प्राचीन काळापासून भारतीयांना असलेली थुंकण्याची सवय अजूनही कायम आहे. यासाठी कितीही कायदे केले आणि दंड आकारला तरीही त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही.
प्राचीन काळापासून भारतीयांना असलेली थुंकण्याची सवय अजूनही कायम आहे. यासाठी कितीही कायदे केले आणि दंड आकारला तरीही त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. परंतु, यामुळे क्षयरोग होण्याचा वाढलेला धोका, ही आणखी चिंतेची बाब आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याच्या प्रमाणात बरीच घट झाली असली तरी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय जाता जात नाही.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा सामाजिक गुन्हा घोषित करण्याची वेळ आता येऊन ठेपली असून, सामान्य नागरिक, चालक आणि पान, खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकून कळत नकळत क्षयरोगाला निमंत्रण देणा-यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचीदेखील नितांत गरज आहे.
थुंकण्यातून मोठय़ा प्रमाणात पसरणा-या या रोगाला प्रतिकार करायचा तर थुंकण्यावर बंदी हवीच, अशी परखड प्रतिक्रिया मुंब्रा येथील कालसेकर हॉस्पिटलचे चेस्ट फिजिशियन (क्षयरोग तज्ज्ञ) डॉ. संदीप मिस्त्री यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय क्षेत्रात क्षयरोग (टी.बी.) नियंत्रणात राहावा, यासाठी सतत संशोधन सुरू आहे. असं असलं तरी क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यात डॉक्टरांना अद्याप यश आलं नाही. त्यामुळे भारतात प्रत्येक मिनिटाला दोन जणांना क्षयरोगाची लागण होते आणि दर दीड मिनिटाला एका रुग्णाचा बळी जात असल्याचं समोर आलं आहे.
२४ मार्च १८८२ रोजी डॉ. रॉबर्ट कॉक यांनी टी.बी.च्या जंतूंचा शोध लावला. तेव्हापासून २४ मार्च हा दिवस जागतिक टी.बी. दिन म्हणून पाळण्यात येतो.
क्षयरोगाची जास्तीत जास्त नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी या दिवशी विशेष प्रयत्न केले जातात. भारतात प्रत्येक मिनिटाला दोन व्यक्ती क्षयरोगाने बाधित होतात, तर दरवर्षी सुमारे चार लाख रुग्ण क्षयरोगामुळे मृत्युमुखी पडत आहेत.
जागतिक आरोग्य संस्थेच्या अंदाजानुसार सन २०२० मध्ये जगातील अंदाजे एक अब्ज नागरिक क्षयरोगाने त्रस्त असतील. याविषयी अधिक माहिती देताना वाशी येथील स्टर्लिग वोक्हार्ट हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे फिजिशियन डॉ. अक्षय छल्लाणी सांगतात, ‘जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल हेही सांगतो की, प्रत्येक वर्षी भारतात जवळपास तीस लाख लोकांना क्षयरोगाची लागण होते, त्यांची आरोग्य व्यवस्थेमध्ये नोंदच होत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे एक तर रोगाचं निदान होणं किंवा रोगाचं निदान होऊनही नोंद न करणे.
सरकारी आकडय़ांनुसार भारतात दरवर्षी क्षयरोगाच्या १९ लाख नवीन केसेस नोंदवल्या जातात. संपूर्ण जगात भारतामध्ये क्षयरोगाची सर्वात जास्त रुग्णसंख्या आढळते.
बसमधून प्रवास करताना, दुचाकीवरून जाताना मागेपुढे न पाहता किंवा सिग्नलवर गाडीचे दार उघडून पिचका-या मारणारे महाभागही आपण बरेच बघितले असतील. हा फक्त किळसवाण्या प्रकारापुरता विषय नसून, क्षयरोग होण्याचे (टीबी) हेच एक मुख्य कारण असल्याचे नुकतेच एका संशोधनामार्फत समोर आलं आहे.’
मुंब्रा येथील कालसेकर हॉस्पिटलचे चेस्ट फिजिशियन( क्षयरोग तज्ज्ञ) डॉ. संदीप मिस्त्री यांच्या मते, ज्या व्यक्तीला क्षयरोग (टी.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षयजंतूंचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.
एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवडय़ांपेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे अशी लक्षणे आढळल्यास शारीरिक तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
केस आणि नखं वगळता शरीरातील कोणत्याही भागात क्षयरोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. क्षयांच्या चारपैकी तीन रुग्णांना फुप्फुसाचा क्षयरोग असतो. तर उरलेल्यांमध्ये फुप्फुसांचं आवरण, मज्जासंस्था, लसिकाग्रंथी, जननसंस्था, उत्सर्जन संस्था, अस्थिसंस्था इत्यादी ठिकाणी प्रादुर्भाव होतो. नवीन क्षयरोग्यांनी सुरुवातीचे सहा महिने डॉक्टर्सची औषधे व्यवस्थित घेऊन तपासणी दिलेल्या वेळेत केल्यास हा आजार १०० टक्के पूर्ण बरा होतो.