाचा अवाजवी वापर कमी केला जावा यासाठी सरकारने युरिया नियंत्रणमुक्त करण्याचा जाणिवपूर्वक हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.
सध्या युरियाचे दर हे पाच हजार ३६० रुपये प्रतिटन आहेत. मात्र सरकारी नियंत्रण काढण्यापूर्वी सरकार युरियाची किंमत नऊ हजार ५०० रुपये प्रति टन करू इच्छित आहे. यामुळे ५० किलोची पिशवीची किंमत ४७५ रुपये होईल.