सध्या ‘दामदुप्पट’चा ‘काळा’बाजार तेजीत आहे. गेल्या काही वर्षात दामदुपटीच्या आमिषांतून फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली. तरीही दुपटीच्या पाठी आपण धापा टाकत धावतो आणि शेवटी दुपटीचं सोडाच धुपाटणंही हाती राहत नाही. लुटणारे श्रीमंत होतात आणि अल्लाउद्दीनच्या चिरागातील ‘जीन’सारखे गायबही होतात.
रात्री नऊ वाजून पाच मिनिटे झाली होती. नेहमीप्रमाणे कार्यालयात कामात व्यस्त असताना मोबाइलवर रिंग झाली. अनोळखी क्रमांक होता. मी रिसिव्ह केला आणि संभाषण सुरू झालं..
अनोळखी व्यक्ती : हैलो, मैं आयडीया केअर से बात कर रहा हूँ..
मी : कहाँ से?
अनोळखी व्यक्ती : मुंबई से..
मी : जी बोलिये..
अनोळखी व्यक्ती :आपके इस नंबर पर आपको २५ लाख रुपये की लॉटरी लगी है..
मी : अच्छा, तो? अब मुझे क्या करना होगा?
अनोळखी व्यक्ती : आप अपना बैंक अकाउंट नंबर दोगे तो हम आपके अकाउंट में पैसे ट्रान्सफर कर सकते है..
मी : मैं अपनी पर्सनल डिटेल्स आपको फोन पर नहीं दे सकता. अगर आप मिल सकते हो, तो हम ठिक से बात कर सकते हैं..
माझ्या या वाक्यानंतर त्या व्यक्तीने कॉल कट केला. हा कॉल ज्या क्रमांकावरून आला होता, तो एकूण बारा अंकी होता. त्या क्रमांकाची सुरुवात /फ+९२३०.. अशी होती. त्यामुळे हा क्रमांक मुंबईतला नाही, हे माझ्या आधीच लक्षात आलं होतं. तरीही मी त्या व्यक्तीला ‘कहाँ से?’ असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने मुंबईतून बोलत असल्याचे सांगितले. तिथेच ही व्यक्ती ‘फेक’ असल्याचा संशय आला होता. त्यामुळे थोडी माहिती घ्यावी याकरता मी त्याच्याशी संभाषण सुरू ठेवलं. मात्र जेव्हा मी माझा बँक अकाउंट नंबर देण्यास नकार देत प्रत्यक्ष भेटणार का, असं विचारलं तेव्हा त्या व्यक्तीने कॉल कट केला.
लॉटरी, दामदुप्पट पैसे आणि विविध ऑफर्सला भुलणा-याची संख्या कमी नाही. पाच हजार, दहा हजार किंवा त्यापुढे ठरावीक टप्प्यांतील पॅकेजसाठी रक्कम भरली की, त्या प्रमाणात नाव आणि पत्त्यांसह मोबाइल क्रमांकाची यादी उपलब्ध होते. टग्यांकडूनही सावज शोधण्यासाठी त्यात गुंतवणूक केली जाते. शंभरमधले पाच तरी जाळ्यात अडकतातच. मोबाइलवरून लॉटरी लागल्याचे किंवा एखादे महागडे गिफ्ट लागल्याचे सांगितले जाते. ते मिळवण्यासाठी अमूक इतकी रक्कम भरा, असे गोड शब्दांत सांगून सावज जाळ्यात ओढला जातो. शेवटी फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर डोक्यावर हात मारून घेण्याखेरीज पर्याय नसतो. ‘ई-मेल’वरूनही ऑनलाइन गंडा घालण्याचा प्रकार खूपच ‘फेमस’ (?) झालाय. मोबाइल सध्या घरगडीही वापरतो. एखादवेळी अशी सर्वसामान्य व्यक्ती पाच-दहा हजारांना फसल्यास आपण त्यांचे अज्ञान समजू शकतो. ‘ई-मेल’द्वारे झालेल्या फसवणुकींच्या प्रकारांना काय म्हणावं? साहजिकच नोकरदार, व्यावसायिक अशा सुशिक्षितांचाच अशा फसवणुकीत भरणा असतो. ‘आम्ही आपल्याला मेलद्वारे कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाही. त्यामुळे कृपया असे मेल आपणास आल्यास त्यास प्रतिसाद देऊ नये’, असे सांगत आपला अकाउंट असलेल्या बँकेतून अनेकवेळा मोबाइलवर मेसेज येत असतो. तरीही हव्यासापोटी आपण फसतोच.
सध्या नाशिकमध्ये ‘केबीसी’ कंपनीचा घोटाळा गाजत आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात ‘केबीसी’ या रियालिटी शोच्या नावाशी साधम्र्य असणा-या नाशिकमधील घोटाळेबाज ‘केबीसी’ने अनेकांना ‘करोडोंची’ स्वप्नं दाखवून ‘रोड’वर आणलं. धक्कादायक म्हणजे, या कंपनीत गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने गेल्या सोमवारी पुष्पलता पोपटराव निकम आणि त्यांचा मुलगा सागर पोपटराव निकम यांनी विष पिऊन आत्महत्या केली. सागर हा याच कंपनीत एजंट म्हणून काम करायचा. अल्प मुदतीत दामदुप्पट रक्कम देण्याच्या या कंपनीच्या आमिषाला केवळ नाशिकमधूनच कोटयवधींची उलाढाल झाल्याचे समोर आले. सध्या या कंपनीचे काही म्होरके पोलिसांच्या जाळ्यात आहेत. नाशिकमधील ‘केबीसी’प्रमाणेच ‘सॅफरॉन’ प्रकरण गाजत आहे. मुंबईसह कोकणात या कंपनीत पैसे गुंतवणा-यांची संख्या कोटयवधीत आहे. या कंपनीचा संचालक सध्या रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात आहे. केबीसी आणि सॅफरॉन या कंपन्यांचं पुढं काय होईल, हे सांगणं कठीण असलं तरी दामदुपटीच्या हव्यासापोटी या कंपन्यांत गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम सध्या तरी ‘रामभरोसे’च म्हणावी लागेल.
‘पैसा है, तो पुछते हैं कैसा है’, अशी एक म्हण आहे. पैसा असल्यावर सगळेच विचारतात. पैसा मिळणार असेल, तर कुणाला नकोय? पण, पैशाच्या हव्यासापोटी हातातलं सगळंच गमावून बसण्यात काय अर्थ? त्यापेक्षा आहे त्या पैशांचा योग्य वापर करून आणखी कष्ट केल्यास शांत झोप लागू शकते. पण, अशी झोप न लागणा-यांना झटपट श्रीमंतीची स्वप्नं दिवसाही पडतात. या स्वप्नांना साकार करण्याची आमिषे दाखवून लुटणारे चोर अशाच सावजांच्या प्रतीक्षेत असतात.
सध्या ‘दामदुप्पट’चा ‘काळा’बाजार तेजीत आहे. गेल्या काही वर्षात दामदुपटीच्या आमिषांतून फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली. तरीही दुपटीच्या पाठी आपण धापा टाकत धावतो आणि शेवटी दुपटीचं सोडाच धुपाटणंही हाती राहत नाही. लुटणारे श्रीमंत होतात आणि अलाउद्दीनच्या चिरागातील ‘जीन’सारखे गायबही होतात. पोलिसांचा दीर्घकाळ तपास सुरू राहतो. तपास संपलाच तर तोपर्यंत लुटणारी व्यक्ती सारं काही पचवून ढेकर देऊन मोकळी झालेली असते. फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत असतात. या प्रकारांना पायबंद घालणे कुठल्याही यंत्रणेच्या हाती नाही. जोपर्यंत दामदुपटीतून झटपट श्रीमंतीचा हव्यास संपत नाही, तोपर्यंत लुटारू लुटतच राहणार. स्वत:ला ‘सावध’ करा, कुणाचं ‘सावज’ होऊ नका.