मी त्याचा विचार करत तिथे उभा होतो. मला आश्चर्य वाटत होतं ते त्याच्या पाच रुपये असे सोडून देण्याचं नव्हे, तर त्याच्या वृत्तीचं. पाच रुपये किंवा पाच लाख रुपये, हे महत्त्वाचं नसतं, पण महत्त्वाची असते ती दानत.
त्या दिवशी ऑफिसला उशीर होणार, अशी कल्पना होतीच. संध्याकाळचे सात वाजून गेले तरी काम चालू होतं. एरवी मिळणारी लिफ्ट आज मिळणार नव्हती, त्यामुळे कसं जायचं, याचे आडाखे मनात बांधले होते. कामाच्या व्यापात १० कसे वाजले कळलंच नाही. ट्रेनने सगळ्यात पटकन प्रवास होईल, असं म्हणून कांजूरमार्ग स्टेशनवर पोहोचलो.
रात्रीचे सव्वादहा वाजले होते. सीएसटीच्या बाजूकडील सर्व तिकीट खिडक्या बंद होत्या. एटीव्हीएम व कुपन मशिन्स चालू होती, पण नेहमीचा ट्रेन प्रवास नसल्याने माझ्याकडे स्मार्टकार्ड किंवा कुपन यापैकी काही नव्हतं त्यामुळे पंचाईत होती. मी त्या बंद खिडकीच्या किलकिल्या फटीतून आतल्या माणसाला विचारलं, ‘‘तिकीट कसं काढणार साहेब?’’ ‘‘त्या बाजूला जा,’’ असं उत्तर मिळालं. आता पूर्ण फलाट पार करायचा होता. तसाच रेल्वे, शासन यांच्या नावाने मनातल्या मनात स्तुतिसुमनं उधळत फलाट पार करून पलीकडच्या म्हणजेच कल्याणच्या दिशेच्या तिकीट घरापर्यंत पोहोचलो.
तिथेही तीच गत होती. सगळ्या खिडक्या बंद. मशिन्स चालू पण त्यांचा मला उपयोग नाही. तिथे अक्षरश: शुकशुकाट होता. आता काय करायचं, असा विचार करत असताना एक साधारण तिशीचा मुलगा तिथे आला. त्याच्याकडे स्मार्टकार्ड होता. तो आपलं तिकीट काढायला एटीव्हीएम मशिनजवळ गेला असता मी माझ्या हातातली दहाची नोट पुढे करत विचारलं, ‘‘भाऊ एक ठाणा सिंगल काढून देणार का?’’ ‘‘देतो ना,’’ तो म्हणाला. त्याचं तिकीट काढून झाल्यावर त्याने एक ठाणा सिंगल काढून माझ्या हातात ठेवलं. मी ती दहाची नोट त्याला देऊ केली. आपल्याकडे सुट्टे नाहीत हे बघून तो म्हणाला, ‘‘राहू दे.’’ मी माझंही पाकीट पुन्हा पुन्हा बघितलं, पण सुट्टे माझ्याकडेही नव्हते. मी म्हणालो, ह्लमाझ्याकडेही नाहीयेत यार, पण तू घे ना.. असं नको.’’ ‘‘नाही रे, राहू दे’’ तो पुन्हा म्हणाला. ‘‘अरे असं नको करूस, माझ्याकडे सुट्टे नाहीत, पण तू दहा ठेव. मला आत्ता गरज होती कारण इथे एकही तिकीट खिडकी चालू नाहीय आणि माझ्याकडे कार्ड किंवा कुपन नाही,’’ मी सांगितलं. तरीही त्याने पैसे घ्यायला नकारच दिला. मी फलाटापर्यंत त्याच्याबरोबर चालत होतो, त्याला पैसे देऊ करत होतो, पण त्याने घेतले नाहीत. शेवटी ‘‘पाच रुपयांसाठी काय एवढं रे!’’ असं हसत म्हणाला. मीही मग नाईलाजाने थँक्स म्हटलं आणि समोर आलेल्या ट्रेनमधे तो चढला.
मी त्याचा विचार करत तिथे उभा होतो. मला आश्चर्य वाटत होतं ते त्याच्या पाच रुपये असे सोडून देण्याचं नव्हे, तर त्याच्या वृत्तीचं. पाच रुपये किंवा पाच लाख रुपये, हे महत्त्वाचं नसतं, पण महत्त्वाची असते ती दानत. देण्याची वृत्ती. असं बघायला गेलं तर तो मुलगा फार श्रीमंत घरातला वाटत नव्हता, अगदी साधारण दिसणारा असा तो मुलगा होता. त्यामुळे त्याच्याकडे खूप पैसे असून, म्हणूनत्याला पाच रुपयांचं फारसं महत्त्व नाही, अशातला भाग नव्हता.
त्या मुलाचा विचार करत असताना मला आसपासची श्रीमंत माणसं आठवत होती, जी प्रत्येक छोटय़ा छोटय़ा गोष्टीत आपल्या मूलभूत कंजूषपणाचं दर्शन जगाला घडवत असतात. ती माणसं जी लाखावारी पैसे कमावूनही, खर्च करणं तर सोडा, पण अडलेल्या कुणाला मदत करायलाही कचरतात. अशांचा विचार करत असतानाच मला या मुलाचं, त्याच्या दानतीचं खूप कौतुक वाटत होतं. कशावर तरी विश्वास बसत नव्हता; आणि कशावरचा तरी विश्वास दृढ होत होता.
दुस-या दिवशी ट्रेनचा प्रवास करायचा नव्हता, पण तरीही सकाळी आदल्या दिवशीचं ते तिकीट पाकिटात दिसलं. घरातून बाहेर पडल्यावर जवळच्याच देवळात गेलो. तीच दहा रुपयांची नोट देवासमोर ठेवली आणि म्हटलं, ‘‘त्या मुलाचं भलं कर रे बाबा..’’