दुभत्या जनावरांपासून अधिकाधिक दूध मिळावे म्हणून त्यांना नानाविध प्रकारचे खाद्य दिले जाते. मात्र..
दुभत्या जनावरांपासून अधिकाधिक दूध मिळावे म्हणून त्यांना नानाविध प्रकारचे खाद्य दिले जाते. मात्र, आंध्र प्रदेशातील मेडक जिल्ह्यातील फासलवाडी या गावात एक अगदी वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. तिथे मद्यनिर्मितीतील किण्वन प्रक्रियेनंतर उरलेला चोथा जनावरांना खाद्य म्हणून देण्यात आला आणि त्यामुळे जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढल्याचे निदर्शनास आले.
या जिल्ह्यात गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेने ‘एसएबी मिलर’ या बिअर कंपनीसह प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प हाती घेतला. मद्यनिर्मितीसाठी करण्यात येणा-या किण्वन प्रक्रियेनंतर उरणारे टाकाऊ घटक एकत्र करण्यात आले. हे पदार्थ जनावरांना देण्यात आले, अशी माहिती या प्रकल्पाचे सहाय्यक संशोधक डॉ. सुहास वाणी यांनी दिली. त्यानंतर राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे दुभत्या जनावरांच्या मालकांना खूपच फायदा झाला. पूर्वी एक लिटर दूध देणा-या जनावरांपासून तीन ते पाच लिटर दूध मिळू लागले. या उपक्रमांतून विविध बचत गटांतील सुमारे १५० महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. मद्यनिर्मिती प्रकल्पातील टाकाऊ घटक गोळा करून ते शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या महिला करू लागल्या. वर्षभरात या गटांनी एक लाख २० हजार रुपयांचा नफा कमावला, असेही वाणी यांनी सांगितले. याच जिल्ह्यातील इतर काही गावांत हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली.
परस्पर सहाय्यातून पाण्याचेही अधिक परिणामकारक व्यवस्थापन शक्य असल्याचे या प्रकल्पावर काम करतानाच त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे जलस्त्रोत व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यात आला. हा उपक्रम मेडक जिल्ह्यातील पाच गावांत राबवण्यात येत आहे. दोन हजार ५२६ कुटुंबांतील १२ हजार ९४० रहिवाशांना या प्रकल्पाचा लाभ होत आहे. पाण्याच्या नैसर्गिक स्रेतांचे योग्य नियोजन करून या भागांत रोजगाराच्या विविध संधी निर्माण करण्यात आल्या आहेत. पर्जन्य जलसंधारण आणि भूजलसाठा वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे हरभ-याचे उत्पादन ३५ टक्क्यांनी, कापसाचे उत्पादन १२ टक्क्यांनी, तांदळाचे उत्पादन १५ टक्क्यांनी आणि उसाचे उत्पादन आठ टक्क्यांनी वाढल्याची माहिती आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेच्या अधिका-यांनी दिली.