भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुस-या आणि अंतिम कसोटीला गुरुवारपासून वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होत आहे.
मुंबई- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुस-या आणि अंतिम कसोटीला गुरुवारपासून (१४ नोव्हेंबर) वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होत आहे. कोलकाता जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेणा-या यजमानांनी सातत्य राखताना निर्भेळ विजयाचे लक्ष्य ठेवले आहे.
ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी रंगतदार होईल, असे वाटले. मात्र पाहुण्यांनी दुस-या डावात निराशा केली आणि अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजे केवळ तीन दिवसांत तसेच डावाने भारत जिंकला. मधल्या फळीतील रोहित शर्मा आणि मध्यमगती मोहम्मद शामीचे धडाकेबाज पदार्पण तसेच ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू खेळी हे यजमानांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. विजयी सलामीनंतर ढोणी आणि सहका-यांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. मात्र सातत्य राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
रोहित सनसनाटी पदार्पणानंतर रूपाने मधली फळी अधिक मजबूत झालीय. तसेच अश्विनचा फॉर्म पाहता फलंदाजीतील ‘डेप्थ’ही वाढली आहे. मात्र पहिल्या कसोटीत न चमकलेला शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली तसेच शेवटची कसोटी खेळणा-या विक्रमवीर सचिन तेंडुलकरला फलंदाजीत योगदान देण्याची आवश्यकता आहे. शामीने आश्वासक सुरुवात केल्याने तसेच अश्विनला फॉर्म गवसल्याने कर्णधार महेंद्रसिंग ढोणीची चिंता थोडी कमी झाली असेल. मात्र या दुकलीसह मध्यमगती भुवनेश्वर कुमार, उमेश यादव तसेच डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझाकडून मुंबईतही अचूक मारा अपेक्षित आहे. अपेक्षित सुरुवातीमुळे भारतीय संघात बदल अपेक्षित नाही.
मालिकेत पिछाडीवर पडल्याने डॅरेन सॅमी आणि कंपनी दडपणाखाली आहे. मात्र दडपण झुगारून खेळण्यात त्यांना यश आल्यास मालिका बरोबरी साधण्याची संधी आहे. अपयशी सुरुवातीनंतरही फिरकीपटू शेन फिलिंगफर्डचा प्रभावी मारा आणि शिवनारायण चंदरपॉलची एकाकी लढत पाहुण्यांसाठी जमेची बाजू ठरली आहे. मात्र ख्रिस गेल, डॅरेन ब्राव्हो, मार्लन सॅम्युअल्स, कीरान पॉवेल आणि कर्क एडवर्ड्सला अधिकाधिक योगदान देण्याची गरज आहे.
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना पोषक नाही
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीला पोषक ठरणार नाही, असा अंदाज क्युरेटर सुधीर नाईक यांनी वर्तवला आहे. या कसोटीसाठी ‘स्पोर्टिग’ खेळपट्टी बनवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. फलंदाजांसाठी ही खेळपट्टी नेहमीच एक आव्हान ठरली आहे. २००० नंतर खेळल्या गेलेल्या सात कसोटींपैकी भारताने दोन जिंकल्यात तर चार गमावल्यात. त्यात इंग्लंडविरुद्धच्या (२००६, २०१२) दोन पराभवांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेली शेवटची कसोटी (नोव्हेंबर २०११) अनिर्णित राहिली होती.