शालेय परीक्षांत दहावीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दहावीचा निकाल लागल्यावर अनेक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रश्न पडला असेल की आता पुढे काय? अशा विद्यार्थ्यांसाठी खालील काही पर्याय..
बहुपर्यायी वाणिज्य शाखा :
वाणिज्य शाखा ही बहुपर्यायी मानली जाते. एक तर कॉमर्सची पदवी घेत असतानाच, सी.ए. बेसिक प्रोग्रॅम कोर्स करता येतात, कंपनी सेक्रेटरी, टॅक्स कन्सल्टंट, विधी शाखा, बँक परीक्षा, फायनान्स विभाग, आदी अनेक पर्याय या विभागात उपलब्ध आहेत. कॉमर्स पदवीनंतर विद्यार्थ्यांना एमबीए आणि संगणक विभागाकडेही वळता येते. सध्या एमबीएमध्ये एचआर, फायनान्स आणि मार्केटिंगकरिता उत्तम वातावरण आहे.
सायन्स शाखेतील आधुनिक संधी
सायन्स शाखेची निवड आजही पारंपरिक मेडिकलकरिताच केली जाते. यातही एमबीबीएस हा महत्त्वाचा भाग असतो. १२वी सायन्सनंतर मेडिकलमधल्याच अनेक फॅकल्टी विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात, त्यापैकी डीएमएलटी, एमएलटी, एक्सरे टेक्निशियन, फार्मसी, रिसर्च आदी शाखांकडे विद्यार्थ्यांना जाता येते. याशिवाय बीएस्सी केल्यानंतर कृषी पदवीकडे वळता येतेच, शिवाय जीवशास्त्रातील आधुनिक वाटा आपल्याशा करता येतात. १२वी सायन्सनंतर विद्यार्थी विधी शाखेसह संगणक शाखेकडेही वळू शकतो. संगणक पदवी शिक्षणात सध्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
कला शाखेतील सुवर्णसंधी :
कला शाखेतून भारतीय संगीत, गायन, वादन, अभिनय, साहित्य, विद्या, भाषा, या पारंपरिक क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध आहेत. १२वीनंतर स्पेशलायझेशन करता येते. या सर्व अभ्यासक्रमांना भारतासह इतर देशांतही मागणी आहे. याशिवाय १२वीनंतर विद्यार्थी विधी शाखेकडे वळू शकतो. विधी अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना अनेक पर्याय नोकरीच्या व करिअरच्या, मास्टरकीच्या, सरकारी तसेच खासगी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. १२वी कलेची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना डी.टी.एड, बी.एड, बीपीएड आदी पर्यायही खुले आहेत. शिवाय कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी एम.ए, एमफील, डॉक्टरकी आदींच्या माध्यमातून प्राध्यापक होऊ शकतात. याशिवाय आर्ट्स स्कूलच्या माध्यमातून करिअर करीत आपल्यातील हस्तकौशल्याला वाव देण्याचाही एक पर्याय या विद्यार्थ्यांसमोर आहेच.
काही धोके :
दहावीनंतर डॉक्टर वा इंजिनीयर होण्याची स्वप्ने पाहणारे विद्यार्थी शक्यतो सायन्सला अॅडमिशन घेतात. पण ११, १२ वीच्या वर्गात सायन्सचे विषय अनुक्रमे, भौतिक, रसायनशास्त्र, गणित या ग्रुपमध्ये त्यांची गुणोत्तर टक्केवारी काहीशी खालावते, तसेच सीईटी अन् नीट परीक्षेतही गुणांकन खालावते, साहजिकच १२ वीच्या मार्कावर परिणाम होतो अन् अपेक्षित ट्रॅकला प्रवेश मिळत नाही, अशा वेळी मग मुले १० वीच्या मार्कावर डिप्लोमाला प्रवेश अर्ज भरतात, या सर्वामध्ये दोन वर्षे वाया जातात, काही वेळा विद्यार्थी ठरलेला ट्रॅक सोडून कॉमर्स वा कला शाखेकडे वळतात, मात्र मुळातच ही त्यांची आवड नसल्याने ते या शिक्षणात रमू शकत नाहीत, त्यामुळे या निर्णयाचा फटका आयुष्यातल्या गंभीर घटनांत बदलणारा ठरतो. त्यामुळे एक तर आपल्याला काय अन् कितपत झेपेल याचा विचार करूनच विद्यार्थी आणि पालकांनी साईट निवडावी. समजा अपयश वा कमी मार्क्स पडले तर कोणता पर्याय निवडायचा ते आधीच ठरवावे, म्हणजे नैराश्य येणार नाही.
अॅनिमेशन
तुमच्याकडे कल्पकता असेल, तसेच तुम्हाला चित्रकलेबाबत आवड आणि जाण असेल तर तुम्ही या करिअरचा विचार करू शकता. कारण स्मार्टफोनचा वाढता वापर, इंटरनेटवरील असंख्य गोष्टी, जाहिरात क्षेत्र, चित्रपट तसेच मालिका यांमध्ये असलेली वाढती स्पर्धा यामुळे अॅनिमेशन क्षेत्राला मागच्या काही वर्षात चांगलेच महत्त्व मिळाले आहे.
बेस्ट करिअर ऑप्शन
अशी अनेक प्रोफेशन आहेत यात तुम्ही अगदी उत्तम करिअर करू शकता. विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीनच मुख्य शाखांव्यतिरिक्तइतरही करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. यात तुम्ही आनंदाने काम करू शकता आणि भरपूर पैसेही कमावू शकता.
मास कम्युनिकेशन :
नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा तुमचा स्वभाव असेल आणि संवाद कौशल्य असेल तर हे शिक्षण नक्कीच तुम्हाला दिशा देणारे ठरूशकते. कारण पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन सध्या या क्षेत्राचा मोठय़ा प्रमाणात विस्तार झाला आहे. कंटेंट रायटर, सोशल मीडिया हँडलर, पब्लिक रिलेशन ऑफिसर अशा अनेक संधी हे शिक्षण घेतल्यानंतर उपलब्ध होऊ शकतात.
आता निकालाचे टेन्शन खल्लास
नुकताच दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. अपेक्षित निकाल नाही लागला तर विद्यार्थामध्ये नैराश्याचं वातावरण तयार होतं. काही पालक निकालाबद्दल खूपच टोकाची भूमिका घेतात. पालकांच्या वर्तणुकीला घाबरून मुलं अनेकदा चुकीचं पाऊल उचलतात. विद्यार्थानी अशी पावलं न उचलता स्वत: सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थाच्या मनामध्ये आशादायी दृष्टिकोन तयार होईल.
विद्यार्थानी कोणती काळजी घ्यावी :
>> अपयश आलं तर ते पचवण्याचं धैर्य ठेवा, भूतकाळामध्ये तुम्ही ज्या चुका केल्या आहेत त्यामधून बोध घ्या.
>> तुमचं ध्येय गाठण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा, तुम्हाला आलेलं अपयश तुमच्यावर वरचढ होऊ देऊ नका.
>> स्वत:मधील सहनशीलता वाढवा.
>> परीक्षेमध्ये आलेलं अपयश हे क्षणिक आहे. स्वत:मधील सकारात्मक दृष्टिकोन वाढवा.
>> तुमच्यामध्ये नकारात्मकता वाढली असेल तर पालक किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
>> खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका.
पालकांनी कोणती काळजी घ्यावी :
>> निकालाच्या कालावधीत मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
>> परीक्षेमध्ये मिळणारे गुण हे मुलाचं आयुष्य ठरवत नाहीत हे लक्षात घ्या.
>> एखादं क्षेत्र निवडण्याआधी मुलाचा कल कोणत्या क्षेत्रामध्ये आहे याची माहिती करून घ्या.
>> पाल्य परीक्षेत नापास झाला असेल तरी त्याला धीर देऊन एक आशादायक दृष्टिकोन त्याच्या समोर उभा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
>> आयुष्यामध्ये येणा-या खाचखळग्यांना हिमतीने सामोरं जाण्याची प्रेरणा मुलांना देणं गरजेचं आहे.
>> निकालाच्या कालावधीत विद्यार्थाची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं असतं.
>> प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे, जर तुमचा मुलगा एखाद्या विषयामध्ये हुशार नसेल तर दुस-या विषयात तो नक्कीच पारंगत असू शकतो.