आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांसाठी जनतेकडून येणारी मदत स्वीकारण्यासाठी आणि त्याचा योग्यप्रकारे विनियोग करण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘नाम फाऊंडेशन’ या संस्थेची पुण्यात स्थापना केली आहे.
पुणे- दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी आणि आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांसाठी जनतेकडून येणारी मदत स्वीकारण्यासाठी आणि त्याचा योग्यप्रकारे विनियोग करण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘नाम फाऊंडेशन’ या संस्थेची पुण्यात स्थापना केली आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्याकडून या मोहिमेला आता व्यापक स्वरूप देण्यात येत आहे.
पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात जाऊन नाना पाटेकर यांनी ‘नाम’ या संस्थेची नोंदणी केली. तसेच या संस्थेला एसबीआय बँक खात्याचा क्रमांक देण्यात आला आहे. ‘करंट खाते क्रमांक – ३५२२६१२७१४८, IFC Code No. SBIN ०००६३१९ हा आहे, तर Swift Code No. SBININBB २३८’ हा असून ज्या व्यक्तींना दुष्काळग्रस्तांना मदत करायची असेल; त्यांना नाम फाउंडेशनच्या या खात्यात पैसे जमा करता येतील. त्यासाठी आयएमएफसी कोडही देण्यात आला आहे. त्याचबरोबर परदेशातील नागरिकांनाही या खात्यात पैसे जमा करता येणार आहेत. त्यासाठीचा स्विफ्ट कोडही देण्यात आला आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या मदत अभियानाला राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. ही मदत स्वीकारण्यासाठी व त्याचा योग्य विनियोग व्हावा, यासाठी ‘नाम’ फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. आमच्या या मदत अभियानाला फक्त राज्य वा देशभरातून नव्हे, तर परदेशातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नाना पाटेकर म्हणाले, जिथे जिथे आम्ही जात होतो; तेथे लोक आमच्याकडे मदत सुपूर्द करत होते, मात्र त्या सर्व पैशांचा योग्यरीतीने विनिमय व्हावा व सर्व गरजूंना ती मदत मिळावी, यासाठी ती एका योग्य माध्यमाद्वारे पोहोचवणे गरजेचे होते.
त्यामुळेच आम्ही ‘नाम’ या फाऊंडेशनची स्थापना केल्याचे नानांनी सांगितले. आता ज्यांना मदत करायची आहे; त्यांनी संस्थेच्या याच खात्यात पैसे जमा करावेत, आमच्या नावाने चालवण्यात येणा-या इतर कोणत्याही संस्था किंवा लोकांकडे पैसे देऊ नका, असेही नाना पाटेकर यांनी आवाहन केले.
या माध्यमातून जमा होणा-या पैशापैकी काही पैसे प्रथम आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहेत. त्यात फक्त या वर्षी आत्महत्या केलेले नव्हे, तर २०१४ व २०१३ सालच्या शेतक-यांच्या कुटुंबीयांचाही समावेश असेल.
आमच्या माध्यमातून शेतक-यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी ही आर्थिक मदत म्हणजे केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे, मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जमा होणा-या पैशातून दुष्काळी भागातील तरुणांना कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी वापर करणार असल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले.