दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील, चिली आणि पेरू हे तीन देश. मात्र ब्राझील आणि चिली हे दोन देश परंपरा आणि संस्कृती जपताना दिसतात तर पेरूत युरोपियन भोजन शिष्टाचाराचा प्रभाव अधिक असल्याचं दिसतं.
दक्षिण गोलार्धातील दक्षिण अमेरिका हा खंड असून त्यात ब्राझील, चिली आणि पेरू हे देश येतात. एकाच खंडातील या देशांची वेगवेगळी वैशिष्टय़े आहेत. प्रत्येकाच्या परंपरा, संस्कृती विविध आहेत. असं असलं तरीही या प्रत्येकाचे भोजन शिष्टाचार विभिन्न आहेत. पेरू हा देश बहुतांश युरोपियन पद्धतीचा स्वीकार करताना दिसतो. तर ब्राझील आणि चिली हे दोन देश आपल्याच परंपरांना महत्त्व देताना दिसतात.
ब्राझील
ब्राझीलमध्ये यजमान पाहुण्यांना स्वत:च्या हाताने जेवण घेण्याचा आग्रह करतात. आपल्या ताटात गरजेपेक्षा अधिक वाढून घ्यायचं नाही. तरच आपण ताटातलं सगळं जेवण संपवतो. असा समज आहे. ताटात अन्न टाकून देणं इथे चुकीचं समजलं जातं. प्रत्येक वेळी टेबलाजवळ जाताना हात धुऊनच गेलं पाहिजे. काहीही पेय प्यायल्यावर आपलं तोंड पुसून घ्यावं. कोणत्याही पेयाची बाटली तोंडाला लावून पिणं उचित समजलं जात नाही. जेवताना सुरी आणि काटय़ाचा प्रयोग नेहमी केला जातो. अगदी पिझ्झा खायचा असेल तरीही सुरी-काटय़ाचा उपयोग केला जातो.
चिली
- परिवाराचे प्रमुख मुख्य म्हणजे पिता किंवा प्रमुख पाहुणे यांना टेबलाच्या मध्यभागी बसवलं जातं.
- आपला रुमाल मांडीवर ठेवावा, जेणेकरून आपलं तोंड पुसायला मदत होईल. मात्र त्याला कधीही आपलं नाक पुसू नये.
- जेवण वाढताना डाव्या बाजूने सुरुवात करणं आवश्यक असतं.
- पाहुण्यांना प्रथम जेवण वाढणं उत्तम संस्कारांचं लक्षण समजलं जातं.
- जोपर्यंत पाहुणे जेवायला सुरुवात करत नाहीत, तोपर्यंत आपण जेवायला सुरुवात करायची नाही. ज्या ठिकानी बहुतेक लोक एकत्र जेवायला बसतात तेव्हा सगळ्यांच्या ताटात वाढल्यावरच जेवायला सुरुवात करणं योग्य शिष्टाचार समजला जातो.
- जेवण वाढून घेण्यासाठी आपल्या हाताचा कधीच वापर करू नये. केवळ चपाती, रोटी किंवा पराठा खाण्यासाठी बोटांचा वापर करू शकतात. मात्र तुम्हाला चिकन, पिझ्झा किंवा अन्य काही पदार्थ खायचे असतात तेव्हा बोटांच्या साहाय्याने अनौपचारीकता दाखवू शकतात.
- आपल्या सुरीचा उपयोग कापण्यापेक्षा लोणी किंवा बटर लावण्यासाठी करावा.
- टेबलापाशी बसून जेवताना हाताचे कोपरे कधीही टेबलावर ठेवू नयेत.
- तुम्ही तुमच्यासाठी कोणतंही पेय घेत असाल तर स्वत:ला घेण्याआधी आपल्या आजूबाजूच्यांना सव्र्ह करावं.
- जेवणाच्या टेबलापाशी फोनवर बोलणं अशिष्ट समजलं जातं. तसंच महत्त्वाचा फोन असेल तर आजूबाजूच्यांची माफी मागून फोनवर बोलायला उठून बाजूला जावं.
- एकदा टेबलापाशी बसल्यावर कोणत्याही कारणासाठी बाजूला जायचं असेल तर नेहमी माफी मागूनच बाजूला जावं.
- कधीही कोणाच्याही ताटावर वाकू नये. तुम्हाला कोणतीही लांबची वस्तू हवी असेल तर त्या वस्तूच्या सगळ्यात जवळ बसलेल्या व्यक्तीला ती वस्तू देण्यास सांगावी. तसंच तुम्हाला कोणती वस्तू द्यायची वेळ आली तर तुमच्या जवळ असलेलीच वस्तू पास करा. शक्य असल्यास ज्या व्यक्तीने मागितली आहे तिच्याकडेच परत द्यावी.
- आपल्या शेजारच्याच्या ताटातलं कधीही घेऊ नये किंवा तसं करायलाही सांगू नये.
- चावून खाताना नेहमी आपलं तोंड बंद ठेवावं. आणि तोंडातला घास संपल्यानंतर बोलण्यासाठी तोंड उघडावं. तोंडात घास कोंबून भरणं किंवा घास असताना बोलणं योग्य समजलं जात नाही. मात्र तसं करणं अतिशय आवश्यक असेल तर मात्र तोंडासमोर हात धरावा. म्हणजे तोंडातून पदार्थ बाहेर येणार नाही. तसंच लहान लहान वाक्यच बोलावीत.
- जेवताना कधीही भुरके मारू नये तसंच जोरजोरात खाऊ नये.
- आपल्या दातात अडकलेले अन्न कण नखांच्या किंवा सुरी-काटय़ाच्या साहाय्याने काढू नये.
- ताटात वाढलेलं संपूर्ण जेवण जेवावं. तसंच टाकून दिल्यास अन्नाची नासाडी केल्याचं समजलं जातं.
- कधीही तोंडात सुरीच्या साहाय्याने पदार्थ घालू नये.
- जोपर्यंत आग्रह केला जात नाही तोपर्यंत खाणं घेणं उचित समजलं जात नाही.
- आवश्यकता नसेल तर खाण्यासंदर्भात कधीही कोणतीही नकारात्मक टिप्पणी करू नये किंवा अन्नाला नावं ठेवू नये.
- टेबलापाशी बसले असताना ढेकर, खोकला, उचकी किंवा शिंक येणार नाही याची काळजी घ्यावी. मात्र या गोष्टी आपल्या हातात नसतात. तसं काही झालंच तर लगेच माफी मागावी.
- तुम्ही बाऊल किंवा मोठय़ा सूप प्लेटमधील सूप संपवलं असेल तर खालच्या प्लेटमध्ये चमचे ठेवून द्यावेत.
- सुरी उपलब्ध नसेल तर काटय़ाच्या साहाय्याने पदार्थाचे तुकडे करणं आवश्यक आहे.
- गरजेपेक्षा अधिक मोठा घास तोंडात कोंबू नये.
- टेबलाजवळ आचारी असेल तर आचा-याचं कौतुक करणं म्हणजे योग्य समजलं जातं. मात्र तो उपस्थित नसेल तर मात्र त्याची स्तुती केली नाही तरीही चालते.
पेरू
या राज्यात अधिक प्रमाणात युरोपीय शिष्टाचारांचं पालन केलं जातं. असं असलं तरीही तिथल्या काही परंपरा आणि समारंभाच्या बाबतीत कित्येक गोंधळ आहेत.
- माशाचे तुकडे खाल्ल्यानंतर उरलेले अवशेष एका ग्लासात लिंबाचा रस घालून त्यात टाकून ठेवले तरीही चालतात. ही प्रथा असून त्याला वाघाचं दूध पिणं असं समजलं जातं.
- जेवणानंतर कधी ही आळस देऊ नये.